Wednesday, November 11, 2020

अंक बघावा करून

 शाळा – कॉलेजात असताना फलकलेखन हे माझं आवडतं काम होतं. म्हणजे आपल्याला आयुष्यात दुसरं काही जमलं नाही, तर साईनबोर्ड पेंटिंगचा धंदा करून चार पैसे कमवता येतील असा माझा विचार होता. पण नोकरी सोडल्यावर चार पैसे कमवण्याची वेळ आली तोवर डिजिटल माध्यमांनी साईनबोर्ड पेंटिंगला खाऊन टाकलं होतं आणि फ्लेक्सचा जमाना आला होता. त्यामुळे माझ्या बॅकअप प्लॅनचा पैसे कमावण्यासाठी आता काही उपयोग नाही. पण लेटरिंग, सुलेखन, लेआऊट, रंगसंगती या सगळ्यात काहीतरी करण्याची खुमखुमी अजून टिकून होती. यंदा आमच्या सोसायटीचा डिजिटल दिवाळी अंक करायचं ठरलं आणि त्या निमित्ताने मी ही हौस पुरवून घेतली.😄 हा पहिलाच अंक असल्यामुळे अगदी लोगो, फॉन्टपासून सगळं नव्याने ठरवायला वाव होता. त्यामुळे अंकाची तांत्रिक बाजू सांभाळायला मजा आलीच, खेरीज संपादनामध्ये बरंच काही शिकायला मिळालं.

दहावीच्या सुट्टीमध्ये प्रबोधिनीच्या संचालक कार्यालयात काम करत होते. तेव्हा अण्णांची पत्रं लिहिताना आधी कच्चा खर्डा लिहायचा, त्यात शुद्धलेखनाच्या चुका असतील तर अण्णा तो शब्द तीन वेळा लिहायला सांगायचे. त्यात मराठी शाळेतून शिकल्याने इंग्रजी पत्रलेखनाची बोंबच असायची. म्हणजे अण्णा बाबांना भेटले तेव्हा माझं इंग्रजी किती कच्चं आहे हे त्यांनी काळजीने सांगितलेलं आठवतंय. अकरावीपासून इंग्रजी माध्यम आलं, इंग्रजी वाचन वाढलं आणि इंग्रजी कच्चं असण्याची काळजी करण्याचे दिवस मागे पडले. आपण मराठी आणि इंग्रजीतून बर्‍यापैकी आणि शुद्धलेखनाच्या चुका न करता लिहू शकतो हा अत्मविश्वास आला.

 

लिहिण्य़ाची जागा टायपिंगने घेतली आणि घात झाला. वर्डमधल्या स्पेलचेकने स्पेलिंग आणि व्याकरणाची वाट लावली. त्यात ब्लॉगवर लिहायला लागले आणि लिहिलं की प्रसिद्ध, त्याच्यावर ताबडतोब प्रतिक्रिया ही सवय लागली. लिहिलेलं स्वतः तपासणं, अजून कोणी तपासणं, दुरुस्त करणं हे मागेच पडलं. तुमचा ब्लॉग तुमच्या हक्काचा. तिथे तुम्हाला कोण हटकणार? शुद्धलेखनाच्या चुका आवर्जून दाखवून देणारे हेरंबसारखे मोजके मित्र वगळले, तर काहीही लिहा, कसंही लिहा, चालतंय अशीच परिस्थिती.

 

अंक करतानाही सुरुवातीला माझ्या डोक्यात ब्लॉगस्वरूपात प्रसिद्ध करण्य़ाचाच विचार होता. सुदैवाने बाकी संपादकांना पिडिएफ प्रकाशित करावी असं वाटत होतं. पिडिएफ करायची म्हणजे ब्लॉगसारख्य़ा सापडल्या तर, सापडतील तेव्हा चुका दुरुस्त करून भागणार नव्हतं. शिस्तीत संपादन करणं, मुद्रितशोधन करून घेणं गरजेचं होतं. (आणि आर्टवर्क, लेआऊट वगैरेलाही जास्त वाव होता.) हे करताना लक्षात आलं, की आपल्या लिहिण्यातली शिस्त पार लयाला गेलेली आहे. लेखनातल्या चुका तर कितीही वेळा वाचलं तरी दिसतच नाहीयेत. अंकात चुका राहून जाऊ नयेत म्हणून नाईक काकांनी खूप मेहनत घेतली. वृत्तपत्रकारितेतल्या त्यांच्या अनुभवामुळे ब्लॉगालेखनातून आलेल्या “पी हळद नि हो गोरी” सवयीला जरा लगाम लागला. ब्लॉग तुम्हाला लिहितं करतो, पण तुमच्यातल्या संपादकाचा हळूहळू कुंभकर्ण होत जातो. या अंकाच्या निमित्ताने त्याला जरा जाग आली.


