Tuesday, August 21, 2018

Love – hate – love

पावसाळ्यात टेकडीवर हा केना खूप वेळा पाहिलाय. त्याच्या गोड दिसणार्‍या निळ्या – जांभळ्या रंगाच्या फुलांचे कौतुकाने फोटोही काढलेत भरपूर.



नंतर मग मैत्रिणीकडून समजले की ही एक रानभाजी आहे, ओडिशामधले आदिवासी याची भाजी खातात. केन्याविषयीचं माझं प्रेम अजून जरासं वाढलं मग.

पण मग शेतीची शाळा सुरू झाली. पावसाळा सुरू झाला, आणि सगळं शेत केन्याने भरून गेलं! “इथलं तण वेळीच काढा, नाहीतर छातीभर उंचीचं रान माजतं दर वर्षी. सापही भरपूर आहेत. त्यामुळे तण उगवून आलं, की नांगर फिरवायचा. पुन्हा एकदा तण उगवून येईल, पुन्हा नांगर फिरवायचा. त्यानंतर परत फारसं तण उगवून येणार नाही” असा जाणत्यांचा सल्ला मिळाला. शेतात ट्रॅक्टर घालायचा नाही असा शक्यतो विचार होता. पॉवर टिलर मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. शहरातल्या शेतात बैलाचा नांगर फिरवायला बैल सुद्धा मिळाले, पण नांगर नव्हता. त्यामुळे पाऊस चांगला सुरू झालाय, शेत नांगरलेलं नाही, तण माजतंय, आणि काहीच पेरलेलं नाही अशी अवस्था झाली. आपण हाताने तण काढावं, का मजूर लावून काढून घ्यावं, आणि तण काढलं, तरी माती मोकळी कशी करणार असे सगळे प्रश्न. कम्पोस्टच्या वाफ्यांवरचं तण काढणं तुलनेने सोपं होतं. मधल्या वाटांवरची जमीन कडक राहिली होती, तिथलं तण हाताने काढणं फारच अवघड जात होतं. नाईलाज म्हणून ट्रॅक्टरचा रोटाव्हेटर फिरवून सगळं तण जमीनदोस्त करावं असं ठरवत होतो आम्ही. आमचा विचार होता की काढलेलं तण जमिनीवर पसरून तिथेच कुजवलं, म्हणजे त्याचंही खत मिळेल जमिनीला. पण तिथल्या अनुभवी माळीकाकांनी सांगितलं, तुमच्याकडचं तण साधसुधं नाही. हा केना आहे. आणि केन्याचे तुकडे करून जरी टाकले, तरी एकेका पेरातून परत उगवून येतो तो – केना इथेच जिरवायचा विचारही करू नका. आमच्या शेतातला केना आम्ही आधी दूर नेऊन नष्ट करतो!

म्हणजे आता रोटारायचा पर्यायही गेला. तण उपटून दूर टाकणं एवढाच पर्याय दिसत होता समोर. आतापर्यंतचा लाडका केना आता माझा शत्रू नंबर एक बनला. खरोखर उपटलेला केना बजूला टाकला, तर दुसर्‍या दिवशी पुन्हा रुजलेला दिसायचा! बाकी तण शेतात ठेवायचं, केना गोळा करून दुसरीकडे टाकायचा (तिथे खत झालंच तर परत शेतात वापरता येईल नंतर) असा क्रम मग सुरू झाला. तण काढणं या कामाचं एकदम व्यसन लागतं. एकदा तुम्ही उपटायला सुरुवात केलीत, की कुठेही तण दिसलं तरी हात शिवशिवायला लागतात! त्यामुळे दिसला केना, की उपट अशी सवय लागली एकदम हाताला!

तण जाऊन खालची जमीन जरा दिसायला लागल्यावर आम्ही काय काय पेरायला सुरुवात केली. या सरींच्या मधला केना पण मी उपटतच होते. पण उपटलेला केना बारकाईने बघितला, तर त्याच्या मुळांवर गाठी होत्या ... म्हणजे हवेतला नायट्रोजन स्थिर करणारे रायझोबियम केन्यावर असतात – केना जमिनीतला नत्र वाढवतो, जमिनीचा कस सुधारतो! नत्र वाढवणारा म्हणून मुद्दाम ताग लावला होता, तागाच्या मुळ्या आणि केन्याच्या मुळ्या बघितल्या, तर केन्याच्या मुळ्यांवर जास्त गाठी होत्या. विकतच्या तागापेक्षा तण म्हणून उपटत असलेला केना जमिनीला जास्त उपयोगी होता. केन्याची शेंग उघडून बघितली, तर त्यात हरभर्‍यासारखी बी होती. केना द्विदल आहे, आणि जमिनीचा मित्र आहे. लवच यू हा केना!

