Sunday, August 1, 2021

चिव चिव चिमणी

माऊला एक मांजराचं पिल्लू पाळायचंच होतं. आधी तू स्वतःचं आवरायला शीक, पिल्लाला सांभाळण्याइतकी मोठी (आणि शहाणी) हो, मग बघू असं म्हणून मी आजचं संकट उद्यावर ढकललं होतं. पण नको तेव्हा माऊच्या बाबालाही नेमकं मार्जारप्रेमाचं भरतं आलं. वाटेत दिसलेलं एक पिल्लू स्वतःच उचलून आणून “बाबाला नकोय” म्हणून सांगायची त्याने सोय ठेवली नाही. सोसायटीच मांजराची पोरकी पिल्लं सापडतातच. असंच एकदा गच्चीत अगदी छोटं पिल्लू अडकलंय असा निरोप मिळाला, आणि माऊ आणि बाबा त्याला काढायला गेले. तोवर एका मार्जारप्रेमी ताईने ते पिल्लू ताब्यात घेतलं होतं. फारच छोटं आहे, त्याला माणसांची सवय नाही, एक – दोन दिवस माझ्याकडे रुळवून मग तुला देते असं ती म्हणाली आणि पिल्लू घरी घेऊन गेली. आणि दुसर्‍या दिवशी ते पिल्लू बागेत हरवलं. मग प्रचंड रडारड. आता यानंतर जे कुठलं मांजराचं पोरकं पिल्लू माऊसमोर येईल, त्याला घरात घेणं भागच होतं. तर अशा रीतीने ही चिऊ घरी आली. घरी म्हणजे घराच्या गॅलरीत. कारण ती आली मी  घरी नसताना. माऊने तिला प्रेमाने अंडं उकडून दिलं, दूध भाकरी दिली. सखीमंडळ जमा होऊन ऑलरेडी बारशाची तयारी सुरू झाली होती. अडचण एकच होती, की पिल्लू बोका आहे का भाटी हे अजून त्यांना ठरवता आलं नव्हतं. त्यामुळे सर्व प्रकारची नावं गोळा करणं चाललं होतं. (यातल्या एका कन्यकेने मला वायरलेस पासवर्ड पण मागितला. कशाला, तर पिल्लू बॉय आहे का गर्ल हे गूगलवर चेक करायला!)