अंकासाठी लिहिण्याचं आवाहन सगळ्यांना करतांना थोडी काळजी वाटत होती. कोण, कसं लिहिणारं आहे काहीच अंदाज नव्हता. किती प्रतिसाद मिळेल याचीही कल्पना नव्हती. आलेल्या लेखनातून निवड करण्याची, कुठलं लेखन नाकारण्याची चैन आम्हाला करता येणार नव्हती. अंक वाचनीय व्हायचा असेल, तर तुम्ही चांगले विषय, चांगले लिहिणारे हेरून त्यांचा अंकात जास्तीत जास्त समावेश असेल असं बघा या अंजलीच्या सूचनेचा खूप उपयोग झाला. त्यामुळे लेखनात विषयांचं, अनुभवांचं वैविध्य नक्कीच आणता आलं. साहित्याच्या मोजपट्टीवर अंक कदाचित तेवढा सरस होणार नाही, कारण साहित्याच्या दृष्टीने आम्हीच फार होमवर्क केलेला नाही.


एक जाणवलेली गोष्ट म्हणजे अंकात शाळकरी वयातले लेखक आहेत (त्यांच्यासाठी इंग्रजी माध्यम चालेल असं आम्ही म्हटलं होतं) आणि मग पस्तीस ते ऐशी - पंचाऐशीपर्यंतचे. अठरा ते पस्तीसमध्ये कोणीच नाही. या लोकांपर्यंत एक तर आम्हाला अजिबातच पोहोचता आलं नाही, किंवा ते मराठी लेखन-वाचनापासून इतके दू गेले आहेत की त्यांचा सहभाग शून्य होता.  


आपल्या सोसायटीचा असा अंक होतो आहे, अंक अमुकअमुक तारखेला प्रकाशित होईल, आपण झूम मिटिंग घेऊन प्रकाशनाचा कार्यक्रम करूया अशा प्रत्येक मेसेजला भरभरून प्रतिसाद मिळाला, भरपूर कौतुक झालं. अंकात सहभागी असणार्‍या आणि नसणार्‍याही सगळ्यांकडून. त्यामुळे हा फक्त या वर्षी पुरता “करोना दिवाळी अंक” राहण्याऐवजी पुढेही अंक होत राहतील असं वाटतंय.



अशी ही आमच्या दिवाळी अंकाची गोष्ट. या सगळ्या प्रक्रियेतून तयार झालेला अंक बघायचा असेल, तर संपूर्ण अंकाची पिडिएफ (१२ एम.बी.), चार भागात पिडिएफ (३ ते ५ एम.बी.चा एकेक भाग) आणि ब्लॉग असे तीन पर्याय आहेत:


संपूर्ण अंक पिडिएफ 


भाग १ पिडिएफ 

भाग २ पिडिएफ 

भाग ३ पिडिएफ 

भाग ४ पिडिएफ 


ब्लॉगची लिंक  

Monday, August 31, 2020

मॅकरोनी शेंगोळे

 नवरोबा घरी नाही म्हटल्यावर सव्वा - दीड माणसांचा स्वयंपाक करायचा जाम कंटाळा आलाय. काल सकाळी केलेल्यावरच दिवस भागवला. आज काहीतरी करणं भाग आहे पण वरण – भात – पोळी भाजीचा विचार पण करवत नाहीये. ज्वारीचं पीठ शिळं होतंय, त्याच्या नुडल्स कराव्या का? पण त्या वाफवून एवढ्या इडलीच्या ताटल्या कोण घासत बसणार? त्यापेक्षा पास्ता सारखं डायरेक्ट उकळत्या पाण्यातच शिजवलं तर? आज फार डेंजर प्रयोग होण्याची दाट शक्यता आहे. हे बिघडलं तर माऊला दोन पोळ्या करून भेंडीच्या शिळ्या भाजीसोबत देईन, पण तरीही करून बघणारच म्हणून मी इरेला पेटले आहे. 

कांदा, टोमॅटो, मटारचे थोडे दाणे, एक कणीस, लसूण, पिझ्झाबरोबर आलेलं एक एक ओरेगानो आणि चिली फ्लेक्सचं पाकीट, थोडं अमूल बटर एवढं साहित्य आहे असं पाहिलं, आणि पाणी उकळायला ठेवलं. त्यात नूडल्स घालायला ’अंजली’चा सोर्‍या काढला. कुठली चकती लावावी याचा विचार करतांना ही सापडली. 



सोर्‍याच्या बॉक्सवर हिचा उल्लेखच नाहीये. याचा आयुष्यात कधी काही उपयोग करत असेल का कुणी? एकदा जुगार खेळायला लागलं की नशा चढत जाते म्हणतात. तसं एकदा अतरंगी प्रयोग करायचं ठरवलं, की त्यात अजून काय काय सुचायला लागतं. तर ही चकती वापरून बघायचीच ठरवली. मॅकरोनीपेक्षा जाड होईल, पण काय व्हायचं ते होऊ देत म्हणून हट्टाने हीच चकती लावली.

