Friday, December 12, 2014

What a plant knows (and other things you didn’t know about plants)


कोर्सेरावर कोर्सचं हे नाव बघितलं, आणि ताबडतोब माझं नाव नोंदवलं!
 
“कोर्सेरा” हे माझं मागच्या वर्षात गवसलेलं ताजंताजं प्रेम. मुक्त शिक्षण असावं तर असं! जगाच्या पाठीवर कुठूनही, वाट्टेल त्या विषयावर, आपल्याला सोयीच्या वेळी फुकटात शिकायची सोय करून ठेवलीय त्यांनी. वेगवेगळ्या विद्यापीठांद्वारे इथे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात.  साधारण सहा आठवडे ते बारा आठवडे असा कालावधी एकेका कोर्सचा. मी आतापर्यंत चार तरी कोर्सेस मनापासून पूर्ण केलेत. (दोन तीन कोर्स काही तरी विघ्न येऊन अर्धवट टाकावे लागले, ते आता पुढच्या सेशनला.) आतापर्यंत मी अनुभवलेला तिथे शिकवणार्‍यांचा दर्जा, सहाध्यायींकडून शिकायला मिळणार्‍या गोष्टी आणि ऑनलाईन संवादाची पातळी या सगळ्यानेच मी प्रभावित झाले आहे.

तिथला तेल अवीव युनिव्हर्सिटीचा हा ऑनलाईन कोर्स. आठवड्याला साधारण ३ -४ तासांचा वेळ इथली व्हिडिओ लेक्चर्स बघण्यासाठी आणि माहिती वाचण्यासाठी काढला, तर एकदम अलिबाबाची गुहाच उघडली! झाडांना आपल्यासारखं बघता येतं का, त्यांना ऐकू येतं का, स्पर्शाची संवेदना असते का ... एक ना दोन अनेक प्रश्न आजवर मनात होते माझ्या. या आणि अजून कितीतरी प्रश्नांची उत्तरं अतिशय रंजक पद्धतीने या कोर्समध्ये मिळाली. (आणि मनात पुढचे प्रश्न तयार झाले! ;) ) शाळेनंतर जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्रातही कुठलीही पार्श्वभूमी नसतांनाही मला समजेल अश्या पद्धतीने हे सांगणं म्हणजे खरंच कौशल्याचं काम आहे. तुम्हाला झाडांमध्ये रस असेल तर आवर्जून करा हा कोर्स!!! आणि थोडासा मोकळा वेळ असेल, तर तुमच्या आवडीचे कोर्सेस कोर्सेरावर धुंडाळून तर बघा ... केवढातरी खजिना गवसेल!

Wednesday, December 10, 2014

जिवंतपणाचं लक्षण ...


दिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात.

आता छाटणी करायची वेळ झाली, मला आठवतं.

कात्री चालवल्यावर गच्ची एकदम मोकळी मोकळी दिसायला लागते. छाटलेली झाडं एकदम बिचारी वाटायला लागतात. (तरी बरं, झाडांना फांदी कापलेली समजते पण वेदना होत नाही हे शिकले आहे इतक्यातच!) जास्तच कापणी केलीय का आपण? नवी पालवी येईल ना याला पुन्हा? अश्या शंका यायला लागतात.

या शंकांमध्ये मी बुडून गेलेली असते तेंव्हा कधीतरी वठल्यासारख्या दिसणार्‍या म्हातार्‍या फांद्यांवरती हळूच कुठेकुठे हिरवा-गुलाबी शहारा उमटायला लागतो. 


त्याची अशी आश्वासक पालवी झाली की मग माझ्या जिवात जीव येतो!


दिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात...

***
(अनघा मारणारे मला. तिच्या एकदम सिरियस, अर्थपूर्ण पोस्टीचं नाव इतक्या फुटकळ पोस्टीला वापरलंय म्हणून ... पळा!!! :) )

Tuesday, December 9, 2014

रंग याचा वेगळा ...