दुष्काळातून उठून आल्यासारख्या दिसणार्‍या या उंदराएवढ्या पिल्लाने सगळं खाणं गट्टम करून वर अजून दुसर्‍या माऊसाठीची पोळी आणि अंडही संपवलं! मी घरी पोहोचेपर्यंत हे सगळं बाहेर यायला सुरुवात झाली होती, आणि गॅलरीचं माईनफिल्ड झालेलं होतं. दिवसभरात हे आवरेल असं वाटलं, पण दुसर्‍या – तिसर्‍या दिवशीही हीच अवस्था. दिवसभर झोपेल तिथे, बसेल तिथे, जाईल तिथे बारीक बारीक चिरकत होतं पिल्लू. “तुझी सू सारखी शी करतेय बघ!” मी माऊला चिडवून घेतलं. ती बिचारी दिवसभर पिल्लाची शी पुसत होती. एवढं करून पिल्लू पहिल्या दिवशीपेक्षा बरंच अक्टीव्ह वाटत होतं, आवाज फुटायला लागला होता. डॉक्टरांकडे जाऊन जंतांचं औषध आणि पिसवांसाठी पावडर आणली, पण तरीही शी चालूच. त्यातल्यात्यात सवड काढून पिल्लाचे उपद्व्याप चालूच होते. गॅलरीतून चढून गच्चीत जाणं, शेजारच्यांच्या गॅलरीमध्ये उडी मारून मग तिथे अडकून बसणं, गॅलरीच्या खिडकीतून उडी मारून घरात येणं, लोटून ठेवलेली गॅलरीची दारं उघडून घरात येणं. परत डॉक्टरांकडे नेलं, तर त्यांनी सांगितलेलं ऐकून मी हादरलेच. हिचं पित्ताशय सुजलंय, बरं होण्याची आणि जगण्याची शक्यता कमी आहे म्हणून सांगितलं डॉक्टरांनी. त्यासाठी माऊच्या मनाची तयारी करायलाही. चार चार औषधं आणि एक्सरेसाठीचं प्रिस्क्रिप्शन घेऊन तिथून जड पावलांनीच माऊ आणि मी आलो. त्या रात्री सव्वातीन वाजता घराच्या दुसर्‍या गॅलरीतून पिल्लाचा आवाज आला. धडपडत उठून बघितलं तर ही कन्या गॅलरीच्या वरून कोणी टपकू नये म्हणून एक इंच जाडीचे बार लावले आहेत त्या बारवर फिरतेय. बर्‍याच विनवण्या करून बया उतरायला काही तयार नाही. बास्केटमध्ये भाकरीचा तुकडा ठेवून बास्केट वर केली तर पुढचे दोन पाय बास्केटमध्ये घातले, तुकडा काढून घेतला आणि ही महाराणी वर ती वरच. “बस आता इथेच!” म्हणून वैतागून मी झोपायला गेले शेवटी. पंधरा मिनिटात पावसाची भुरभुर सुरू झाली, आणि हिचं म्याव म्याव. आता मात्र बाईसाहेब गुमान बास्केटमध्ये उतरल्या. डॉक्टरांनी तिचं पित्ताशय कमकुवत आहेत म्हणून अंड्याचं पिवळं बलक पचायला जड जाईल, ते देऊ नका म्हणून सांगितलेलं, इकडे सकाळी तिने गच्चीत जाऊन तिच्याच आकाराचं कबूतर मारून खाल्लं. इतकं उपद्व्यापी आणि resourceful पिल्लू (माऊनंतर) मी पहिल्यांदाच बघतेय.


 

पूर्वी पोरं जगत नसली की दगड्या, धोंड्या वगैरे नावं ठेवायचे. हे पिल्लू किती जगणार आणि किती दिवस घरी राहणार याविषयी शंकाच होती. त्यात सारखं चिरकून ते इतकं घाण झालेलं होतं, की मुलगा आहे का मुलगी तेसुद्धा बघायला उचलून घेववत नव्हतं. पहिल्या दिवशी माऊची सोबतीण म्हणून तिला चिऊ म्हटलं तेच मग कायमचं नाव झालं तिचं. पण चिऊपेक्षा कासव किंवा  गोगलगाय वगैरे नाव ठेवलं असतं तर बरं झालं असतं बहुतेक. ही खर्‍या चिमणीसारखी कुठूनही बघता बघता भुर्रकन गायब होतेय.

बरीच औषधं झाली, पण चिमणी बरं व्हायचं नाव घेईना. एकेका दिवशी सकाळपासून आपण फक्त हिची जगोजागी केलेली ठिपका ठिपका शी साफ करतोय असं जाणवलं की अगदी फ्रस्ट्रेशन यायचं. पण या दिवसात माऊसुद्धा माझ्याबरोबरीने हे काम करत होती. चिऊ घरी आल्याने तिची नेहेमीची दुसरी मांजर घरी येत नाही, चिऊशी तर नाहीच, जुन्या मांजरीशीही खेळायला मिळत नाही म्हणून एकदाही तक्रार केली नाही माऊने! त्यात एक दिवस चिमणी बेपत्ता झाली. कुठेच मिळेना. खरं सांगायचं तर माझा जीव भांड्यात पडला यापुढे हिची घाण साफ करायला नको, आणि माऊच्या नजरेसमोर पिल्लू मेलं तर ते दुःख पाहणं नको. चिऊ हरवणं, प्रयत्न करूनही न सापडणं किती सोयीचं त्यापेक्षा!