उकळत्या पाण्यात मग हे "एल्बो मॅकरोनी शेंगोळे" सोडले. एक एक सोडेपर्यंत बराच वेळ वेळ गेला. त्यामुळे पास्ता शिजेतोवर दुसर्‍या गॅसवर सॉस करायचा बेत असफल झाला. रेड सॉस सदृश काहीतरी तयार केलं, तोवर इकडे पास्त्ता जरा जास्तच शिजला होता. भाकरी केल्यावर उरलेलं पीठसुद्धा टाकून द्यायला मला जिवावर येतं. या पास्त्याचं पाणी इतकं दाट होतं, की ते ओतून देण्याचा मी विचारही करू शकले नाही. पास्ता चाळणीवर काढला, खालचं पाणी पास्ता सॉसमध्ये घालून हे पास्ता सूप आहे असं जाहीर केलं. हे सूप उकळेपर्यंत पास्ता गार पाण्याने धुवून घेऊन त्यावर तेल घातलं. थोडं बटर घालून पास्ता शिजवलेल्या भांड्यातच(हे महत्त्वाचं.) परत गॅसवर चढवला, त्यात सूप ओतून दोन मिनिटं रटरटू दिलं. मीठ – साखर ॲडजेस्ट केली. मॅकरोनी शेंगोळे तयार झाले. 


माऊला, तिच्या सखीला, सखीच्या आईलापण हा पदार्थ आवडल्यामुळे याला जीवघेण्या प्रयोगाऐवजी मॅकरोनी शेंगोळे फ्यूजन रेसिपीचा दर्जा देण्यात आलेला आहे. घरचा पास्ता, वरणाफळं न आवडणारा सदस्य नसला की एखाद्या पावसाळी दिवशी वन डिश मील म्हणून हे पुन्हा करणार. 

Tuesday, August 11, 2020

पुन्हा केना

केन्याची फुलं टेकडीवर दर पावसाळ्यात दिसतातच, अणि दर पावसाळ्यात त्या फुलांचा न चुकता फोटो काढला जातोच! 

शेतीच्या शाळेत केन्याची पहिल्यांदा जवळून गाठ पडली. कुठल्याही शेतकर्‍याला विचारा ... शेतात केना म्हणजे त्याच्यासाठी मोठं संकट. वेड्यासारखा पसरतो तो. प्रत्येक पेरातून उगवून येतो, बियांमधूनही येतो, आणि मुळांनाही रनर्स असतातच. त्यामुळे शेतातला केना म्हणजे उपटून दूर टाकून नष्ट करण्य़ाची गोष्ट. त्याच्यावरचा इलाज काही सापडला नव्हता. केना फार वाढण्यापूर्वीच शेतातून काढून टाकायचा हेच ऐकायला – वाचायला मिळालं सगळीकडे. 

शेतातल्या केन्याविषयी मागच्या वेळी लिहिलं तेंव्हा समजलं, की केन्याची भजी आणि भाजीपण खातात. यंदा लॉकडाऊनमुळे सोसायटीच्या बागेत बरंच तण माजलंय, त्यात केनाही फोफावलेला सापडला. त्याची भाजी करून बघावी म्हणून थोडी कोवळी पानं घेतली. 


मुगाची डाळ, कांदा घालून केन्याची कोवळी पानं आणि देठ यांची भाजी केली, ती इतकी सुरेख लागली! 


आता वाटतंय, शेतात आपोआप येणारा बहुगुणी केना उपटून टाकून भाजीची लागवड करणं म्हणजे वेडेपणा आहे. धो धो पावसात सगळ्या पालेभाज्या जमीनदोस्त होतात तेंव्हाही हा जमिनीचा दोस्त टिकून राहतो, मस्त पसरतो. त्याच्या मुळांवरच्या गाठींमुळे जमिनीतल्या नत्राचं प्रमाण वाढतं, जमीन सुपीक होते. गुरं केना खातात, केन्याने दूध वाढतं. त्याचे अनेक औषधी उपयोगही सांगितलेले आहेत. प्रमाणाबाहेर केना खाल्ला तर तो सारक आहे. 

एवढे सगळे गुण असणारा केना खाल्ला का जात नाही, विकला का जात नाही? त्याला भाव आला, तर शेतातला केना उपटून लांब कुठेतरी (तणनाशक मारून?) नष्ट करून दुसरं पीक घेण्याऐवजी एक पीक केन्याचं घेणं परवडेल. केना तण राहणार नाही, आणि त्याला संपवण्याची समस्याही उरायची नाही!    

केन्याविषयी अजून थोडी माहिती इथे, इथे आणि इथे सापडेल.

Friday, June 19, 2020

लॉकडाऊनच्या गोष्टी

शंभर शब्दातल्या गोष्टी लिहायचा प्रयत्न 😊

लॉकडाऊन झाला. नवर्‍याचं हॉटेल बंद झालं. मालक चांगला आहे, पुढच्या महिनाभराचा पगार दिला त्यानं. आपण तर कामाला जाऊ शकत नाही. बाई पैसे देतीलही, पण फुकटचे कसे घ्यायचे? आधी उसने घेतलेले फेडले नाहीत अजून. आहे त्यात भागवलेलं बरं.

