Wednesday, September 27, 2017

जर्मन रहिवास

काही लोकांना आपण “बॅटरी चार्ज करून घ्यायला” भेटतो. राजगुरू सर त्यापैकी एक. सर आता सत्तरीच्या वर आहेत. कॉलेजमध्ये ते आम्हाला शिकवायचे त्या काळात ते टेनीस खेळायचे. बत्तीस वर्षं खेळल्यावर आता टेनीस बंद झालेय, पण व्यायाम आणि तंदुरुस्तीविषयी जागरूकता अजूनही आहे. सरांच्या दोघी मुली लग्न होऊन परगावी / परदेशी राहणार्‍या, घरात ते दोघेच. पण त्यांचं घर आणि मन स्वतःच्या म्हातारपणातच अडकलेलं नाही.  “आमच्या वेळी असं होतं, आता सगळं कसं वाईट झालंय” किंवा ”हल्ली मान दुखते, चालायला त्रास होतो, ऐकू येत नाही” यापलिकडेही बर्‍याच गोष्टींविषयी त्यांच्याशी गप्पा होतात. (त्यांना म्हातार्‍यांपेक्षा तरुणांचा सहवास आवडतो, “आम्हाला तू टाळतोस!” अशी त्यांच्या म्हातार्‍या मित्रांची तक्रार असते.;) ) अजूनही ते घरी येणार्‍या विद्यार्थ्यांना शिकवतात. आम्ही कॉलेजमध्ये होतो तेंव्हा सरांनी सांगितलेलं आठवतंय, “ग्रेसफुली म्हातारं होणं ही सुद्धा कला असते.” हे ग्रेसफुली म्हातारं होणं कसं असतं ते सरांकडून शिकावं. खूप दिवसांपासून त्यांना भेटायला जायचं होतं. अखेर या महिन्यात तो योग जुळून आला, आणि सरांची भेट झाली.

***

सरांकडे “जर्मन रहिवास” असं पुस्तक दिसलं, सहज चाळायला घेतलं, आणि पहिल्या काही पानातच पुस्तकात गुंगून गेले. खानदेशातल्या भालोद या छोट्याशा गावातला तुकाराम गणू चौधरी हा तरूण आपल्या दोघा मित्रांसह १९२२ ते १९२५ अशी तीन वर्षं कापडनिर्मिती तंत्रज्ञान शिकायला जर्मनीमध्ये राहिला. या काळाविषयीचे आत्मकथन या पुस्तकात आहे. पुस्तकातल्या काही जर्मन भागाच्या भाषांतरामध्ये सरांचा सहभाग होता. सरांकडून घेऊन ते पुस्तक वाचून काढलं. 

***

दोन महायुद्धांच्या मधला काळ हा जर्मनीमधला मोठा धामधुमीचा. पहिल्या महायुद्धात झालेला पराभव, त्यातली फसवलं गेल्याची भावना, तरुणांची एक अख्खी पिढी युद्धभूमीवर गमावल्यामुळे घराघराला बसलेले त्याचे चटके, बेकारी, दुर्भिक्ष्य, महागाई, कवडीमोल झालेलं आणि अजून गर्तेतच चाललेलं चलन, राजकीय परिस्थितीमध्ये होत असणारे बदल आणि अस्थिरता, त्यातून आलेली गुन्हेगारी असा सगळा हा काळ. या काळातल्या जर्मनीमध्येच हिटलरच्या उगमाची बीजं सापडतात. त्यामुळे जर्मनीकडे अशा परिस्थितीमध्ये कुणी संधी म्हणून बघत असेल असा मी विचारही केला नव्हता कधी.

जर्मनीमध्ये तेंव्हा प्रचंड चलन फुगवटा (hyperinflation) होता. म्हणजे एका ब्रिटिश पौंडाचे जर्मन मार्क हजारांमध्ये मिळत. (आज मिळालेल्या पैशांना उद्या काही किंमत राहीलच याची शाश्वती नसे!  ब्रिटिश पौंडाचा भाव २००० मार्क वरून काही महिन्यात २०००० मार्कपर्यंतसुद्धा घसरला या काळात.) त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये राहून शिकणे स्वस्त पडे. याच विचाराने हे खानदेशातले शेतकरी घरातले तिघे तरूण कुठलं आर्थिक पाठबळ नसताना, घरात विशेष शैक्षणिक पार्श्वभूमी नसतांना, कुठली ओळखदेख नसतांना हिकमतीने माहिती काढून, कसेबसे उधार – कर्जाऊ पैसे जमवून जर्मनीला जमवून शिक्षण घेण्याचं ठरवतात. त्यासाठी स्वतःच्या हिंमतीवर पैसा उभा करतात. तिथल्या कोर्सेसविषयी माहिती मिळवतात, जर्मन भाषेची तोंडओळख करून घेतात, आणि बोटीवर चढतात! त्यांच्या नजरेतून जर्मनीकडे बघणे खूपच रोचक आहे.