“मला दहा मुलं आहेत. एकासारखं दुसरं नाही आणि माणसासारखं एकही नाही!” असं ज्यांच्याविषयी त्यांच्या आईने म्हटलंय, त्या दाभोळकर “अजबखान्या”तलं एक आपत्य म्हणजे दत्तप्रसाद. यापूर्वी ‘अंतर्नाद’मध्ये त्यांचे एक – दोन लेख वाचले होते, आणि अजून माहिती करून घ्यायची उत्सुकता होती. आईने “रंग याचा वेगळा” घेऊन दिलं आणि गेले तीन –चार दिवस वाचत असलेलं पुस्तक बाजूला ठेवून, सगळी कामं टाकून या पुस्तकात बुडून गेले होते.  

दत्तप्रसाद दाभोळकर यांनी संशोधक म्हणून मोठं काम केलंय. हौस म्हणून शोधपत्रकारिता केली आहे. एखादा विषय भावला म्हणून त्याचा पाठपुरावा करून त्याविषयी अभ्यासपूर्ण, सुंदर, मूलगामी असं काही लिहिलंय. त्यांच्या भावंडांपैकी नरेंद्र दाभोलकरांनी अंनिसच्या कामाला वाहून घेतलं किंवा मुकुंद दाभोळकरांनी प्रयोग परिवार उभा केला. असं एकाच क्षेत्रात बुडून जाण्याचा दत्तप्रसादांचा पिंड नाही. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर जत्रेत फिरणार्‍या मुलाच्या उत्सुकतेने त्यांनी आयुष्याकडे बघितलंय, वेगवेगळे अनुभव घेतलेत.  

भारताच्या अंटार्टिका मोहिमेविषयीचा आणि एकूणातच भारतातल्या संशोधन क्षेत्राविषयी त्यांचा लेख वाचला आणि मोठ्ठा धक्का बसला. आपल्याकडे संशोधनाचं फारसं काही चांगलं नाही हे मी बाहेरून ऐकून होते, पण परिस्थिती इतकी भीषण असेल याची कल्पना नव्हती. सरकारी संशोधन संस्था, आपल्या उद्योगांमधले संशोधन विभाग या सगळ्या अरेबियन नाईट्समधल्या सुरस कहाण्या इथे वाचायला मिळतात.  

सरदार सरोवर, मोठे विकासप्रकल्प, विस्थापितांचे प्रश्न आणि पर्यावरण याविषयी माझ्या मनात मोठ्ठं कन्फ्यूजन आहे. मला यातल्या सगळ्यांच्याच बाजू बर्‍याच अंशी पटतात आणि नेमकं काय चुकतंय ते सांगता येत नाही. “माते नर्मदे” मी वाचलेलं नाही. (आजवर हे वाचलंच पाहिजे म्हणून कुणी समोर कसं ठेवलं नाही याचं आता आश्चर्य वाटतंय!) नर्मदा प्रकल्पाविषयी दाभोळकर जे म्हणतात त्यात अभिनिवेश दिसत नाही तर  स्पष्ट विचार आणि ठोस उपाययोजना आहेत असं वाटतं, त्यामुळे त्यांचं म्हणणं पूर्ण पटतंय. आता “माते नर्मदे” वाचणं आलं! 

एके काळी विवेकानंदांची पारायणं केल्यावर गेली कित्येक वर्षं मी त्यांच्या वाटेला गेलेले नाही. दाभोळकरांनी विवेकानंदाविषयी लिहिलेलं वाचून खूप काही नवं हाती सापडल्यासारखं वाटतंय, पुन्हा विवेकानंद वाचावेसे वाटताहेत, त्यांचं विवेकानंदांवरचं पुस्तक वाचावंसं वाटतंय.  