पहिल्या लॉकडाऊन पाठोपाठ दुसरा, तिसरा, चौथा संपला. अजून कामं सुरू नाही झाली. धान्य रेशनवर मिळालं, थोडंफार वाटप पण झालं वस्तीत. मोठा आधार मिळाला त्याचा. पोटापाण्याची सोय झाली. रोज डेअरीवाला विचारतो दूध नेतेस का म्हणून. इतक्या वर्षांचं गिर्‍हाईक आहे. कधी उधारी थकवली नाही आपण. आज तो द्यायला तयार आहे. पण आपली ऐपत नसताना कशाला! नकोच ते. त्यापेक्षा बिनादुधाचा चहा बरा. 
  
***

लॉकडाऊन झालाय. गेल्या महिन्यापर्यंत पैसे गावी पाठवत होतो... बिवीबच्चे तो उधर है, घर उधर है. इथे रहायचं ते पोटासाठी. काम बंद झालंय सगळ्यांचंच. शंकर पण म्हणाला. त्याचे तर मागच्या कामाचे पैसे पण थकलेत. मुकादम फोन उचलत नाही. इथे प्रत्येक गोष्टीलाच पैसे मोजावे लागतात. खोलीचं भाडं भरलं नाही तर बाहेर काढीन म्हणतोय मालक. किती दिवस रांगेत उभं राहून पोळीभाजी घ्यायची? शंकरची स्कूटर पडलेली आहे. सुतारकामाची अवजारं विकली तर पेट्रोलचे पैसे तर सुटतील. तीन दिवस गाडी चालवली तर पोहोचू घरी. एकाला दोघं आहोत, गाडी बंद पडली तर चालू. पण आता आपल्या माणासात जायचंय.

*** 

माझी इंग्लीशची ओरल झाली, चिऊची बाकी आहे अजून. काऊची पण. आणि गाण्याची परीक्षा तर सगळ्यांचीच. ओरल्स झाल्या की मग लेखी परीक्षा, आईस्क्रीम पार्टी, आणि मग सुट्टी! सुट्टीमध्ये कॅम्पला जायचंय. अक्काकडे जायचंय. स्लीपओव्हरला पण पाठवेल का आई? मोठ्या झालोय आता आम्ही. इतकं काय काय करायचं ठरलंय सुट्टीमध्ये ... पण शाळा काही सुरू होत नाही, परीक्षा काही संपत नाही. नुसतं घरात बसून राहतं का कोणी असं? वर्षा टीचरना मिठी कधी मारायची आता? आणि बाबूचे सारखे कॉल असतात, जर्रा आवाज केला की ओरडतो तो. हा करोना भेटूच दे, त्याला मी काठीने मारणार आहे. आणि मोदी आजोबाना पण. नीट सांगत पण नाहीत लॉकडाऊन कधी संपणार ते.

***

Sunday, March 1, 2020

माझी शाळा, माझा वर्ग


आपल्याला अजिबात शिकवायला येत नाही आणि शिकवायला आवडत तर त्याहून नाही याविषयी माझी फार पूर्वीपासून खात्री होती. म्हणजे इतकं बोलणं, समजावून सांगणं, परत परत सांगणं यासाठी लागणारा पेशन्स आपल्याकडे अजिबात नाही हे मी ओळखून होते. त्यामुळे पोटापाण्यासाठी उद्योग शोधतांना शिकवणे या पर्यायाचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मागच्या जन्मी मी काहीतरी फार मोठं पाप केलेलं असणार त्यामुळे माऊकडून अभ्यास करून घेणे हे संकट आपल्या वाट्याला आलंय याची तर माझी खात्रीच आहे. तिनेही असाच काहतरी सॉल्लीड गफला करून ठेवला असणार मागच्या जन्मी, त्यामुळे माझ्यासोबत अभ्यास करायची वेळ तिच्यावर वारंवार येते. असतात एकेकाचे भोग.

पण ... इविद्यालोका नावाची एक संस्था आहे. असंच काहीतरी शोधतांना मला यांचा शोध लागला. आपल्याकडे दुर्गम भागातल्या शाळांमध्ये शिक्षकांची, शिक्षणसाधनांची बर्‍याचदा कमतरता असते. अश्या कित्येक शाळांमध्ये कुणालाही स्काईप वापरून घरबसल्या आठवड्याला दोन तास शिकवता यावं अशी व्यवस्था यांनी उभी केली आहे. शिकवता येत नसलं, तरी कसं शिकवावं यातलं अपल्याला काहीतरी समजतं असा माझा समज आहे. त्यामुळे टीचर व्हॉलेंटियर म्हणून मी इथे नोंदणी केली. शिकवायचं म्हटाल्यावर हे आपलं काम नाही असं वाटत होतंच, तरीही. 

