Friday, July 20, 2018

शेतीची शाळा २

शेतीची शाळा १

शेतीच्या शाळेची सुरुवात पाच गुंठे जमीन वापरायला घेऊन करायची असं ठरलं. ही जमीन विज्ञान आश्रमाच्या आवारातलीच. त्यामुळे तिला कुंपण होतं, चोवीस तास कुणीतरी तिथे असणार होतं. रस्ता, वीज, पाणी (मनपाचं!) मिळवण्याची कुठलीच अडचण नव्हती. फक्त पाणी टंचाई झाली तर पाणी वापरावर काही बंधनं निश्चितच असणार होती. जमीन तशी पडीक होती, ती लागवडीयोग्य करण्यापासून सुरुवात करायची होती. त्यामुळे पहिलं काम होतं तिथला कचरा काढण्याचं. बांधकामाचा राडारोडा, दारूच्या बाटल्या असं वाट्टेल ते होतं तिथे. ते आधी साफ करून घेतलं.

त्यानंतर मातीची तपासणी केल्यावर लक्षात आलं, की या जमिनीमध्ये सेंद्रीय कर्ब खूप कमी आहे, नत्राचीही कमतरता आहे. म्हणजे आता जमिनीचा कस सुधारायला हवा. जमिनीचा कस सुधारण्यासाठी म्हणून तिथे कम्पोस्टिंग करता येईल असं वाटलं. कम्पोस्टिंग तसं थोडंफार माहित होतं, पण ते घरच्यापुरतं, किंवा सोसायटीच्या ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यापुरतं. एवढ्या जमिनीचा कस वाढवायचा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर सगळं व्हायला हवं होतं. आणि आम्हाला शेती शिकायची होती, त्यामुळे शेतकर्‍याला परवडतील अशा मार्गानेच कस सुधारायचा होता. शेतीच्या खर्चामध्ये मजूरी हा फार मोठा भाग असतो, त्यामुळे सगळी कामं आपणच करायची, माणसं लावून शक्यतो काहीही करून घ्यायचं नाही असं ठरलं होतं.

आमची एक मैत्रीण काय वाट्टेल ते मिळवून देऊ शकते. कम्पोस्ट करण्यासाठी शेण, गोमुत्र मिळू शकेल, पानगळ मिळू शकेल असं तिने सांगितलं.  मग यात घालण्यासाठी ओला कचरा कुठून आणावा? सोसायटीच्या अनुभवावरून हे माहित होतं, की आपल्याकडे कचर्‍याचं वर्गीकरण फार ढिसाळपणे होतं. घरांमधून आलेल्या ओल्या कचर्‍यामध्ये तर वाट्टेल ते असतं – अगदी डायपर आणि औषधांच्या बाटल्यांपासून काहीही. त्यामुळे घरांचा ओला कचरा घ्यायची इच्छा नव्हती. मग म्हटलं, की भाजी विक्रेत्यांकडचा टाकाऊ माल घेऊन बघू या. जवळपासचे, ओळखीचे असे भाजीविक्रेते गाठले. त्यांचा टाकाऊ माल द्यायला ते तयार झाले. सकाळी “स्वच्छ”च्या गाड्या येण्यापूर्वी मग या भाजीविक्रेत्यांकडचा लूज माल आपण उचलायचा आणि कम्पोस्टसाठी शेतात घेऊन जायचा. हा “ओला खाऊ”. थंडीमध्ये, उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे बर्‍याच झाडांची पानं झडतात. मनपाच्या गाड्या लवकर येत नाहीत, पानगळ टाकण्यासाठी टेम्पोचा खर्च नको म्हणून अनेक सोसायट्यांमध्ये ही पानगळ जाळून टाकतात. अशी पानगळ सोसायट्यांमधून गोळा करायची. हा झाडांचा सुका खाऊ. यावर कल्चर म्हणून शेणाचं पाणी घालायचं. संस्थेच्या आवारात हे प्रयोग करतांना उकिरडा बघून कुणी आक्षेप घेईल का? याचा वास येईल का ?असे प्रश्न होते मनात. पण सुदैवाने कुणी अशी हरकत घेतली नाही. आणि कडक उन्हाने वास, माश्या अशा बाकी सगळ्या चिंताही दूर केल्या.