राजधानी दिल्लीची क्षणचित्रं, १८५७ वरची त्यांची टिप्पणी, १९९० च्या भांबावलेल्या रशियाचा त्यांनी घेतलेला वेध, किंवा त्यांची व्यक्तीचित्रं ... या पुस्तकातले त्यांचे लेख वाचून अजून वाचायच्या पुस्तकांची एक मोठी यादी तयार झालीये मनात. एवढं दाभोळकरमय होऊन जाण्यासारखं काय आहे या पुस्तकात? दाभोळकरांची लेखनशैली आवडली, त्यांच्या अभ्यासाला, विचाराला दाद द्यावीशी वाटली हे तर आहेच. पण याहूनही आवडलंय ते त्यांचं जगणं, त्यांची वेगवेगळ्या प्रांतामधली मुक्त मुशाफिरी. ज्या वेळी जे भावलं, ते तेंव्हा जीव ओतून करणं आणि नंतर त्यापासून वेगळं होणं. त्यांना संशोधनक्षेत्र आतून बाहेरून माहित आहे पण त्यातल्या राजकारणात ते नसतात. दिल्ली कशी चालते ते त्यांनी बघितलंय, पण ते ती चालवायला प्रयत्न करत नाहीत. अनेक साहित्यिकांचा त्यांचा स्नेह आहे, स्वतःचं लेखन आहे. ज्ञानपीठसारख्या पुरस्काराचं राजकारण त्यांनी बघितलंय. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळावं म्हणून ते सर्व प्रयत्न करतात, पण स्वतः साहित्यातल्या राजकारणापासून दूर राहण्याचं साधतात. हे जाम आवडलंय!!!

***
रंग याचा वेगळा ... दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन
संपादन: भानू काळे
कॉंटिनेंटल प्रकाशन
किंमत ४०० रू.