पहिल्या तासाच्या आधी तर जाम टेन्शन आलं होतं. काय बोलायचं या मुलांशी? काय आवडेल त्यांना? कुठल्या भाषेत संवाद साधायचा? बोलतील आपल्याशी, का बुजतील? मुळात हा अव्यापारेषु व्यापार करायला कोणी सांगितलं होतं मला? पण आता हाती घेतलंय तर ते तडीला नेलं पाहिजे म्हणून हजार वेळा “मला जमणार नाही” म्हणून मेल टाकायचा मोह झाला तरी शेवटी तो तास घेतला. आणि मग दुसरा तास घ्यायची वेळ आली. एकेक तास मुलांशी बोलायला दोन तास मी तयारी करत होते. अजूनही प्रत्येक तास घेतांना नको नको वाटत होतंच. त्यात माऊच्या शाळेत कुठल्या तरी असाईनमेंटमध्ये आई काय करते विचारल्यावर तिने बिनदिक्कत “माझी आई टीचर आहे!” म्हणून जाहीर करून टाकलं. (गेल्या वर्षी तिची आई फार्मर होती. त्याच्या आधीच्या वर्षी रिसर्चर होती. दर वर्षी  तिला टीचर वेगळ्या होत्या म्हणून बरं, नाही तर माऊच्या आईच्या प्रोफेशन्सची लिस्ट बघून त्यांना धाप लागली असती. ;) ) पण तास टाळायचा नाही हा माझा हट्ट कायम होता. या सगळ्या शंका हळुहळू कधी कुठे कश्या विरत गेल्या ते समजलंच नाही. मला कधी वाटलं नव्हतं इतक्या सहजतेने आता आमच्या गप्पा व्हायला लागल्या. मुलांना कोडी घालणं, ओरिगामीमध्ये काहीतरी करणं, चित्रं अशी धमाल सुरू झाली. बहुसंख्य मुलांना समजत सगळं होतं. काही तर एकदम तेज होती. पण लक्षात ठेवणं मात्र जमत नव्हतं. वर्गात एकी अशी, की उत्तर चुकलं, तरी सगळ्या वर्गाचं उत्तर एक असायचं.

या मुलांची ओळख करून घेतांना तुमच्या गावात / गावाजवळ कुठली खास गोष्ट आहे म्हणून विचारल्यावर त्यांनी सांगितलं,
मच्या गावाजवळ शिवाजी महाराजांचा किल्ला आहे!”
“किती जवळ?”
“वर्गाच्या दारातून दिसतो इतक्या जवळ!”

हे ऐकून अर्थातच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. माऊसोबत मी हा किल्ला बघायला येणार, तुम्ही दाखवाल का म्हणून मी विचारलं, आणि सगळी पोरं एका पायावर तयार झाली. आता प्रत्येक तासाला तुम्ही कधी येणार म्हणून त्यांची चौकशी सुरू झाली. पावसाळा संपता संपता जायचा माझा विचार होता. पण या वर्षीचा पावसाळा संपेचना. मग परीक्षा, सुट्टी, माऊची वेळ असं करता करता फेब्रुवारी संपायला आला. काही झालं तरी या महिन्यात जायचंच असा माझा निश्चय होता. एकदा ठरलेलं ऐन वेळी रद्दही करावं लागलं. पण अखेरीस माझा निश्चय पूर्ण व्हावा म्हणून या फेब्रुवारीला एक जादा दिवस मिळाला, आणि गेल्या शनिवारी आमचा जायचा बेत ठरला. माझा प्लॅन साधा होता. माऊला लाल डाब्यातून घेऊन जायचं, पोरांना भेटायचं, त्यांच्यासोबत गडावर जाऊन यायचं, आणि मज्जा करायची. पण शाळेतले सगळे शिक्षक – शिक्षिका, सगळी मुलं, आणि माझी मुलं यांनी तो प्लॅन साधा राहू दिला नाही. सगळ्यांचंच आगत्य, प्रेम यांनी भारावून गेलेय मी. आपण शिकवू शकतो, आपल्याकडून कोणीतरी काही शिकेल, आपण कुणासाठी गुरू वगैरे असू असं मी आजवर कधी स्वप्नही बघितलेलं नाही. शनिवारी या सगळ्याला धक्का बसला जोरदार. मुलांशी संवाद साधायची माझी गरज, शिकवायला शिकणं आणि मज्जा एवढंच माझं या खटाटोपामागचं कारण होतं. ही संधी मला दिल्याबद्दल इविद्यालोकावर मी खूश होते. पण हे दुसर्‍या कुणासाठी एवढं मोलाचं असू शकेल असं वाटलंच नव्हतं. मुलांची पत्रं, त्यांनी स्वतः लिहिलेली कविता वाचल्यावर तर काय बोलावं सुचत नाहीये.  

काल जे बघितलं ते चित्र खूप आश्वासक आहे. माणदेशातल्या हजार एक लोकवस्ती असलेल्या गावातली ही जिल्हा परिषदेची शाळा. पहिली ते सातवी सात वर्ग, सहा शिक्षक. मुलं आनंदाने शिकावीत असं वातावरण. त्यांनी शिकावं म्हणून धडपडणारे शिक्षक. मेहनती, हिकमती, समजूतदार, स्वतंत्र मुलं. पुण्यातल्या सगळं आयतं हातात मिळाणार्‍या, सुरक्षित कोषातच जगणार्‍या मुलांपेक्षा ती खूप हुशार वाटली मला.