मुंबईहून निघाले, जर्मनीमध्ये पोहोचले, दुसर्‍यां दिवशीपासून शिकायला सुरुवात, कोर्स संपवल्यावर मायदेशी परत असा साधा सरळ प्रवास त्यांचा नाही. आर्थिक चणचण आहे, भाषेचं ज्ञान तसं तोकडं आहे. तिथल्या कुठल्या कोर्सला ऍडमिशन मिळालेली नाही. व्हिसा पॅरीसला पोहोचल्यावर काढायचा. तिथल्या रीतेरिवाजांची, पद्धतींची माहिती तितकीशी नाही. घरची पार्श्वभूमी बघता वातावरणातली तफावत तर खूपच आहे. (तिघातला एक मित्र तर शाकाहार न सोडण्यावर ठाम राहिल्यामुळे जर्मनीच्या थंडीमध्ये तग धरून राहू शकला नाही, तिथेच त्याचा मृत्यू झाला.:( ) जर्मन मार्क कोलमडल्यामुळे परकीय चलन घेऊन येणार्‍यांसाठी तिथे अभूतपूर्व स्वस्ताई होती. आणि जर्मन लोक उपाशी मरत असतांना, अन्नासाठी, उबेसाठी पैसे नाहीत म्हणून कुटुंबंच्या कुटुंबं आत्महत्या करत असतांना तिथल्या लोकांच्या डोळ्यावर येईल अशा चैनीवर पैसे उधळणारे परदेशी (भारतीय सुद्धा!) होतेच. त्यामुळे वातावरणात परक्यांविषयीची एक तेढ होती. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या तरुणाची वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्याची, नव्याशी जुळवून घेण्याची, माणसं जोडण्याची कला आचंबित करणारी आहे. जर्मनीमध्ये तो ज्या ज्या ठिकाणी राहिला, त्या त्या गावात त्याला घरचा मानणारे आप्तस्वकीय तयार झाले. त्याला आपला मुलगा मानणार्‍या आया -  मावशा मिळाल्या. आईच्या मायेने त्यांनी त्याच्या आजारपणात सेवा केली. परदेशात हातात पैसा नसतांना, तिथल्या रहिवाशांचीच आर्थिक ओढगस्ती असतांना महिनेच्या महिने काढणं त्याला जमलं ते या जोडलेल्या माणसांमुळे.

भारतीय संस्कृती, लग्न झालेलं असताना एकट्याने शिक्षणासाठी परदेशात दीर्घ काळासाठी येणे किंवा या तिघा मित्रांमधलं प्रेम या सगळ्याविषयी त्यांच्या जर्मन स्नेह्यांना कुतुहल आहे. तिथल्या समाजजीवनाविषयी, चालीरीतींविषयीच्या यांच्या टिप्पण्याही वाचण्यासारख्या आहेत.

***

पुस्तक वाचतांना जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे, युद्धानंतरच्या इतक्या अस्थिर, खालावलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा जर्मनीमध्ये शिक्षणाचा, कापड गिरणीतल्या कामाचा दर्जा टिकून होता. युद्धानंतर हालाखीची परिस्थिती आली, मग थर्ड राईश आलं, दुसरं महायुद्ध झालं, जर्मनीची परिस्थिती अजून हालाखीची झाली, आणि मग हळुहळू मार्शल प्लॅनच्या सहाय्याने हा देश पुन्हा उभा राहिला. आज युरोपच्या एकीकरणानंतरच्या काळात तर युरोपाच्या कुठल्याही भागातून आलेले लोक हक्काने जर्मनीमध्ये काम करू शकतात. पण तरीही जर्मन दर्जा आणि युरोपियन दर्जा यात तफावत जाणवतेच. हे रक्तातच असतं का एकेका देशाच्या?

***

जर्मन रहिवास
तुकाराम गणू चौधरी
लोकवाङ्मय गृह प्रकाशन

Tuesday, September 19, 2017

माऊचा आणि आजीचा बाप्पा

यंदा माऊला सोबत घेऊन बाप्पा बनवायचा विचार होता. माऊची चिकाटी आणि माझा पेशन्स दोन्ही वाढवण्याची फार गरज असल्यामुळे हा (अती) महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार अशी भीती मला वाटत होती. पण एका दिवशी दुपारी बाप्पाचं नाव घेतलं आणि सुरुवात केली. माऊ, सखी, तिची आई आणि मी चौघीजणी बाप्पा बनवायला बसलो.

