Friday, February 26, 2021

लक्ष्मी आज्जी

‘स्मृतिचित्रे’ पहिल्यांदा वाचलं ते दहावी - बारावीत असताना. तेव्हा मला पुस्तकांचा भस्म्या रोग होता. हातात घेतलेलं पुस्तक संपण्यापूर्वी खाली ठेवणं म्हणजे नामुष्की वाटायची. इंग्रजीचा वेग अजून कमी होता, तरी ‘Complete Short Stories of Sherlock Holmes’चा ठोकळा आठवडाभरात संपायचा. स्मृतिचित्रंही या अचरट वेगानेच वाचली आणि विस्मृतीत ढकलून दिली, अजिबात वेळ न दवडता पुढच्या पुस्तकाकडे वळले.

 

माऊसोबत पुस्तकं वाचताना तिला मराठी पुस्तकांचीही ओळख करून द्यायचा माझा प्रयत्न असतो. तिचा पुस्तक वाचण्याचा कंटाळा याबाबत माझ्या पथ्यावरच पडतो. स्वतः काही वाचण्यापेक्षा बाईसाहेबांना श्रवणभक्ती करायला आवडते. त्यामुळे मग मला माझ्या आवडीची पुस्तकं निवडायची संधी असते.      

 

असंच मी एकदा तिच्यासोबत ‘स्मृतिचित्रे’ वाचायला घेतलं, आणि तिला ते आवडलं. एवढं मोठं पुस्तक म्हणजे थोडं वाचल्यावर बहुतेक ही कंटाळेल, मग दुसरं पुस्तक बघू असं मला वाटलं होतं. पण पूर्ण पुस्तकातले टिळकांचे अभंग आणि कविता (या तिला अवघड होत्या, समजल्या नाहीत) वगळता बाकी सगळं पुस्तक तिने चवीने ऐकलं. ‘लक्ष्मी आज्जीच्या गोष्टी’ आम्हाला इतक्या आवडल्या, की पुस्तक वाचून झाल्यावर परत एकदा त्यातला काही भाग तिला ऐकायचा होता. दहावीत वाचून मला ते फारसं खोलवर पोहोचलं नव्हतं, तिला किती लक्षात राहील माहित नाही. पण माऊनिमित्त हे परत वाचताना मला खूप मज्जा आलीय. १८५७ ते १९२० एवढा मोठा कालखंड या कहाणीचा आहे. परीक्षा पाहणारे इतके प्रसंग, भोवतालची विक्षिप्त माणसं असं सगळं असताना ही बाई किती सहजतेने ते सांगते! तिला जेमतेम लिहायला येतंय असं ती म्हणते ... पण “लग्न करताना मी बेफिकिरीची माळ टिळकांच्या गळ्यात घातली, त्यांनी फिकिरीची माळ माझ्या गळ्यात घातली”, “माझं सोवळं महाबळेश्वरीच हवा खायला राहिलं” असा सहज सोप्या भाषेतला नर्मविनोद लिहिण्यात जागोजागी दिसतो. आजीजवळ बसून गोष्टी ऐकल्याचं सुख आहे हे वाचण्यात.  

 

‘सोवळं लागलेल्या’ गोखल्य़ांची मुलगी एके दिवशी एका भिकारी मुलीला सहज आपली मुलगी म्हणून स्वीकारते आणि प्लेगच्या साथीत रोग्यांचं ‘सोनं’ही मनोभावे साफ करते. एकदा मनाला पटलं, की ‘टिळकांच्या इंजिनाने गती दिलेली ही आगगाडी’ धडाक्यात स्वतःच्या बळावर चालू लागते. हे आयुष्याला, बदलाला सामोरं जाणं मला फार आवडलं.

 

टिळकांविषयी माझं मत फारसं चांगलं नव्हतं. ‘उत्तम कविगुण असणारा एक चक्कर माणूस’ असा काहीतरी माझा समज होता. त्यांचं ख्रिस्ती होणं हा असाच एक चक्करपणा. पण या वेळी वाचताना जाणवला तो एक हळवा, प्रेमळ भक्त. आपला तापटपणा जावा म्हणून देवाची करुणा भाकणारा, अखेरीस संतापावर विजय मिळवणारा संत. हिंदी ख्रिस्त्यांनी मिशनर्‍यांचे मिंधे राहू नये, चर्चची सत्ता राहू नये म्हणून धडपडणारा धर्मसुधारक. दुष्काळात माझे बांधव उपाशी आहेत म्हणून ज्याच्या घशात घास अडकतो असा ख्रिस्तबुद्धाच्या जातीकुळीचा माणूस. प्रेमळ बाप आणि नवरा.