केन्याच्या शेंगेतला हरभर्‍यासारखा दाणा

Saturday, August 18, 2018

शेतीची शाळा ३


द्विदल धान्यांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठींमध्ये र्‍हायझोबियम जिवाणू असतात. या जिवाणूंचं आणि झाडाचं symbiotic परस्परावलंबन आहे. झाडं या जिवाणूंना कर्ब पुरवतात, तर हे जिवाणू हवेतल्या नायट्रोजनचं स्थिरीकरण करून झाडांच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असणारा नत्र जमिनीमध्ये उपलब्ध करून देतात, आणि ही झाडं जमिनीतच कुजवल्यामुळे जमिनीतला सेंद्रीय कर्बही वाढतो. त्यामुळे जमिनीचा कस सुधारतो. अशा प्रकारे जमिनीचा कस सुधारण्यासाठी मुद्दाम झाडं लावण्याला हिरवळीचं खत म्हणतात. कम्पोस्ट करून झाल्यावर चांगला पाऊस झाला आणि जमिनीमध्ये ओलावा आला, म्हणजे हिरवळीचं खत म्हणून ताग पेरा असा सल्ला आम्हाला जाणकारांनी दिला होता. इतके दिवस नुसतं ओल्या – कोरड्या कचर्‍यावर पाणी मारल्यावर खरोखरच काही पेरायचं ही कल्पनाच सुखावणारी होती. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर जरा घाईनेच तागाची पेरणी केली. 

तागाचं बियाणं पेरलं, आणि पावसाने दडी मारली. पावसाची वाट बघणं हा आपल्याकडे शेतकरी होण्यातला अविभाज्य भाग आहे, तर ते काम आमचं सुरू झालं. कम्पोस्ट सॅंडविचवरची जमीन चांगली तयार झालेली होती आणि ओलावा धरून ठेवणारीही. त्यामुळे तिथला ताग चांगला उगवून आला. उघड्या राहिलेल्या पायवाटांवरचा ताग मात्र आलाच नाही. कितीही पाणी घातलं, तरी पाऊस तो पाऊसच. ताग किती वाढवायचा, आणि ताग वाढल्यावर जमिनीवर झोपवून पिकांसाठी वाफे कसे तयार करायचे याचा विचार एकीकडे सुरू झाला. दुसरीकडे आपल्याकडे जागा आणि वेळ दोन्ही मर्यादित आहे, त्याचा चांगल्यात चांगला उपयोग करून घेण्यासाठी वेलवर्गीय भाज्या “ग्रो बॅग्ज” बनवून त्यात लावाव्यात असं ठरलं. 

ग्रो बॅग म्हणजे कुंडीची सुधारित आवृत्ती. पोतं किंवा पिशवी घेऊन त्याची ग्रो बॅग बनवली, म्हणजे कुंडीपेक्षा हवा जास्त चांगली खेळती राहते, आणि कुंडीप्रमाणे हलवणेही सोपे जाते. ५०-५० किलोची पोती घेऊन त्यात पडवळ, दोडका, घोसाळी, दुधी, कारली, काकडी या सगळ्यांसाठी ग्रोबॅग्ज बनवायच्या असं ठरलं. प्रिया भिडेंकडून कुंडी कशी भरायची त्याची काही माहिती घेतली होती, त्याप्रमाणे खालचा ५०% भाग पालापाचोळा भरला. पाचोळा दबण्यासाठी एक – दोन दिवस ही पोती बसायला वापरली. त्याच्या वर घालायला एक भाग नीम पेंड, एक भाग भाताचं तूस, एक भाग कोकोपीट, तीन भाग शेणखत आणि चार भाग माती  अशी “भेळ” तयार केली. पाचोळ्याच्या वर भेळ घालून या सगळ्याचं लवकर कम्पोस्ट बनावं म्हणून त्याला जीवामृत घातलं. प्लॅस्टिकची पोती खराब झाल्यावर त्याचे तुकडे पडतात, तसं नको म्हणून गोणपाटाची पोती घेतली होती – गोणपाट पाण्याने खराब होईल, टिकणार नाही हे दोन मैत्रिणींनी सुचवलं, पण प्लॅस्टिक नको म्हणून गोणपाटच वापरले. (गोणपाट महिनाभरात कुजले, महिनाभराने ग्रोबॅग्ज हलवायची वेळ आली तेंव्हा हे लक्षात आलं. पण ते पुढे.) आठवडाभरात असं वाटलं, की पाचोळा सगळा खाली घालण्यापेक्षा भेळेमध्येच मिसळला, तर लवकर कुजेल. पुन्हा एकदा ग्रोबॅग्ज रिकाम्या केल्या, पालापाचोळा मिसळून परत भरल्या. अजून एक सुचलं म्हणजे यात खालपर्यंत पाणी नीट पोहोचावं आणि हळुहळू झिरपावं, म्हणून प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या भोकं पाडून खोचून ठेवाव्यात का? तेही करून टाकलं मग. एकीकडे पडवळ, दुधी, घोसाळे, दोडका, कारले, काकडी अशी सगळी रोपं तयार करायला ठेवली.