पण माऊने बरीच शोधाशोध केली, आणि सकाळी बेपत्ता झालेलं पिल्लू संध्याकाळी परत सापडलं! ती सापडल्यावरचा माऊचा आनंद बघून स्वतःच्या विचारांची लाज वाटली.

दोन आठवडे झाले, तीन आठवडे झाले, डॉक्टरांनी दिलेली सगळी औषधं खाऊनही चिऊच्या परिस्थितीत म्हणावी तशी सुधारणा दिसेना, आणि इतका भयंकर काही आजार असेल तर तब्येत त्यामुळॆ खालावतेय असंही दिसेना. आली तेव्हा नुसतेच मोठ्ठे डोळे आणि हाडांचा सापळा असं रूप होतं, त्यात मात्र हळुहळू बदल होऊन जरा अंग धरल्यासारखं वाटायला लागलं, खाणं, हगणं आणि झोपणं याव्यतिरिक्त काही करायला तिला थोडी सवड मिळायला लागली. एक दिवस चिऊ दोरीशी खेळायला लागली, तेव्हा माऊला झालेला आनंद शब्दात न सांगता येणारा.        

चिऊला येऊन महिना होईल उद्या. महिनाभरात तिने मला बरंच काही शिकवलं. कुठल्या गोष्टीत पाच मिनिटाच्या वर न रमणारी, झाडांना पाणी घालताना टाळाटाळ करणारी माऊ कंटाळा न करता, किळस न वाटून घेता एका आजारी पिल्लासाठी इतकं करेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.  इतकं आजारी पिल्लू हरवल्यावर बरं झालं, ब्याद टळली असं न म्हणता माऊ भर पावसात ‘आपल्या’ पिल्लाचा शोध घेत फिरेल, त्याला घेऊनच येईल असंही वाटलं नव्हतं. माऊला काही गोष्टी शिकायला अवघड जातात, मी थकून जावं इतके कष्ट पडतात. पण आयुष्यात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ती शिकतेय, शहाणी होतेय, ज्याला आपलं म्हटलं त्याला वार्‍यावर न सोडता त्याच्यासाठी काही करतेय  हा फार मोठा दिलासा आहे माझ्यासाठी. थॅंन्क्यू चिमणे.
 




Thursday, March 25, 2021

Fibre of the society

 बापट सरांनी वर्गात एक गोष्ट सांगितलेली आठवतेय आज. गरवारे कंपनीमध्ये कॉस्ट कटिंगचा विचार चालू असतो, तेव्हा दोराच्या तंतूची गेज कमी करण्याची एक सूचना येते. या दोराच्या पक्केपणावर विसंबून असणारे अनेक लोक आहेत; हा त्यांचा विश्वासघात होईल याची बाकी बोर्ड मेंबरना जाणीव करून देत एक मेंबर त्याला विरोध करतो. त्या माणसाच्या नियतीमुळे कित्येक सैनिकांचे, अवघड जागी उतरून कामं करणार्‍यांचे प्राण वाचले असतील. जोवर अशी माणसं मोक्याच्या पदांवर आहेत, तोवर त्या समाजाच्या वस्त्राचा पोत भक्कम राहतो.

 

पाचशेच्या वर घरं आहेत आमच्या सोसायटीमध्ये. एवढा सगळा ओला कचरा कुजवून त्याचं कम्पोस्ट बनवणारा प्लांट आहे. घराघरातला कचरा उचलून तो या प्लांटला नेणं, त्याचं खत बनवणं हे काम बिनबोभाट वर्षानुवर्षं चालू आहे. हे काम करणारे काम नीट करत नाहीत, वाटेल त्या वेळेला कचरा उचलतात, उचलताना सांडतात, खत करण्याऐवजी बराचसा कचरा मनपाच्या गाडीत चढवतात, ओला सुका एकत्र गोळा करतात, खतात प्लॅस्टिकचे तुकडे, तेल असं काहीही निघतं – एक ना दोन हजारो तक्रारी असतात सोसायटीच्या यांच्याविषयी.