अर्धा पाऊण तास, माफक आरडाओरडा करून असे दोन बाप्पा तयार झाले:



मग लक्षात आलं, आपल्या बाप्पाचे कान मिकी माऊससारखे दिसताहेत. मग बाप्पाला मुकुट घालण्याऐवजी आम्ही चक्क सांता क्लॉजची टोपी घातली :)


सखीचा बाप्पा मात्र शहाण्यासारखा, बाप्पाचे कान आणि नागाचा मुकुट घालून तयार झाला.

बाप्पा तयार होईपर्यंत माऊचा उत्साह संपला. त्यामुळे उंदीरमामा आईने बनवला.

शाडूची माती परत वापरायची म्हणजे त्यात शक्यतो काही भेसळ होऊ द्यायला नको. त्यामुळे बाप्पा रंगवायचा नव्हता. पण सखी आणि तिच्या आईच्या बाप्पासोबत माऊने तिचाही बाप्पा गेरूने रंगवून टाकला.

माऊचा बाप्पा बनेपर्यंत तिकडे आजीनेही एक मस्त बाप्पा बनवून ठेवला होता. या वर्षी पुन्हा एकदा मी बाप्पा बनवलाच नाही त्यामुळे.


असे दोन दोन बाप्पा मग मोदक खायला घरी आले. :)





बाप्पाची सजावट फुला – पानांनी केल्यामुळे पानं – फुलं सुकतील तसा त्यात बदल करता येतो. त्यामुळे आमचा बाप्पा रोज वेगळा दिसतो!




***
माऊसोबत बाप्पा केल्यावर लक्षात आलेल्या गोष्टी म्हणजे - छोट्यांसाठी बाप्पा बनवतांना माती थोडी सैल भिजवलेली असली तर बरी. घट्ट मातीचा लाडू वळायला त्यांना अवघड जातो. हात – सोंड – डोकं जोडायला टुथपिकचे तुकडे वापरले. नाही तर ते घट्ट जोडणं मुलांना अवघड जातं. (माऊच्या बाप्पाचं डोकं तर वाळल्यावर चक्क गोल गोल फिरत होतं. त्यामुळे आमचा बाप्पा आपोआपच मान हलवणारा झाला!) साधारण अर्धा अर्धा किलो मातीचा बाप्पा दोघींनी बनवला. या आकाराचे लाडू वळायला त्यांना बरे पडले. छोटासा लाडू बनवून टुथपिकने त्याला मोदकाचा आकार द्यायला छोट्यांना मज्जा येते.

***
माऊला बाप्पाला दोन पूर्ण दात लावायचे होते. “अग, पण बाप्पाला एकच दात असतो!” मी म्हटलं. मग माऊचा विचार बदलला.
“माझ्या बाप्पाला दातच नको!”
“का ग?”
“तो गर्ल आहे. गर्ल ला असे बाहेर आलेले दात नसतात!”
“अग, बाप्पा आहे ना तो! गर्ल कसा असेल?”
“का? माझा बाप्पा आहे ना!”
या वर्षी तरी बाप्पाला त्याचा एक दात मिळालाय. पण आई विचार करते आहे. माऊचा बाप्पा आहे, मग तिला पाहिजे, तर त्याने गर्ल असायला काय हरकत आहे?
 

Friday, September 8, 2017

टेकडी कुणाची?

 परवा आमची टेकडी अगदी फोटोसकट पेपरात झळकली. चुकीच्या कारणासाठी – तिथे फिरायला गेलेल्या एका बाईंचा मोबाईल आणि साखळी चोरट्यांनी हिसकावून घेतली म्हणून. त्या तिथे नियमित फिरायला जाणार्‍यातल्या होत्या. वेळही सोमवारी संध्याकाळी सहा ते सातच्या मधली, म्हणजे शनिवार – रविवार पेक्षा कमी, पण थोडीफार वर्दळीचीच. चोरांचा माग लागला, चोरलेला मालही पोलिसांना परत मिळाला.

