Tuesday, June 8, 2010

आय (डोन्ट) सी यू

अचानक ध्यानीमनी नसताना आय सी यू बाहेरच्या प्रतिक्षाकक्षामध्ये तळ ठोकायची वेळ आली, आणि एक वेगळंच जग बघायला मिळालं.

जनरल वॉर्ड, सेमी स्पेशल, स्पेशल, डिलक्स वगैरे वर्गभेद इथे नसतात.
"तुमचं कोण?" एवढा एकच प्रश्न या परिवाराचा एक भाग होण्यासाठी पुरेसा असतो.
"आमच्या पेशंटने आज म्हणे एक डोळा उघडला!" एवढी बातमी इथल्या लोकांना आनंदित करायला पुरेशी असते.
तुमचा पेशंट एकदा त्या काचेच्या दाराआड गेला, की तुम्ही फक्त बाहेर वाट बघायची.
आत ठेवलेल्या आपल्या माणसाला भेटता येत नाहीये, म्हणून तळमळणार्‍या काकूंना कुणी गावाकडची ताई "तुमच्या पेशंटला पाजायला घेऊन जा" म्हणून शहाळ्याचं पाणी देते, तेंव्हा काकूंबरोबरच अजून कुणाकुणाच्या नातेवाईकांचेही डोळे भरून येतात.

"आपल्याच नशीबात अमूक तमूक का" असा प्रश्न पडत असेल तर जरा वेळ इथे बसा. आपण किती नशीबवान आहोत याचा साक्षात्कार होतो.
कारण इथे तुम्हाला जबरी अपघातानंतर गेले दहा दिवस मृत्यूशी झगडणार्‍या पंचवीस वर्षांच्या मुलाची आई भेटते.
पंधरा दिवसांपूर्वी ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालेल्या बाईचा नवरा भेटतो.
चार दिवसांपासून मुलांना आजोळी धाडून, कपड्यांची बॅग भरून सासूबरोबर पुण्याला आलेली, इथल्याच बाकड्यावर रात्री झोपणारी सून दिसते.
पोराच्या इलाजासाठी आज लगेच पंचवीस हजार कुठून आणू म्हणून काळजीत पडलेले गावाकडचे आजोबा दिसतात.
ज्यांचे नातेवाईक आयसीयू पर्यंत पोहोचूच शकले नाहीत, त्यांच्यापेक्षा हे सगळे नशीबवान असतात.
आणि तुम्ही?

Monday, June 7, 2010

जॉब सॅटिस्फॅक्शन, ओनरशीप, कमिटमेंट, क्वालिटी, सर्व्हिस लेव्हल इ. इ.

    ती माझ्याकडे गेली चार वर्षे पोळ्या, केर-फरशी करते आहे. वर्षाला तिच्या मोजून चार ते पाच सुट्ट्या असतात, आधी सांगून घेतलेल्या. रोज सकाळी साडेसातला ती कामावर हजर असते. बाई ग, शनिवार-रविवारी जरा उशिरा आलीस तरी चालेल (खरं म्हणजे पळेल ... तेवढीच मला उशिरा उठायला संधी) हा माझा सल्ला तिला फारसा पटत नाही. सकाळचं पहिलं काम उशीरा सुरू केलं म्हणजे तिचं वेळापत्रक कोलमडतं.

    चार दिवसांपूर्वी तिची काकू गेली, त्याच दिवशी बहिणीचं अचानक ऑपरेशन करावं लागलं. दवाखान्यात बायकांच्या वॉर्डात पुरुषमाणसांना थांबायला परवानगी नाही. माहेरची मंडळी सुतकात अडकलेली. म्हणजे दवाखान्यात बहिणेवेसोबत हिला थांबायला हवं. रोज रात्री दवाखान्यात झोपून ती सकाळी कामावर हजर आहे. सकाळची घाईची कामं उरकून मगच ती घरी जाते. Business Continuation Plan in place, and successfully applied.