अखेर पाऊस आला, आणि शेत एकदम हिरवंगार झालं. पिकामुळे नाही, तणामुळे. त्याची गंमत आता पुढच्या भागामध्ये.

Friday, July 20, 2018

शेतीची शाळा २

शेतीची शाळा १

शेतीच्या शाळेची सुरुवात पाच गुंठे जमीन वापरायला घेऊन करायची असं ठरलं. ही जमीन विज्ञान आश्रमाच्या आवारातलीच. त्यामुळे तिला कुंपण होतं, चोवीस तास कुणीतरी तिथे असणार होतं. रस्ता, वीज, पाणी (मनपाचं!) मिळवण्याची कुठलीच अडचण नव्हती. फक्त पाणी टंचाई झाली तर पाणी वापरावर काही बंधनं निश्चितच असणार होती. जमीन तशी पडीक होती, ती लागवडीयोग्य करण्यापासून सुरुवात करायची होती. त्यामुळे पहिलं काम होतं तिथला कचरा काढण्याचं. बांधकामाचा राडारोडा, दारूच्या बाटल्या असं वाट्टेल ते होतं तिथे. ते आधी साफ करून घेतलं.

त्यानंतर मातीची तपासणी केल्यावर लक्षात आलं, की या जमिनीमध्ये सेंद्रीय कर्ब खूप कमी आहे, नत्राचीही कमतरता आहे. म्हणजे आता जमिनीचा कस सुधारायला हवा. जमिनीचा कस सुधारण्यासाठी म्हणून तिथे कम्पोस्टिंग करता येईल असं वाटलं. कम्पोस्टिंग तसं थोडंफार माहित होतं, पण ते घरच्यापुरतं, किंवा सोसायटीच्या ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यापुरतं. एवढ्या जमिनीचा कस वाढवायचा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर सगळं व्हायला हवं होतं. आणि आम्हाला शेती शिकायची होती, त्यामुळे शेतकर्‍याला परवडतील अशा मार्गानेच कस सुधारायचा होता. शेतीच्या खर्चामध्ये मजूरी हा फार मोठा भाग असतो, त्यामुळे सगळी कामं आपणच करायची, माणसं लावून शक्यतो काहीही करून घ्यायचं नाही असं ठरलं होतं.

आमची एक मैत्रीण काय वाट्टेल ते मिळवून देऊ शकते. कम्पोस्ट करण्यासाठी शेण, गोमुत्र मिळू शकेल, पानगळ मिळू शकेल असं तिने सांगितलं.  मग यात घालण्यासाठी ओला कचरा कुठून आणावा? सोसायटीच्या अनुभवावरून हे माहित होतं, की आपल्याकडे कचर्‍याचं वर्गीकरण फार ढिसाळपणे होतं. घरांमधून आलेल्या ओल्या कचर्‍यामध्ये तर वाट्टेल ते असतं – अगदी डायपर आणि औषधांच्या बाटल्यांपासून काहीही. त्यामुळे घरांचा ओला कचरा घ्यायची इच्छा नव्हती. मग म्हटलं, की भाजी विक्रेत्यांकडचा टाकाऊ माल घेऊन बघू या. जवळपासचे, ओळखीचे असे भाजीविक्रेते गाठले. त्यांचा टाकाऊ माल द्यायला ते तयार झाले. सकाळी “स्वच्छ”च्या गाड्या येण्यापूर्वी मग या भाजीविक्रेत्यांकडचा लूज माल आपण उचलायचा आणि कम्पोस्टसाठी शेतात घेऊन जायचा. हा “ओला खाऊ”. थंडीमध्ये, उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे बर्‍याच झाडांची पानं झडतात. मनपाच्या गाड्या लवकर येत नाहीत, पानगळ टाकण्यासाठी टेम्पोचा खर्च नको म्हणून अनेक सोसायट्यांमध्ये ही पानगळ जाळून टाकतात. अशी पानगळ सोसायट्यांमधून गोळा करायची. हा झाडांचा सुका खाऊ. यावर कल्चर म्हणून शेणाचं पाणी घालायचं. संस्थेच्या आवारात हे प्रयोग करतांना उकिरडा बघून कुणी आक्षेप घेईल का? याचा वास येईल का ?असे प्रश्न होते मनात. पण सुदैवाने कुणी अशी हरकत घेतली नाही. आणि कडक उन्हाने वास, माश्या अशा बाकी सगळ्या चिंताही दूर केल्या.