सुरुवातीला कम्पोस्टसाठी एक खड्डा खणला, त्यात प्लास्टिकचा कागद घातला, आणि वर हा ओला खाऊ – सुका खाऊ घालायला लागलो. भाजीवाल्यांकडच्या ओल्या खाऊमध्ये केळ्यांचे घड, अख्खी कलिंगडं असं काहीही असायचं. त्याचे ३ -४ इंची तुकडे करून घालायचो. एका दिवशी तब्बल आठ पोती ओला खाऊ मिळाला. यासाठी कधी खड्डा खणणार, तुकडे करणार? मग क्रशर / श्रेडरचा शोध सुरू झाला. त्यानिमित्ताने कम्पोस्टिंग मशिनरी तयार करणार्‍यांशी बोलणं झालं, तर तुमचं कम्पोस्टिंग काही ठीक होईल असं दिसत नाही ... खूप वेळ लागणार, कचर्‍याचा वास येणार, माश्या होणार, टोमॅटो वगैरेचा रस जमिनीत जाऊन जमिनीचा ph बिघडणार अशा बर्‍याच शंका वाटल्या त्यांना. खेरीजआम्हाला हवा तसा श्रेडर काही कुठे दिसला नाही. मग लक्षात आलं, की या वेगाने आपल्याला पुरेसं कम्पोस्ट पावसाळ्यापूर्वी होणं शक्य वाटत नाही.

काळजीच वाटायला लागली एकूण. मग प्रिया भिडेंना फोन करून आमचा प्रश्न सांगितला, आणि त्यांनी झटक्यात तो सोडवून टाकला! तसंही आम्हाला सगळ्या शेताचा कस सुधारायचा होता, आत्ता जमीन मोकळीच होती. मग एका खड्ड्यात कम्पोस्ट करून मग पसरण्याची गरजच काय? सगळ्या शेतातच कम्पोस्ट करायचं. जमिनीवर आधी एक पानगळीचा थर द्यायचा, त्यावर ओला खाऊ पसरायचा – तुकडे न करताच – अगदी कलिंगड असलं तर चार भाग इतपत ठीक आहे, पण बाकी भाज्या चिरत बसायच्या नाहीत. – ओल्या खाऊच्या वर परत एकदा पनगळ, आणि पानगळ उडू नये म्हणून वरून थोडीशी माती. अशी “सॅंडविच” बनवायची. वरून जीवामृत फवारायचं. थर पातळ असल्यामुळे पटकन कम्पोस्ट होतं ... पालेभाज्या वगैरे अगदी लगेच होतात, आणि दोन आठवड्यात यातून “ओल्या खाऊ”मधल्या वेगवेगळ्या भाज्यांची रोपं उगवून यायला लागतात. फार बारीक तुकडे केले नाहीत म्हणजे भाज्यांमधला ओलावा टिकून राहतो आणि वरून पाणी कमी मारावं लागतं, कडक उन्हाने सगळं सुकून जायची शक्यता कमी होते. मोठे तुकडे कुजायला वेळ लागतो, पण तोवर थांबायची गरज नसते. कम्पोस्टची धग गेली, म्हणजे त्यात तुम्ही झाडं लावायला सुरुवात करू शकता. मोठे तुकडे हळुहळू कुजत राहतात, आणि झाडांना दीर्घकाळापर्यंत पोषण मिळत राहतं. थेट मातीमध्ये कम्पोस्ट केल्यामुळे मातीमधली गांडुळं आणि बाकी जीवजंतू तिथे गोळा होतात, माती “जिवंत” होते.

हे सगळं ऐकून जीव भांड्यात पडला. दिवसाला शंभर किलो ओला खाऊसुद्धा आम्हाला शेतात वापरता यायला लागला. याला कधी जीवामृत, कधी ताजं शेणाचं पाणी असं घालत होतो. मग एकदा शेणात अळ्या दिसल्या आणि घाबरलोच आम्ही. हुमण्या? या अळीच्या इतक्या कहाण्या ऐकल्या होत्या, की ताजं शेण घालणं ताबडतोब बंद केलं, दर आठवड्याला जीवामृत घालायला सुरुवात केली.