    आपल्याला कामावर पोहोचायला उशीर झाला किंवा खाडा झाला, तर घड्याळाच्या तालाबरहुकूम धावणार्‍या किती घरांची वेळापत्रकं कोलमडतील याची एवढी समज हिला मुळातूनच असेल? वेळेचं नियोजन, प्रायॉरिटी ठरवणं, कामामधलं डेडिकेशन कुठे आणि कधी शिकली ही? सातत्याचा विचार करायचा तर मी हिला सीएमएमआय लेव्हल ५ देईन!

    तथाकथित उच्च कौशल्याची आणि ‘जबाबदारीची’ कामं करणार्‍यांना आठवड्याचे सातही दिवस, वर्षाकाठी चार दिवसाच्या सुट्टीवर या सातत्याने काम करता येईल?

Thursday, June 3, 2010

सोन्याच्या धुराचा ठसका

    डॉ. उज्ज्वला दळवींचं ‘सोन्याच्या धुराचा ठसका’ वाचलं. सौदी अरेबियामध्ये पंचवीस वर्षं डॉक्टर म्हणून काम करतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी रोचक भाषेत मांडलेत. प्रवासी म्हणून एखाद्या देशात जाणं, आणि तिथे राहून, ‘आतले’ म्हनून तो देश अनुभवणं यात खूप फरक असतो. यापूर्वी सौदीविषयी ‘अतिरेक्यांना पैसा इकडून मिळतो’या आरोपापलिकडे काहीच माहिती नव्हती मला.  
    पुस्तकातली ‍अकरा बाळंतपणं झाल्यानंतर दीड वर्षं दिवस राहिले नाहीत म्हणून नैराश्य आलेली त्यांची पेशंट विसरता येत नाहीये. आणि पोटाच्या मागे या रानटी वस्तीमध्ये येऊन पडेल ते काम करणार्‍या जगभरातल्या चाकरमान्यांचे अनुभवही. त्यांची पिळवणूक, अपेक्षाभंग, आणि तश्याही वातावरणात त्यांनी काय एन्जॉय केलं ते. जबरदस्त ठेच लागली पुस्तक वाचताना.

जिथे दुसरं मतच खपवून घेतलं जात नाही, अश्या परक्या ठिकाणी रहायचं?
रानटी कायदा आणि त्याची अंधळी अंमलबजावणी अश्या जंगलच्या राजमध्ये जगायचं?
काय कपडे घालावेत, काय खावं, कुणाशी बोलावं, काय काम करावं ... या सगळ्याचा निर्णय दुसरं कुणीतरी करणार?
डोळ्यासमोर होणारा उघडउघड भेदभाव नजरेआड करायचा?
पैसे मिळतात म्हणून कमीपणाची वागणूक आणि मनमानी खपवून घ्यायची?
अश्या समाजात वाढणारी तुमची मुलं काय संस्कार घेत असतील?
आयुष्यात इतक्या तडाजोडी कुणी करू शकतं?

आत्मसन्मान ही चैनीची गोष्ट आहे का?
ताठ मानेने काम करायला मिळणं इतकं अवघड आहे?
आयुष्यभर अश्या वातावरणात जगू शकतात माणसं?
याला पर्याय नाही? का थोड्या दिवसांनी याचीही सवय होते?
मायदेशातला नोकरीधंदा सोडून जायलाच हवं अश्या ठिकाणी?

नाही हजम झालं.

बहुतेक मला सुरक्षिततेच्या कवचाची फार सवय झालीय.
किंवा मला स्वातंत्र्याची चटक लागलीय.
का माझ्यामध्ये पुरेशी महत्त्वाकांक्षा नाही?
रिस्क घेण्याची तयारी नाही?
का सुखासुखी कुणी इथे जाणार नाही - मला त्यांची मजबूरी समजत नाहीये?