 

गळकं छप्पर, ओल असणारी जमीन, धड हवा यायला जागा नाही का प्रकाश नाही अशा त्या जागेत कम्पोस्टच्या प्लांटच्या आत पाच मिनिटं उभं राहणं सुद्धा सोसायटीच्या कोणा रहिवाश्याला झेपणार नाही. करोनाच्या काळातसुद्धा एक दिवसही खाडा न करता आठवड्याचे सात दिवस हे काम चालू असतं. यातल्या एका मावशीला करोना झाला. दोन आठवडे ती काम करू शकणार नाही. दोन आठवडे प्लांट बंद. कचरा बाहेर कुणाला द्यायचा म्हटला, तरी तो नीट वेगळा केलेला लागतो. सुक्या कचर्‍यातच सॅनिटरी कचरा, ओल्या कचर्‍यात दुधाच्या पिशव्या असा सगळा प्रकार चालत नाही. शहाण्या शिकलेल्या मोठ्या सोसायटीतल्या लोकांना आपला कचरा कसा टाकावा हे माहित नसतं, ते वेगळं करणं या मावशीखेरीज कुणाला येत नाही. ती कामावर नसली तर कम्पोस्टिंगचा क्रशर चालणार नाही. ती नसली तर कचरा वेगळा होणार नाही, मनपाची गाडी सुका कचरासुद्धा उचलणार नाही. म्हणजे गेली कित्येक वर्षं एकही खाडा न करता एकही सुट्टी न घेता ती काम करते आहे. अशी कुणी मावशी आपण केलेला कचरा निस्तरत असते याचा सोसायटीत राहणार्‍यांना इतकी वर्षं पत्ताही नाही.

Friday, February 26, 2021

लक्ष्मी आज्जी

‘स्मृतिचित्रे’ पहिल्यांदा वाचलं ते दहावी - बारावीत असताना. तेव्हा मला पुस्तकांचा भस्म्या रोग होता. हातात घेतलेलं पुस्तक संपण्यापूर्वी खाली ठेवणं म्हणजे नामुष्की वाटायची. इंग्रजीचा वेग अजून कमी होता, तरी ‘Complete Short Stories of Sherlock Holmes’चा ठोकळा आठवडाभरात संपायचा. स्मृतिचित्रंही या अचरट वेगानेच वाचली आणि विस्मृतीत ढकलून दिली, अजिबात वेळ न दवडता पुढच्या पुस्तकाकडे वळले.

 

माऊसोबत पुस्तकं वाचताना तिला मराठी पुस्तकांचीही ओळख करून द्यायचा माझा प्रयत्न असतो. तिचा पुस्तक वाचण्याचा कंटाळा याबाबत माझ्या पथ्यावरच पडतो. स्वतः काही वाचण्यापेक्षा बाईसाहेबांना श्रवणभक्ती करायला आवडते. त्यामुळे मग मला माझ्या आवडीची पुस्तकं निवडायची संधी असते.      

 