Tuesday, November 11, 2014

Genghis Khan the world conqueror by Sam Djang



चेंगिझ खानाविषयी खूप उत्सुकता होती. भारताच्या वेशीपर्यंत तो आला आणि तिथून परत फिरला म्हणून आपण वाचलो – तो नेमका का बरं परत फिरला असेल हे जाणून घ्यायची इच्छा हे एक कारण, आणि हा बाबराचा पूर्वज होता – मुघल साम्राज्यात याच्या युद्धनीतीचा, विचाराचा, कर्तृत्वाचा ठसा कुठे दिसतो का हे तपासून बघायची उत्सुकता हे दुसरं. त्यामुळे ऐतिहासिक कादंबरी असूनही लगेच उचललं हे पुस्तक.
तेराव्या शतकातली मंगोल पठारावरची परिस्थिती माझ्या कल्पनेच्याही पलिकडली. अतिशय खडतर निसर्ग, शिकार आणि पशूपालन यावर गुजराण करणार्‍या भटक्या टोळ्या आणि त्यांच्यामधली न संपणारी वैमनस्य. लढाईत हरलेल्या टोळीतील पुरुषांची सर्रास कत्तल, त्यातली बायका मुले पळावणे, त्यांना गुलाम बनवणे या नेहेमीच्या गोष्टी. आज एका सरदाराच्या आधिपत्याखाली लढणारी माणसं उद्या सहज त्याच्याविरुद्ध लढायला तयार, कारण स्वतःचा आजचा स्वार्थ एवढाच लढण्यामागचा विचार.
लग्न करून नव्या नवरीला आपल्या टोळीकडे घेऊन जाणार्‍या नवरदेवाच्या सोबत्याने वाटेतल्या टोळीच्या सरदाराची खोड काढली आणि त्या सरदाराच्या टोळीने नवरीव्यतिरिक्त सगळ्या प्रवाश्यांना कंठस्नान घातलं. सरदाराने या पळवून आणलेल्या नवरीशी रीतसर लग्न केलं. या सरदाराचा मुलगा तेमजुंग – म्हणजे भविष्यातला चेंगिझ खान. मुलगा तीन वर्षांचा झाला की घोड्यावर मांड टाकायला शिकणार आणि शस्त्र हातात धरता यायला लागलं की शिकारीत आणि लढाईत भाग घेणार ही तिथली परंपरा. शिकार करणं, वाट काढणं, आग पेटवणं, स्वतःचा तंबू उभारणं हे सगळे मुलाच्या शिक्षणातले महत्त्वाचे घटक. तेमजुंग जेमतेम नऊ वर्षाचा असताना त्याच्या वडलांचा मृत्यू झाला, आणि टोळीने त्याच्या आईच्या विवाहाला आक्षेप घेतला आणि तिच्या सगळ्या मुलांना अनौरस ठरवत वडलांच्या वारश्यापासून दुरावलं. कालपर्यंत २० हजारांच्या टोळीचा भावी सरदार म्हणून बघितला जाणारा तेमजुंग अन्नाला मोदात झाला. रोज सगळ्या मुलांना जी काय लहान – मोठी शिकार मिळेल ती आणि आईने दिवसभरात मिळवलेली कंदमुळं यावर गुजराण करायची वेळ त्याच्यावर आली. टोळीतल्या त्याच्या विरोधकांच्या ताब्यात सापडून मरण डोळ्यापुढे दिसत असतांना तो शिताफीने निसटला. काही काळ लपत छपत काढल्यावर पुन्हा त्याच्या शत्रूंना धूळ चारायला उभा ठाकला. या सगळ्या काळात संपूर्ण मंगोल पठार एका राजाच्या आधिपत्याखाली आल्याशिवाय या कायमच्या लढाया संपणार नाहीत आणि मंगोल राज्य उभं राहू शकणार नाही हे तेमजिन समजून चुकला. राजकीय व्यवस्थेबरोबरच त्याला तिथेली टोळ्यांवर आधारित सामाजिक उतरंडही बदलायची होती. हे सगळं बदलण्याचा एकच मार्ग आहे यावर त्याचा ठाम विश्वास होता – बळाच्या जोरावर!
तेमजिनचा सगळा इतिहास म्हणजे लढाई –> जिंकल्यास अजून मोठे सैन्य + मालमत्तेत वाढ -> पुढची लढाई -> हरल्यास पूर्ण वाताहात -> पुन्हा सैन्याची जमवाजमव -> पुढची लढाई असं इन्फायनेट लूप आहे. मंगोल हे कसलेले योद्धे होतेच – दिवसचे दिवस ते घोड्यावर काढू शकत. वर्षानुवर्षं टिकणारं वाळवलेलं गाईचं मांस हे त्यांचं युद्धातलं अन्न. प्रत्येक सैनिकाकडे त्याचे घोडे, शस्त्र, पाणी असेच. उपासमारीची वेळ आली तर प्रसंगी स्वतंच्या घोड्याचं रक्त पिऊनसुद्धा जिवंत राहण्याची आणि लढण्याची त्यांची रीत होती. त्यांचे घोडेही मंगोल पठाराच्या खडतर निसर्गात टिकाव धरून राहणारे होते – पाणी नसेल तर बर्फ खाऊनही हे घोडे जगू शकत, बर्फाखालून स्वतःचं अन्न शोधू शकत. मंगोल भटके, त्यांचं घर कायमचं तंबूत, त्यामुळे कुठेही गेलं तरी काही तासात घर उभं राहू शके. लढण्यासाठीच ही माणसं जिवंत राहत असावीत असं वाटतं हे सगळं वाचतांना. अश्या योद्द्यांना तेमजिनने युद्धाची अजून नवी तंत्र शिकवली. उत्तम हेरखातं, जलद निरोप पोहोचवण्याची व्यवस्था आणि निशाण / विशिष्ट बाण याच्या वापरातून सैन्याला संदेश पोहोचवणं ही तंत्र त्याने अतिशय यशस्वीरित्या वापरली.
माणसांची पारख आणि त्यांच्या सेवेचं चीझ करणं ही त्याची खासियत होती. सैन्यासाठी आणि अन्य प्रजेसाठी त्याचे कायदे अतिशय कठोर होते, आणि चुकीला शिक्षा मिळाल्यावाचून राहणार नाही याची लोकांना खात्री होती. त्याचा वेश, अन्न, राहणी सामान्य सैनिकांसारखीच असायची. धर्म, टोळी, सामाजिक पत याच्या निरपेक्ष प्रत्येक माणसाच्या गुणांप्रमाणे त्याला वागणूक देण्यावर त्याचा भर असायचा. "माणसाला सगळ्यात प्रिय असतं ते त्याचं स्वातंत्र्य. पण ते मिळाल्यावरही त्याला एक रीतेपणा जाणवतो. कुणी तो रीतेपणा विसरण्यासाठी देवाच्या भजनी लागतो, कुणी विलासात स्वतःला विसरू इच्छितं, तर कुणी अजून काही. हे रीतेपण भरून टाकेल असं कारण तुम्ही मिळवून दिलंत, तर माणसं जगाच्या अंतापर्यंत तुमच्या पाठीशी उभी राहतील!" हा चेंगिझ खानाचा त्याच्या मुलांना सल्ला.
साठाव्या वर्षी शिकार करतांना जायबंदी होऊन त्यातून चेंगिझ खानचा मृत्यू झाला. मरेपर्यंत त्याने मंगोल पठारावर एकछत्री अंमल आणला होताच, खेरीज चीन, कोरिया, खोरासान, पर्शिया, रशिया एवढे सगळे भाग जिंकलेले होते. मंगोल पठाराला कायद्याचं राज्य मिळालं होतं. त्याच्या मागे या साम्राज्याची भरभराट होत जाऊन त्याचा नातू कुबलाई खान याच्या काळात ते परमोच्च शिखरावर पोहोचलं – सयबेरिया पासून अफगाणिस्तानपर्यंत आणि प्रशांत महासागरापासून ते काळ्या समुद्रापर्यंत त्याची सत्ता होती!