चोरांपैकी एक मोठा, बाकी सगळे कायद्याच्या मते अज्ञान. हा मोठा चोर टेकडीजवळच्या झोपडपट्टीत राहणाराच.  योगायोगाने माझ्या कामाच्या बाईच्या ओळखीतला. (त्याच दिवशी संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला माझ्या बाईला भेटलाही होता वस्तीत.) साधारण २३ वर्षं वय. आई धुणीभांडी करते, बाप रोजंदारीवर मिळेल ते काम करतो. हा घरातला मोठा मुलगा. अजून लहान बहीण आणि भाऊ आहेत, ते शिकताहेत. हा काहीही कामधाम करत नाही. यापूर्वीही त्याने असले उद्योग केलेत, हे माहित वस्तीत सगळ्यांना माहित आहे. चोर्‍यामार्‍या करायच्या, पोलीस आलेच तर वस्तीमागच्या टेकडीवरच्या रानातून पसार व्हायचं. टेकडीवर बसून दारू ढोसायची असले याचे उद्योग. याच्याकडे एखादा सुरासुद्धा असायचा कधीमधी. त्यामुळे कुणी त्याच्या वाटेला जायचं नाही. आपल्या पोरांना असली संगत नको म्हणून त्याला लोक फारसे आपल्या भागात येऊ द्यायचे नाहीत. माझ्या बाईंचा नवरा तर संध्याकाळी सहानंतर त्यांच्या मुलग्यांना सुद्धा घराबाहेर पडू देत नाही!
चोरीची तक्रार नोंदवल्याबरोबर लगेच पोलीस वस्तीत आले. पोलिसांना चुकवायला हा दुसरीकडे पळून गेला. तिथेही पोलीस मागावर आलेत म्हटल्यावर उंच इमारतीवरून ड्रेनेजच्या पाईपला धरून उतरण्याच्या प्रयत्नात हा खाली पडला. ससूनला ऍडमिट केलंय, पाठीला जबरदस्त मार लागलाय, बहुतेक दोन्ही पाय लुळे राहणार आता आयुष्यभर. पोलीस – न्यायालय काय शिक्षा देतील तेंव्हा देतील, पण पोराला वाटेल तसा बहकू दिल्याची शिक्षा आईबापांना भोगावी लागणार त्याला आयुष्यभर पोसून. 

बाकी सगळं जैसे थे होईल हळुहळू. म्हणजे याचे साथीदार - मित्र कदाचित थोडे दिवस जरा दबून राहतील पोलिसांना. वस्तीतल्या मुलींना जपणारे, त्यांची लवकरात लवकर लग्नं लावून "जबाबदारीतून मोकळे होणारे" आईबाप पुन्हा या पोरांच्या गुंडगिरीकडे काणाडोळा करणार. अर्धवट शिकलेल्या पोरांना बापासारखी मजूरी करायला लाज वाटणार, दुसरं मनासारखं काम क्वचितच सापडणार. नाहीतर ते पुन्हा इकडेच वळणार.
या झोपडपट्टीच्या जवळ मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. तिथे गाड्या धुणं, सिक्युरिटी अशी थोडीफार कामं या वस्तीतली मुलं करतात. बरीच मुलं रिक्षाही चालवतात. इव्हेंट मॅनेजमेंट, भंगारचा धंदा अशी कामंही करतात. पण आईबापाच्या पैशावर गुंडगिरी करणारी मुलंही इथे भरपूर आहेत. वस्तीवर लक्ष ठेवायला पोलिसांनी एक चौकीच केलीय आता जवळ. पण या मुलांशी बोलू शकेल, त्यांना कामाला लावू शकेल असं कुणी मला तरी माहित नाही.

उगाच सुखाचा जीव धोक्यात कशाला घालायचा म्हणून टेकडीवर जाणार्‍या सोसायटीवाल्यांची संख्या रोडावणार, सोसायटीतल्या सोसायटीमध्ये फिरणार्‍यांची वाढणार. यात सगळ्यांचाच तोटा आहे. कायदा पाळणारे जितके कमी लोक टेकडीवर येतील, तेवढी टेकडी जास्त धोक्याची होते. जास्तीत जास्त लोकांनी तिथे येत राहिलं पाहिजे. तिथे जाग रहायला हवी किमान सकाळ – संध्याकाळी तरी. फक्त फिरायला येणार्‍यांनी अवेळी, एकट्यानी गच्च झाडीमध्ये शिरणं, महागडे मोबाईल – दागिने मिरवणं यातून चोराला निमंत्रण दिल्यासारखं होतं याचं भान राखायला हवं. (सोमवारी चोरी झाली त्यांनी यापैकी काही करून मुद्दाम चोरी ओढवून घेतली असं म्हणायचं नाही मला, पण खबरदारी घेणं महत्त्वाचं.) वेगवेगळ्या वर्गातली माणसं जिथे एकत्र येतात अशा सुरक्षित सार्वजनिक जागा आपल्या शहरांमध्ये आधीच कमी आहेत. त्या जास्तीत जास्त राखायला हव्यात.  सोसायट्यांमध्ये क्लोज सर्किट टिव्ही बसवून आणि महागातल्या सिक्युरिटी एजन्सी नेमून शहर सुरक्षित बनत नाही, फक्त मोजके सुरक्षित घेटो तयार होतात. आणि शहाणे लोक या घेटोच्या आत जितके जास्त राहतील, तेवढं बाहेरचं शहर जास्त असुरक्षित होतं असं मला वाटतं.