असंच मी एकदा तिच्यासोबत ‘स्मृतिचित्रे’ वाचायला घेतलं, आणि तिला ते आवडलं. एवढं मोठं पुस्तक म्हणजे थोडं वाचल्यावर बहुतेक ही कंटाळेल, मग दुसरं पुस्तक बघू असं मला वाटलं होतं. पण पूर्ण पुस्तकातले टिळकांचे अभंग आणि कविता (या तिला अवघड होत्या, समजल्या नाहीत) वगळता बाकी सगळं पुस्तक तिने चवीने ऐकलं. ‘लक्ष्मी आज्जीच्या गोष्टी’ आम्हाला इतक्या आवडल्या, की पुस्तक वाचून झाल्यावर परत एकदा त्यातला काही भाग तिला ऐकायचा होता. दहावीत वाचून मला ते फारसं खोलवर पोहोचलं नव्हतं, तिला किती लक्षात राहील माहित नाही. पण माऊनिमित्त हे परत वाचताना मला खूप मज्जा आलीय. १८५७ ते १९२० एवढा मोठा कालखंड या कहाणीचा आहे. परीक्षा पाहणारे इतके प्रसंग, भोवतालची विक्षिप्त माणसं असं सगळं असताना ही बाई किती सहजतेने ते सांगते! तिला जेमतेम लिहायला येतंय असं ती म्हणते ... पण “लग्न करताना मी बेफिकिरीची माळ टिळकांच्या गळ्यात घातली, त्यांनी फिकिरीची माळ माझ्या गळ्यात घातली”, “माझं सोवळं महाबळेश्वरीच हवा खायला राहिलं” असा सहज सोप्या भाषेतला नर्मविनोद लिहिण्यात जागोजागी दिसतो. आजीजवळ बसून गोष्टी ऐकल्याचं सुख आहे हे वाचण्यात.  

 

‘सोवळं लागलेल्या’ गोखल्य़ांची मुलगी एके दिवशी एका भिकारी मुलीला सहज आपली मुलगी म्हणून स्वीकारते आणि प्लेगच्या साथीत रोग्यांचं ‘सोनं’ही मनोभावे साफ करते. एकदा मनाला पटलं, की ‘टिळकांच्या इंजिनाने गती दिलेली ही आगगाडी’ धडाक्यात स्वतःच्या बळावर चालू लागते. हे आयुष्याला, बदलाला सामोरं जाणं मला फार आवडलं.

 

टिळकांविषयी माझं मत फारसं चांगलं नव्हतं. ‘उत्तम कविगुण असणारा एक चक्कर माणूस’ असा काहीतरी माझा समज होता. त्यांचं ख्रिस्ती होणं हा असाच एक चक्करपणा. पण या वेळी वाचताना जाणवला तो एक हळवा, प्रेमळ भक्त. आपला तापटपणा जावा म्हणून देवाची करुणा भाकणारा, अखेरीस संतापावर विजय मिळवणारा संत. हिंदी ख्रिस्त्यांनी मिशनर्‍यांचे मिंधे राहू नये, चर्चची सत्ता राहू नये म्हणून धडपडणारा धर्मसुधारक. दुष्काळात माझे बांधव उपाशी आहेत म्हणून ज्याच्या घशात घास अडकतो असा ख्रिस्तबुद्धाच्या जातीकुळीचा माणूस. प्रेमळ बाप आणि नवरा.

लक्ष्मीबाई आणि टिळाकांचा संसार म्हणजे त्यात घरचे आणि दारचे असा भेदच कुठे नाही. बाकी हजार बाबतीत त्यांची भांडणं झाली तरी कुणाला मदत करण्याबाबत कायम एकमत असतं. उत्तम कविता करणार्‍या ‘ठोंबरे’ला – म्हणजे बालकवींना त्यांच्याकडे आसरा मिळतो, टिळकांच्या भ्रमंतीत सापडलेल्या कुणाही गरजूला हे हक्काचं घर असतं, दुष्काळाच्या काळात स्वतःच्या ऐपतीचा विचार न करता वसतीगृहाच्या सगळ्या मुलांना सांभाळणं ते आपला धर्म समजतात. फार समृद्ध घर आहे हे!

माऊमुळे हे सगळं चवीचवीने वाचायला मिळालं. रोज एक प्रकरण वाचायचं, मग त्यावर भरपूर गप्पा मारायच्या, त्यामुळे चघळायला, पचायलाही वेळ मिळाला भरपूर. भसाभसा वाचण्यापेक्षा खूप जास्त मजा आहे यात!