हे सगळं वाचतांना द्रष्टा नेता, नवी समाज रचना निर्माण करणारा, उत्तम शास्ता म्हणून कुठेतरी मनात शिवाजी महाराज आठवतात ना? पण फार मोठा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि तेमजिनमध्ये. आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या टोकाची क्रूर कृत्य त्याच्या लढायांमध्ये आणि शांतीकाळातही सहज चालायची. आपल्याला विरोध करणारं शहर जिंकल्यावर शहरातल्या एकूण एक माणसाची कत्तल करून त्यांच्या मुंडक्यांचे डोंगर त्याच्या सेनानींनी उभे केलेले आहेत! हेरात जिंकलं तेंव्हा सतरा लाख – सतरा वर पाच शून्य – इतकी माणसं मारली त्यांनी!!! लढायांनंतरच्या त्यांच्या विध्वंसाची वर्णनं वाचून सुन्न होतं मन.
***
चेंगिझ खान भारतात आला नाही कारण इथलं उष्ण हवामान, अस्वच्छ पाणी आणि वेगळ्या हवामानातले अनोळखी आजार या सगळ्यामुळे त्याने भारतात येण्याचा विचार रद्द केला. उत्तरेकडेचे थंड वारे अडवणार्‍या हिमालयाचे किती उपकार आहेत बघा अपल्यावर ! 
***
पुस्तक वाचून झाल्याझाल्या मनात साठलेली अस्वस्थता इथे सांडली आहे सगळी. सगळे संदर्भ परत तपासून मग पोस्ट टाकण्याइतकाही धीर नव्हता माझ्याकडे! हे सगळं आत्ताच लिहायचं होतं!

Monday, November 10, 2014

रंग माझा वेगळा ...


खूप दिवसत मी इथे बागेविषयी काही लिहिलेलं नाही. कारण बागेत मी काही केलेलंच नाही पाणी घालण्याखेरीज. पण रोज सूर्य उगवतो, झाडांना प्रकाश देतो. पाऊस पडतो, आणि ती थरारतात. काही ना काही नवीननवीन बागेत घडतच असतं. आपलं लक्ष नसेल, तर तो आपला करंटेपणा. तर जाता जाता ही गंमत बघायला मिळाली मला बागेत –

मागच्या पावसाळ्यात मी पांढर्‍या गोकर्णाच्या बिया लावल्या होत्या, आणि त्याचा मस्त वेल आला होता. त्याच्या बिया पडून या वर्षी आपोआप बाग गोकर्णाने भरून गेली होती. त्यातले तीन चार ठेवून मी बाकीचे काढून टाकले. या तीन – चार वेलांनी गंमत केली.

पहिल्याला अशी फुलं आली:

दुसर्‍याची अशी:

तर तिसर्‍याची अशी!

निळ्या गोकर्णाचा एकही वेल माझ्याकडे नव्हता. मग ही किमया कशी बरं झाली असेल? मागच्या पिढीमध्ये सुप्त राहिलेली गुणसूत्रं आता जागी झाल्यामुळे? का परागीभवन करणार्‍या किड्यांनी-माश्यांनी कुठूनतरी निळी गोकर्णाची फुलं शोधून काढली होती? पांढर्‍या गोकर्णावर निळी शाई कशी बरं सांडली असावी?

या पावसाळ्यात उशीरानेच जांभळ्या गोकर्णाच्या बिया सापडल्या त्या टाकल्यात मी एका कुंडीत. त्याला कुठल्या रंगाची फुलं येतील बरं? :)