लक्ष्मीबाई आणि टिळाकांचा संसार म्हणजे त्यात घरचे आणि दारचे असा भेदच कुठे नाही. बाकी हजार बाबतीत त्यांची भांडणं झाली तरी कुणाला मदत करण्याबाबत कायम एकमत असतं. उत्तम कविता करणार्‍या ‘ठोंबरे’ला – म्हणजे बालकवींना त्यांच्याकडे आसरा मिळतो, टिळकांच्या भ्रमंतीत सापडलेल्या कुणाही गरजूला हे हक्काचं घर असतं, दुष्काळाच्या काळात स्वतःच्या ऐपतीचा विचार न करता वसतीगृहाच्या सगळ्या मुलांना सांभाळणं ते आपला धर्म समजतात. फार समृद्ध घर आहे हे!

माऊमुळे हे सगळं चवीचवीने वाचायला मिळालं. रोज एक प्रकरण वाचायचं, मग त्यावर भरपूर गप्पा मारायच्या, त्यामुळे चघळायला, पचायलाही वेळ मिळाला भरपूर. भसाभसा वाचण्यापेक्षा खूप जास्त मजा आहे यात!

 

Sunday, February 14, 2021

लल्लीची गोष्ट

     लल्ली माझी बालपणीची मैत्रीण म्हणवत नाही, कारण आम्ही एकत्र फक्त भांडलोय, खेळल्याचं काही आठवत नाही. या भांडाभांडीमुळे वैतागून मी तिच्याशी जो अबोला धरला, तो थेट गाव सोडल्यावरच संपला. म्हणजे सगळे मिळून खेळताना ती आणि मी एकत्र असायचो, पण दोघी एकमेकींशी मात्र खेळायचो नाही.

 

    आई वडिलांना नको असताना झालेली, चार पोरांच्या नंतरची ही मुलगी. आपलं कुणाला नको असणं कुठेतरी तिच्या अंतर्मनात मुरलेलं असावं, कारण हिसकावून घेतल्याशिवाय आपल्याला कधी काही मिळणार नाही असं ती वागायची. डोकं खूप तल्लख होतं, आत्मविश्वास, जिगर होती, पण याचा वापर व्हायचा तो इतरांना कारभार वाटणार्‍या गोष्टी बिनदिक्कत करण्यात. ही सगळी बुद्धी, चलाखी शाळेच्या अभ्यासाच्या वेळी गायब व्हायची. पहिलीत, दुसरीत अशी दर वर्षी नापास होत होत ती कासवाच्या गतीने शाळेची शिडी चढत राहिली. घरातल्या बाकीच्या उस्तवारीमध्ये तिच्याकडे विशेष लक्ष द्यायला आईवडिलांना फुरसत नव्हती. खरं तर पोरं आपोआप मोठी होतात, त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं असाच साधारण विचार आजुबाजूला दिसायचा. त्यामुळे निकालावरची लाल रेष दिसल्यावर पोटभर मार खाण्यापलिकडे फार काही वेगळी दखल तिच्या अभ्यासातल्या ‘ढ’पणाची घेतली गेली नसावी. एकदा शाळाही बदलून झाली, पण त्याने युनिफॉर्म बदलण्याखेरीज काही फरक पडला नाही.        

 

   आठवीनंतर मी गाव बदललं. तोवर लल्ली चौथीपर्यंत पोहोचली असावी. वयाने साधारण माझ्याएवढीच. टीवायच्या सुट्टीत मी तिच्या गावी गेले तेव्हा ती दहावीचा गड लढवत होती. दहावी पास होईपर्यंत आवडीचं शिवण शिकायला मिळणार नाही, छानछोकीचे कपडे मिळणार नाहीत अशा अटी टेकीला आलेल्या घरच्यांनी घातल्या होत्या. तरीही ही दहावीची कितवी वारी होती कुणास ठाऊक. प्रथमच मला लल्लीविषयी वाईट वाटलं.

 

    पुढे समजलं, की तिचं लग्न झालं. लहानपणी घरकामात तरबेज असणारी लल्ली फार आळशीपणा करते अशी तिच्या सासरच्यांची तक्रार होती. दहा वर्षं वय असताना एकटीने रेल्वेच्या दवाखान्यात जाऊन, केस पेपर काढून आपल्या जखमेला ड्रेसिंग करून घेणारी जिगरबाज लल्ली आयुष्यात काहीच करत नसेल यावर विश्वास बसेना.

 

    आज माऊची आई म्हणून विचार करताना खूप वेगळी वाटते लल्लीची गोष्ट. मी तिला मैत्रीण म्हटलं नाही, तसंच दुसर्‍या कुणीही फारसं म्हटलं नसावं. इतक्या क्षमता असणारी मुलगी कोणीच आपलं म्हटलं नाही म्हणून कोमेजून गेली का? “तू काही चांगलं करू शकतेस” असा विश्वास दाखवणारं कोणीच नव्हतं का? नकळत्या वयात तिच्याशी अबोला धरताना मीही तिला एकटं पाडणार्‍यांपैकीचं एक होते ना! लल्लीच्या या गोष्टीत अजून चांगलं काही होणं शक्यच नव्हतं का?