 

Sunday, February 14, 2021

लल्लीची गोष्ट

     लल्ली माझी बालपणीची मैत्रीण म्हणवत नाही, कारण आम्ही एकत्र फक्त भांडलोय, खेळल्याचं काही आठवत नाही. या भांडाभांडीमुळे वैतागून मी तिच्याशी जो अबोला धरला, तो थेट गाव सोडल्यावरच संपला. म्हणजे सगळे मिळून खेळताना ती आणि मी एकत्र असायचो, पण दोघी एकमेकींशी मात्र खेळायचो नाही.

 

    आई वडिलांना नको असताना झालेली, चार पोरांच्या नंतरची ही मुलगी. आपलं कुणाला नको असणं कुठेतरी तिच्या अंतर्मनात मुरलेलं असावं, कारण हिसकावून घेतल्याशिवाय आपल्याला कधी काही मिळणार नाही असं ती वागायची. डोकं खूप तल्लख होतं, आत्मविश्वास, जिगर होती, पण याचा वापर व्हायचा तो इतरांना कारभार वाटणार्‍या गोष्टी बिनदिक्कत करण्यात. ही सगळी बुद्धी, चलाखी शाळेच्या अभ्यासाच्या वेळी गायब व्हायची. पहिलीत, दुसरीत अशी दर वर्षी नापास होत होत ती कासवाच्या गतीने शाळेची शिडी चढत राहिली. घरातल्या बाकीच्या उस्तवारीमध्ये तिच्याकडे विशेष लक्ष द्यायला आईवडिलांना फुरसत नव्हती. खरं तर पोरं आपोआप मोठी होतात, त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं असाच साधारण विचार आजुबाजूला दिसायचा. त्यामुळे निकालावरची लाल रेष दिसल्यावर पोटभर मार खाण्यापलिकडे फार काही वेगळी दखल तिच्या अभ्यासातल्या ‘ढ’पणाची घेतली गेली नसावी. एकदा शाळाही बदलून झाली, पण त्याने युनिफॉर्म बदलण्याखेरीज काही फरक पडला नाही.        

 

   आठवीनंतर मी गाव बदललं. तोवर लल्ली चौथीपर्यंत पोहोचली असावी. वयाने साधारण माझ्याएवढीच. टीवायच्या सुट्टीत मी तिच्या गावी गेले तेव्हा ती दहावीचा गड लढवत होती. दहावी पास होईपर्यंत आवडीचं शिवण शिकायला मिळणार नाही, छानछोकीचे कपडे मिळणार नाहीत अशा अटी टेकीला आलेल्या घरच्यांनी घातल्या होत्या. तरीही ही दहावीची कितवी वारी होती कुणास ठाऊक. प्रथमच मला लल्लीविषयी वाईट वाटलं.

 

    पुढे समजलं, की तिचं लग्न झालं. लहानपणी घरकामात तरबेज असणारी लल्ली फार आळशीपणा करते अशी तिच्या सासरच्यांची तक्रार होती. दहा वर्षं वय असताना एकटीने रेल्वेच्या दवाखान्यात जाऊन, केस पेपर काढून आपल्या जखमेला ड्रेसिंग करून घेणारी जिगरबाज लल्ली आयुष्यात काहीच करत नसेल यावर विश्वास बसेना.

 

    आज माऊची आई म्हणून विचार करताना खूप वेगळी वाटते लल्लीची गोष्ट. मी तिला मैत्रीण म्हटलं नाही, तसंच दुसर्‍या कुणीही फारसं म्हटलं नसावं. इतक्या क्षमता असणारी मुलगी कोणीच आपलं म्हटलं नाही म्हणून कोमेजून गेली का? “तू काही चांगलं करू शकतेस” असा विश्वास दाखवणारं कोणीच नव्हतं का? नकळत्या वयात तिच्याशी अबोला धरताना मीही तिला एकटं पाडणार्‍यांपैकीचं एक होते ना! लल्लीच्या या गोष्टीत अजून चांगलं काही होणं शक्यच नव्हतं का?  

Friday, January 29, 2021

यादवी

विखाराची पेरणी, विखाराची मशागत.
विखाराच्या शेतीमधलं विखाराचं भरघोस पीक.
विखाराची दलाली, विखाराचा व्यापार.
 