रोज टू व्हीलर वरून / गाडीमधून कितीसा ओला खाऊ आणणार? त्यापेक्षा एखादा दिवस टेम्पो बोलावून मंडईमधून कचरा उचलला तर? एका झटक्यात काम होईल की! मग मंडईचा कचरा गोळा करणार्‍यांशी बोला, टेम्पोवाला शोधा असं सुरू झालं. पण मंडईच्या कचरावाल्यांनी काही दाद लागू दिली नाही, आणि टेम्पो आधी ठरवूनही ऐन वेळी नसणे, एक ट्रीप करून बिघडणे असे सगळे प्रकार झाले. तरीही दोन महिन्यात ८०० किलोच्या वर ओला खाऊ आणि २०० पोती पानगळ असं जमलं आम्हाला. यावर दर आठवड्याला जीवामृत होतंच. गेल्या उन्हाळ्यात मस्त उन्हामध्ये पुण्यात उकिरड्यावर पाणी मारत असतांना तुम्ही कुणाला बघितलं असलं, तर आमच्यापैकीच कुणीतरी असणार ती. पावसापूर्वी कम्पोस्टच्या “सॅंडविच”नी संपूर्ण जमीन झाकण्यात यशस्वी झालो आम्ही सगळ्या जणी. आणि लाल भोपळा, कारली, काकडी, कलिंगडं, टरबूज, मका, चिवळी, टोमॅटो, मिरच्या, चवळी, बटाटे अशा इतक्या भाज्या कम्पोस्टमधून उगवून आल्या, की काही न पेरताच शेती सुरू झाली! 



Wednesday, July 18, 2018

शेतीची शाळा १

गेले काही महिने इकडे एकदम शांतता आहे. कारण काहीतरी शिजतंय. एक जुनंच खूळ पुन्हा नव्याने डोक्यात घेतलंय. आपलं एक शेत असावं असं दिवास्वप्न मी कित्येक वेळा पाहिलंय, आणि आपल्या गेल्या काही पिढ्यांचा शेतीशी काहीही संबंध नाही, यातलं आपल्याला ओ की ठो कळत नाही, शेती करणारे परवडत नाही म्हणून सोडताहेत आणि दुसरा पर्याय असताना शेती करणं म्हणजे भिकेचे डोहाळे इ. इ. सगळं ऐकून समजून शेती शक्य नाही म्हणून हा विचार झटकून टाकायचा प्रयत्नही केलाय. पण तीन महिन्यांपूर्वी माझी मैत्रीण, माऊच्या सखीची आई याच खुळाने अशीच झपाटलेली असतांना, एकेकटीने हे शक्य नाही, पण आपण मिळून काही करू शकतो, मज्जा येईल करायला!” असं दोघींच्या लक्षात आलं, आणि आम्ही आपल्याला रोज जाऊन कसता येईल अशी जमीन हवी म्हणून शोधायला लागलो. घरापासून एक – दीड तासाच्या अंतरातली जमीन घ्यायची, आणि आपण स्वतः कसायची अशी साधारण डोक्यात कल्पना घेऊन शेतं बघत हिंडायला सुरुवात झाली. अजून एक मैत्रीण पण आमच्यात सामील झाली.

घरापासून एक – दीड तासात गाडीने पोहोचता यायला हवं, शेतापर्यंत रस्ता हवा – कुणाच्या बांधावरून जाणं आणि त्याचे वाद परवडणारे नाहीत, पाणी आणि वीज ऍक्सेसिबल पाहिजे हे सगळे निकष लावल्यावर मिळणारी जमीन परवडणारी नाही, परवडणारी यात बसणारी नाही असं मग लक्षात आलं. अजून जरा खोलात शिरल्यावर सात बारा – फेरफार उतारा – वहिवाटीचे हक्क या सगळ्या गुंत्यामध्ये पडतांना जसजसे अनुभवी लोकांशी बोलायला लागलो, तसं तसं लक्षात आलं, की जमीन घेणं, त्याची किंमत चुकती करणं आणि उद्यापासून कसायला सुरुवात इतकं सुरळीत प्रकरण हे नाही. यात भरपूर फसवणूक आहे, अडवणूक आहे, सरकार दरबारी करून घेण्याची कामं आहेत. आणि कुठलीही अडवणूक – फसवणूक न होता जमीन मिळाली – ज्याची जाणकार म्हणतात की १% सुद्धा शक्यता नाही – तरी जमिनीत केलेली गुंतवणूक शेतीच्या उत्पन्नातून वसूल होण्याची शक्यता पुढच्या काही पिढ्यांमध्ये तरी नाही.