त्यांच्या गावातली शाळा सातवीपर्यंत आहे. त्यानंतर दहावीपर्यंत शेजारच्या गावातली शाळा. पुढे काय करू शकतील ही? काही थोड्यांची घरची मोठी शेती, पोल्ट्री, गुरं आहेत. ज्यांच्या आईबापांचं हातावर पोट आहे त्यांचं काय? काय करायला हवं त्यांनी? मुलींनी? “जगायला” पुण्यामुंबईला येण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून काय करता येईल? विचार करते आहे. काल पोरांनी जरा जास्तच त्रास दिलाय.

Sunday, February 16, 2020

बाबा

रविवारचा दिवस असावा. शाळा-बिळा कसली घाई असायचे दिवस नव्हतेच ते, तुम्हीही निवांत होतात. सकाळी सकाळीच आपण दोघं फिरायला गेलो होतो. नदीवर. मस्त सोनेरी ऊन पडलेलं होतं. काय गप्पा मारल्या आपण, काय खेळलो ते काही आठवत नाही, पण नदीकडे जाणारा तो रस्ता, सोनेरी ऊन, दोन-तीन वर्षांची मी बाबांचा हात धरून फिरायला चाललेय हा आयुष्य समृद्ध करणार्‍या क्षणांच्या अल्बममधला फोटो पक्का मनात ठसलेला आहे माझ्या.

अजून दोन तीन वर्षांनंतरची गोष्ट. कशावरून तरी मी रुसले होते. आईने नेहेमीप्रमाणे सहज माझी समजूत काढली, आणि मी जेवायला आले. तेवढ्यात तुम्ही मला काहीतरी म्हटलं, आणि मी  पुन्हा फुरंगटून बसले. “आता तुम्हीच काढा तिची समजूत!” आई वैतागून म्हणाली. हे काही तुम्हाला जमण्यातलं काम नाही हे उमजून मी मुकाट्याने तुमच्यासोबत जेवायला आले.

आजूबाजूच्या घरातलं वातावरण आणि आपल्या घरातलं वातावरण यात खूप फरक होता. आपल्या घरात नवरा-बायकोचं भांडण हा प्रकार व्हायला आधी वेगळं मत लागतं, तेच नव्हतं. आणि घरात बाबांना मत नसलं, तरी बाकी सगळ्यांना मतं होती, आणि ती मांडायची मोकळीकही होती. फार वैतागली तर आई कधीतरी आम्हाला एखादा धपाटा घालायची, पण तुम्ही कधीच हात उगारला नाहीत. आणि तुम्ही चिडलात, तरी तुमचा राग एका क्षणात कसा गायब करायचा, ते आम्हाला सगळ्यांनाच माहित होतं.   

एक घर म्हणून एकत्र खूप मज्जा करायचो आपण. भटकंती, खाण्याचे प्रयोग, वैज्ञानिक प्रयोग, गाणं ऐकणं, आवडत्या गाण्यांच्या कॅसेट्स बनवून घेणं, पुस्तकं विकत घेऊन वाचणं – लहान गावात राहिलो तरी खूप समृद्ध होतं आमचं बालपण. आईच्या योजना आणि बाकीच्यांची त्याला मनापासून साथ असं हे सगळं चालायचं. माझ्या जन्माच्याही आधीची, इगतपुरीला असतानाची गोष्ट. कळसूबाईला जाऊन यायचं ठरलं तुमचं सगळ्यांचं. खूप चढायला लागतं अशी ऐकीव माहिती. मग सगळ्यांना जमेल का नाही ते समजावं, म्हणून तुम्ही आधी एकटेच कळसूबाई चढून आलात. आठवडाभरात मग तुम्ही, आई, आंबेकर काका, काकू असे सगळे कळसूबाईला गेलात. ट्रेकिंगचे बूट, सॅक, कपडे असला काहीही जामानिमा नसताना. बिनाकामाचं घराबाहेर कशाला पडायचं असा विचार करण्याच्या काळात तुमची अशी भटकंती चालायची. तुम्ही एकटे गाडी चालवणारे असताना नागपूरहून गोव्याला गाडी चालवत सुद्धा ट्रीप निघायची.    

तुम्ही, भाऊ, मी आपली तिघांची एक सांकेतिक भाषा होती. अगदी घरातल्या बाकीच्यांनासुद्धा समजायची नाही ती. पण बाकी ट च्या, रच्या वगैरे भाषांपेक्षा युनिक ... म्हणजे बोलायला सोपी पण समजायला अवघड अशी. एरवी फारसे गप्पा न मारणारे तुम्ही या भाषेत मात्र भरपूर बोलायचात. अगदी शेवटी पार्किनसनिझमने तुम्हाला तुमच्या शरीरात कोंडून ठेवलं होतं, तेंव्हाही ही भाषा ऐकून मात्र तुमचे कान टवकारायचे. या भाषेसारखेच आपले काही विनोद पण खास होते ... बाकी कुणाला न समजणारे.

आम्ही मराठी शाळेत शिकलो. पुढे कॉलेजमध्ये इंग्रजीशी जुळवून घ्यायला फारसं जड गेलं नाही, कारण घरात मराठी इतकीच इंग्रजी पुस्तकंही होती. आणि कुठला शब्द आडलाच, तर डिक्शनरीमध्ये शोधायची वेळ कधी यायची नाही – तुम्हाला विचारणं पुरेसं होतं.