कटू विखारी बीजापोटी फळे राक्षसी करंटी
हे निसर्गाला समजतं.
आदिमानवाला समजलं.
 
सुखवस्तु सभ्यतेचा बुरखा लेऊन
सगळंच बेचिराख करायला निघालेल्या
त्याच्या वंशजाला समजेल का?
 
का पेटवून देईल तो
सहिष्णुतेचा थेंबही शिल्लक न ठेवता
उरल्या सुरल्या माणुसकीचा वणवा?

Friday, January 15, 2021

सुखी जीव

     आज माऊला घेऊन आजीकडे जायचं होतं. जाण्यापूर्वी सोसायटीमधूनच एकीकडून काहीतरी घेऊन यायचं होतं. उशीर झालेला होता, माऊ सोबत यायचं म्हणेल आणि अजून वेळ लागेल म्हणून माऊची आंघोळ होईपर्यंत मी तिकडे पटकन जाऊन येईन असा विचार केला, आणि तिला न सांगताच सटकले. नेमका तिथे पाच-दहा मिनिटं वेळ लागला. तेवढ्यात मला शेजारच्या मैत्रिणीचा फोन – “अग, कुठे आहेस? आई हरवली म्हणून माऊ सगळीकडे शोधतेय!” 

    “आलेच!” म्हणून मी लगेच निघाले. घरी पोहोचले, तर दारात आजीचा फोन – “अग, कुठे आहेस? आई हरवली - तिचे कपडे काढलेले घरात तसेच पडलेत, घरातली चप्पल पण तशीच आहे, आई कुठेच सापडत नाही. असा माऊचा फोन आला मला!” आजीला शांत करून घरात पाऊल ठेवलं, तर माऊ गरजलीच – “कुठे होतीस? न सांगता जातात का असं? बोलू नकोस माझ्याशी जा!”     

    तर झालं असं होतं, की माऊ आंघोळ करून बाहेर आली, तर तिला आई कुठे दिसेना. कुठे लपली आहे का गंमत करायला म्हणून शोधलं तिने, पण काही उपयोग झाला नाही. मग तिने बाबूला विचारायचा प्रयत्न केला, तर त्याने (नेहेमीप्रमाणे) कॉलमध्ये असल्याने काही लक्ष दिलं नाही. माऊने लॅंडलाईनवरून माझा फोन लावला, तर फोन लागला नाही. आता मात्र तिचा धीर सुटला, आणि तिने इंटरकॉमवरून सुचेल त्या सगळ्या शेजार्‍या-पाजार्‍यांना फोन करून “आई हरवल्याची” बातमी सांगितली, आजीलाही फोन करून ही खबर दिली. प्रत्येक फोनगणिक बातमीतला मसाला वाढत गेला हे सांगणे न लगे. सगळ्यांचे काळजीने मला फोन यायला लागले.

    एवढं सगळं रामायण घडलं, तरी कंपनीला वाहून घेतलेल्या आतल्या खोलीतल्या जिवाला काहीही पत्ता नव्हता.

    लॉकडाऊन आणि लॉकडाऊनोत्तर काळात घरात काय काय चाललंय, त्यावर जर एखादं नाटक लिहिलं, तर त्यात असं एक पात्र ठेवावं लागेल, जे फक्त थोड्या थोड्या वेळाने आतल्या खोलीतून बाहेर डोकावून “अरे काय आरडाओरडा लावलाय ... गप्प बसा जरा, माझा कॉल आहे!” म्हणून ओरडतं. नाटकाच्या बाकी प्लॉटशी या पात्राला काहीही देणंघेणं नसतं.

    आज या सुखी जीवाचा फारच हेवा वाटल्याने जिथे तो फिरकण्याची तिळमात्र शक्यता नाही, तिथे किस्सा सांगून सूड घेण्यात आलेला आहे.