यातून कसा मार्ग निघणार यावर विचार करत होतो. एव्हाना आम्ही शेती करणार ही बातमी लोकांपर्यंत पोहोचायला लागली, आणि आम्हाला पण शेती करायची आहे म्हणत अजून तीन मैत्रिणी सामील झाल्या. जमिनीचा पत्ता नाही, शेती कसायचा अनुभव नाही, तरीही. झेडबीएनएफचं शिबिर कर, ज्ञानेश्वर बोडकेंचे यूट्यूब व्हिडिओ बघ, प्रिया भिडेंकडे गच्चीतली मातीविरहित सेंद्रीय बाग बघायला जा असं चाचपणी करणं चाललं होतं. मग सगळ्या मिळून ज्ञानेश्वर बोडके सरांच्या एक एकरवरच्या एकात्मिक शेतीच्या कार्यशाळेला जाऊन आलो. पहिल्यांदाच कुणीतरी शेती फायद्यात कशी करायची याविषयी अनुभवातून बोलत होतं, त्यामुळे मला हे आवडलं.

हळुहळू मग लक्षात आलं, शेतजमीन विकत घेणं हा आपला उद्देश नाहीच. आपल्याला शेती करायची आहे. मग जमीन विकत घेण्याच्या मागे कशाला लागायचं? शेती शिकणं त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. आणि जसजसं लोकांशी बोलत गेलो, तसतसं हेही लक्षात आलं, की आपली शेती हवी म्हणून उत्साहाने जमीन घेणारे आणि ती कसायला वेळ न मिळणारे भरपूर लोक आहेत. त्यांनी आपल्यासाठी उदंड जमीन विकत घेऊन ठेवलेली आहे! ;) तर शेती शिकायची, आणि मग मोठ्या मुदतीच्या भाडेकराराने आपल्याला सोयीची जमीन वापरायला घ्यायची.

एक मैत्रिण आमच्या शेती करायच्या इच्छेविषयी विज्ञान आश्रमाच्या योगेश सरांशी बोलली. त्यांनी त्यांच्या Do it yourself Lab मध्ये शेती शिकायला या, इथे जमीन आहे, अवजारं आहेत, मार्गदर्शन मिळेल असं सुचवलं. विज्ञान आश्रमाच्या incubator मध्ये शेती शिकायची म्हणजे सोप्पंच झालं एकदम काम. साधारण वर्षभर इथे शिकू या, तोवर आपण कोणकोण, काय आणि कसं करू शकतो याचा अंदाज येईल आणि मग मोठ्या प्रमाणावर हे सगळं करता येईल अशी आशा आहे. त्यामुळे एप्रिल पासून आमची शेतीची शाळा चालली आहे. त्याच्या गमतीजमती इथे जमेल तश्या(?!) टाकायचा विचार आहे.

Sunday, July 15, 2018

The One Straw Revolution – Masanobu Fukuoka

शेतकरी आणि तत्त्वज्ञ मासानोबू फुकुओका हा सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, ZBNF अशा सगळ्या शेतीपद्धतींच्या मुळाशी असणारा बाप माणूस आहे. जपानी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या फुकुओकांचा सूक्षमजीवशास्त्राचा आणि शेतीशास्त्राचा अभ्यास होता. झाडांवरच्या रोगांचा अभ्यास करणारा संशोधक म्हणून त्यांनी करियरची सुरुवात केली. पण पुढे पाश्चात्य / आधुनिक शेतीशास्त्राचा मार्ग चुकतो आहे याविषयी त्यांची खात्री झाली, आणि संशोधकाच्या नोकरीचा राजिनामा देऊन फुकुओका घरच्या शेतीकडे वळले. १९३८ पासून त्यांनी सेंद्रीय लिंबूवर्गीय फळबागांचे प्रयोग आणि निरीक्षणे करायला सुरुवात केली, आणि यातून हळुहळू त्यांचा नैसर्गिक शेतीचा विचार विकसित झाला. दुसर्‍या महायुद्धानंतर १९४७ पासून त्यांची सेंद्रीय भातशेतीही सुरू झाली. त्यांनी “One Straw Revolution” १९७५ मध्ये लिहिलं. डोळस प्रयोग आणि इतका प्रदीर्घ अनुभव या पुस्तकाच्या मागे आहेत, त्यामुळे त्याचं हे पुस्तक म्हणजे जगभरातल्या नैसर्गिक शेतीवाल्यांचं बायबल समजलं जातं.
खरं म्हणजे हे पुस्तक घेऊन कितीतरी वर्षं झाली. ते वाचायलाही सुरुवात केली, पण काहीतरी बोचत होतं वाचतांना, पुस्तक काही मी पूर्ण करू शकत नव्हते. या वेळी पुन्हा एकदा नव्याने वाचायला घेतलं हे पुस्तक. थोरोच्या फार जवळ जाणारे वाटले त्यांचे विचार.