अतिशय बुद्धीमान आणी कर्तबगार बाप, सुगरण आई. पण दोघांचे सूर कधी जुळलेच नाहीत. आयुष्यातल्या सगळ्या वैफल्याचा राग त्यांनी आपल्या मुलांवर काढला. प्रेम कसं असतं हे लहानपणी अनुभवायलाच मिळालं नाही तुम्हाला. त्यामुळे आई तुमच्या आयुष्यात आल्यावर सगळं विश्वच बदलून गेलं तुमचं. तिच्यावर मनापासून प्रेम केलंत तुम्ही. पण आयुष्यातले सगळे निर्णयही तिच्यावरच सोडून निवांत झालात.

आईच्या कर्तृत्वापुढे तुम्ही कुठेच नव्हता. पण तुमची काही हरकत नव्हती त्याला. पुरुषी अहंकार, हेवा, मत्सर अशा कशाचा तुम्हाला गंधही नव्हता. लहान मुलाची निरागसता, सरलता होती तुमच्याजवळ. आई सांगते, की दवाखान्यामध्ये कुणीतरी तुमच्यावर अफरातफरीचा आळ घेतला कधीतरी. पण “इतका चालूपणा या माणसाला करताच येणार नाही!” म्हणून तुम्हाला निर्दोष ठरवलं त्यांनी.  

आईचं आणि तुमचं आयुष्य फार सुंदर बनवलंत तुम्ही दोघांनी. उत्तम पुस्तकं, उत्तम संगीत, उत्तम माणसं असं सगळं जोडलंत, भरपूर फिरलात, मोकळ्या मनाने अनुभव घेतलेत. बदलायची, शिकायची तयारी ठेवलीत. शक्य तिथे तिथे लोकांना मदत केलीत. लोकांच्या नजरेतून मुलं यशस्वी नव्हती तेंव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. जे योग्य वाटलं, ते सोयीचं नसलं तरी केलंत.

मला आठवतंय, एक दिवशी झोपतांना तुमच्या हातावर काहीतरी लागलेलं दिसलं. काय लागलंय म्हणून मी विचारलं. “काही नाही. रक्त दिलं म्हणून असं दिसतंय” तुम्ही सहज म्हणालात.

कुठल्याही गोष्टीला शेवट असतोच. तो होणारच होता. पण त्याने असं पाकळी पाकळीने तुम्हाला मिटवत, अनोळखी करत जायला नको होतं असं वाटतं. चित्र काढण्यासाठी तुमचा फोटो शोधत होते. गेल्या पाच सहा वर्षातल्या एकाही फोटोत मला तुम्ही ओळखीचे वाटला नाहीत. पायाचं एवढं मोठं ऑपरेशन झालेलं असताना एका आठवड्यात दोन वेळा कळसुबाई चढणार्‍या माणसाला वॉकर घेऊनही चालता न येणं बघणं फार दुःखाचं असतं बाबा.

Thursday, January 30, 2020

गोड गोष्ट



माझ्या गॅलरीत हा नेस्टिंग बॉक्स कित्येक वर्षांपासून होता. कुठल्याच पक्ष्याला आजवर ती जागा घरासाठी पसंत पडली नसावी. आठ - दहा महिन्यापूर्वी तिथे मधमाश्या रहायला आल्या. घरात एवढ्या जवळ मधमाश्या म्हणजे काही धोका तर नाही ना, काय करायला हवं हे विचारायला अमित गोडसेंना फोन केला. त्याचा फोन लागला नाही म्हणून मग मैत्रिणीकडून त्याचा सहकारी प्रवीण पाटील याचा नंबर मिळाला.

या माश्या काहीही करत नाहीत, पोळ्यावर रात्री प्रकाश पडणार नाही एवढं बघा, आणि मोठा आवाज टाळा एवढीच काळजी घ्यायला त्यानी सांगितलं आणि आमच्या नेस्टिंग बॉक्समध्ये आलेले शेजारी लवकरच नव्या घरात रुळले. रात्री गॅलरीतला दिवा न लावणे एवढंच पथ्य आम्ही पाळत होतो. पोळ्यापासून एक फूट अंतरातल्या झाडाच्या फांद्या छाटण्यालासुद्धा त्यांची काहीच हरकत नव्हती. माझ्याकडच्या तुतीची खूपशी फळं पिकण्यापूर्वी झडून जायची, ती आता टिकायला लागली. यात वाढलेल्या परागीभवनाचा काही संबंध असावा असं मला वाटतं. पुढचे कित्येक महिने अनइव्हेंटफुल गेले. सकाळी त्यांची कामाला जायची लगबग बघून मला ऑफिस भरायच्या – सुटायच्या वेळी नळ स्टॉपच्या सिग्नलला थांबल्यासारखं वाटायचं. सगळ्यांना मरणाची घाई. फुलं काय सुकून जाणार आहेत का दोन मिनिटं उशीर झाला तर? :)