निसर्गाशी एकरूप व्हा, निसर्ग तुम्हाला पोटापुरतं निश्चितच देईल. त्यापलिकडे अपेक्षा ठेवणे ही हाव झाली.

तुमच्या भागात जे पिकतं, तेच खा. तेच तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

झाडाला त्याच्या नैसर्गिक जीवनक्रमाप्रमाणे वाढू दे. जंगलात ते कसं वाढलं असतं, तसंच वाढलं तर त्याची निकोप वाढ होईल. अशा जोमदार रोपाला तणनाशक, कीटकनाशक अशा कशाचीच गरज पडणार नाही. तुमची जमीन जंगलातल्या जमिनीसारखी होऊ देत, तुम्हाला नांगरणीची गरजच उरणार नाही. तणाचा नायनाट करायची गरज नाही, आपल्याला हव्या त्या झाडांपेक्षा जास्त जोमाने ती तरारणार नाहीत एवढीच काळजी घ्यायची आहे.

एकेका किडीचा नायनाट करून उपयोग नाही - ही एक पूर्ण इकोसिस्टीम आहे. त्यातल्या सगळ्या दुव्यांचा विचार व्हायला हवा. एका एका रोगावर इलाज कामाचा नाही, सगळ्याचा एकत्रित विचार हवा. आधुनिक विज्ञान असा विचार करत नाही, म्हणून फुकुओकांना ते उपयोगाचे वाटत नाही.

नैसर्गिक शेती ही कमीत कमी कष्टात, कमीत कमी खर्चात होणारी आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीच्या उत्पादनाची किंमतही रासायनिक शेती उत्पादनापेक्षा कमी हवी.

माणशी पाव एकर शेती करून प्रत्येकाने पोटापुरतं पिकवायला हवं.

रासायनिक शेतीमध्ये एका पिढीमध्ये जमिनीचा कस जातो. पारंपारिक शेतीमध्ये शतकानुशतके तो कायम राहतो. पण नैसर्गिक शेतीमध्ये तो कायम वाढतच जातो.

 हे यातले काही महत्त्वाचे विचार. पुस्तक वाचतांना पुन्हा मागच्या वेळेसारखंच झालं ... जसजशी पुढे वाचत गेले, तसतसं काहीतरी कमी आहे, काहीतरी चुकतंय असं आतून परत वाटायला लागलं. डोक्यातला सगळा गोंधळ बाजूला ठेवून फुकुओका काय म्हणताहेत ते वाचता नाही आलं मला. त्यामुळे हे पुस्तक परीक्षण नाही, पुस्तकाचा गोषवाराही नाही. पुस्तक वाचून मला काय वाटलं, तेच यात प्रामुख्याने आहे.

शेती हा धर्म आहे, जगण्याची पद्धत आहे असं फुकुओका म्हणतात. मला यात आपल्याकडच्या आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या कामाचा सल्ला दिसत नाही कुठे. शेतकर्‍याने गरीबच का असलं पाहिजे? त्याने शहरी माणसासारख्या छानछोकीची इच्छा का नाही ठेवायची? गरीबीचं उदात्तीकरण करतोय का आपण इथे? थोरो किंवा फुकुओकांसारखे काही थोडे अनावश्यक पैशांशिवाय आनंदात जगतील. तीच अपेक्षा सगळ्या शेतकर्‍यांकडून का? मला आध्यात्मिक शेतीमध्ये सध्या तरी रस नाही. शेतकर्‍यांनी लोकांना रसायनं खाऊ घालू नयेत, शेती विषमुक्त हवी, पण व्यापारी तत्त्वावर परवडणारी हवी - शेती हा धर्म नको, व्यवसाय हवाय मला. आधुनिक वैद्यकशास्त्र नसतं तर कदाचित हे लिहायला आज मी जिवंत नसते. विज्ञानाला काही समजत नाही म्हणून मी तरी मोडीत काढू नये. सॉरी, फुकुओका सान. नाही पचलं.