असं सगळं गेल्या महिन्यापर्यंत सुरळित चाललं होतं. पण मग माश्यांची लोकसंख्या वाढून त्यांना झोपायला नेस्टिंग बॉक्स पुरेनासा झाला. रात्री थोड्या माश्या बॉक्सच्या बाहेर झोपायला लागल्या. त्यांना रात्री घरातल्या दिव्यांचा प्रकाश दिसायला लागला, आणि उठून कामाला लागायची वेळ झाली म्हणून त्या झोपण्याऐवजी घरातल्या दिव्यांभोवती फिरायला लागल्या. त्या फिरून थकल्या, की भिंतीवर किंवा जमिनीवर बसायच्या, आणि मग मी त्यांना बाहेर परत सोडायचे. एक – दोन वेळा माशी पायाखाली आली / हाताखाली चिरडली गेली तॆंव्हा मला चावली होती, पण दोन चार दिवस जरा दुखण्यापलिकडे त्याचा काही त्रास झाला नव्हता. अशी घरात बसलेली माशी एकदा नवर्‍याला चावली. म्हणजे माशी भिंतीवर बसली होती, तिला याचा धक्का लागला आणि ती चावली. त्याला याची जोरदार reaction आली आणि भरपूर सूज येऊन ठणकायला लागलं. जवळजवळ आठवडा लागला सूज उतरायला. तेंव्हापासून संध्याकाळी घरातले दिवे लावण्यापूर्वी गॅलरीचं दार बंद करायचं एवढी एक  काळजी मी घ्यायला लागले. पण माश्यांची संख्या मुंबईच्या लोकसंख्येसारखी वाढत असावी. आता दार बंद केलं तरी फटीतन रोज चार – पाच माश्या घरात यायला लागल्या, आणि घरातल्या चपला न घालता बेसावधपणे चालणार्‍या सदस्यांना त्यांचा प्रसाद नियमितपणे मिळायला लागला – माऊचा बाबा, माऊची आजी, माऊ अश्या सगळ्यांचा यात नंबर लागला. आता मात्र पोळं हलवायला लागणार हे लक्षात आलं.

पुन्हा एकदा प्रवीण पाटीलला फोन केला, पोळ्याचा – खरं म्हणजे नेस्टिंग बॉक्सचा फोटो पाठवला. आज येऊन त्यानी  आणि त्याच्या सहकार्‍यानी ते पोळं नेस्टिंग बॉक्ससकट काढून नेलंय – मधमाश्या पाळणार्‍या कुणाला तरी देण्यासाठी. हे काढण्याचं काम सगळं इतक्या सहज चाललं होतं – कुठलंही protective gear वगैरे न वापरता – की माऊ आणि तिच्या मैत्रिणी पोळ्यापासून दोन फुटांवरून डोकावून बघत होत्या. “आता नाकाला माशी चावेल, बाजूला व्हा!” म्हणून त्यांना बाजूला करावं लागलं. पोळं काढायचं काम संध्याकाळी अंधार पडल्यावर केल्यामुळे व्हिडिओ / फोटो काढता आले नाहीत मला. पण दिवसा माश्या इकडेतिकडे उडत असतात, त्यांना गोळा करायला वेळ लागतो. रात्री सगळ्या एकत्र मिळतात. त्यामुळे अंधार असताना हे काम करणं त्यांना सोयीचं जातं. हे करताना दोन माश्या घरात आल्या, तर अगदी त्या दोन माश्या सुद्धा शोधून सोबत घेऊन गेलेत ते. जिथे राणी तिथे त्या माश्यांचं घर. ती गेल्यावर या बिचार्‍या मरूनच गेल्या असत्या नाहीतर. एकही माशी न मारता, न दुखावता त्यांना त्यांच्या नव्या घरी नेलंय त्यांनी. Hats off to their dedication!!!


बाकीच्या मधमाश्या काढणार्‍यांपेक्षा यांचा दर बहुतेक जास्त आहे (१३०० रुपये झाले) – पण माश्यांचं पुनर्वसन करताहेत ते, मारून टाकत नाहीयेत. आणि जातांना एक छोटीशी मधाची बाटली भेट म्हणून दिलीय त्यांनी ... इतके दिवस माश्या इथे होत्या म्हणून.  

बर्‍याच दिवसांनी आज रात्री गॅलरीमध्ये दिवा चालू आहे, दार उघडं आहे. घरातली चप्पल न घालता कुणीही बिनधास्त फिरायला हरकत नाहीये. पण आपण त्रास होतोय म्हणून शेजार्‍यांना हुसकून लावलंय अशी काहीतरी बोच वाटतेय. मधमाश्या नसतील तर माणसंही संपून जातील हे माहित आहे, पण मधमाश्या शेजार्‍यांच्या अंगणात असाव्यात, आपल्या नाही अशीच आपली अपेक्षा आहे. माझं घर, माझी जमीन ही दुसर्‍या कुठल्याही प्राण्याची नाही, पक्त माझीच आहे असं म्हणणारा प्राणी फक्त माणूसच असावा.

तुमच्या घरात मधमाश्यांनी पोळं केलंय? पोळं जाळणार्‍याला बोलावून माश्यांना बेघर करू नका. Bee Basket शी संपर्क साधा, मधमाश्यांना नवं घर मिळवून द्या.