सुरुवातीला कम्पोस्टसाठी एक खड्डा खणला, त्यात प्लास्टिकचा कागद घातला, आणि वर हा ओला खाऊ – सुका खाऊ घालायला लागलो. भाजीवाल्यांकडच्या ओल्या खाऊमध्ये केळ्यांचे घड, अख्खी कलिंगडं असं काहीही असायचं. त्याचे ३ -४ इंची तुकडे करून घालायचो. एका दिवशी तब्बल आठ पोती ओला खाऊ मिळाला. यासाठी कधी खड्डा खणणार, तुकडे करणार? मग क्रशर / श्रेडरचा शोध सुरू झाला. त्यानिमित्ताने कम्पोस्टिंग मशिनरी तयार करणार्‍यांशी बोलणं झालं, तर तुमचं कम्पोस्टिंग काही ठीक होईल असं दिसत नाही ... खूप वेळ लागणार, कचर्‍याचा वास येणार, माश्या होणार, टोमॅटो वगैरेचा रस जमिनीत जाऊन जमिनीचा ph बिघडणार अशा बर्‍याच शंका वाटल्या त्यांना. खेरीजआम्हाला हवा तसा श्रेडर काही कुठे दिसला नाही. मग लक्षात आलं, की या वेगाने आपल्याला पुरेसं कम्पोस्ट पावसाळ्यापूर्वी होणं शक्य वाटत नाही.

काळजीच वाटायला लागली एकूण. मग प्रिया भिडेंना फोन करून आमचा प्रश्न सांगितला, आणि त्यांनी झटक्यात तो सोडवून टाकला! तसंही आम्हाला सगळ्या शेताचा कस सुधारायचा होता, आत्ता जमीन मोकळीच होती. मग एका खड्ड्यात कम्पोस्ट करून मग पसरण्याची गरजच काय? सगळ्या शेतातच कम्पोस्ट करायचं. जमिनीवर आधी एक पानगळीचा थर द्यायचा, त्यावर ओला खाऊ पसरायचा – तुकडे न करताच – अगदी कलिंगड असलं तर चार भाग इतपत ठीक आहे, पण बाकी भाज्या चिरत बसायच्या नाहीत. – ओल्या खाऊच्या वर परत एकदा पनगळ, आणि पानगळ उडू नये म्हणून वरून थोडीशी माती. अशी “सॅंडविच” बनवायची. वरून जीवामृत फवारायचं. थर पातळ असल्यामुळे पटकन कम्पोस्ट होतं ... पालेभाज्या वगैरे अगदी लगेच होतात, आणि दोन आठवड्यात यातून “ओल्या खाऊ”मधल्या वेगवेगळ्या भाज्यांची रोपं उगवून यायला लागतात. फार बारीक तुकडे केले नाहीत म्हणजे भाज्यांमधला ओलावा टिकून राहतो आणि वरून पाणी कमी मारावं लागतं, कडक उन्हाने सगळं सुकून जायची शक्यता कमी होते. मोठे तुकडे कुजायला वेळ लागतो, पण तोवर थांबायची गरज नसते. कम्पोस्टची धग गेली, म्हणजे त्यात तुम्ही झाडं लावायला सुरुवात करू शकता. मोठे तुकडे हळुहळू कुजत राहतात, आणि झाडांना दीर्घकाळापर्यंत पोषण मिळत राहतं. थेट मातीमध्ये कम्पोस्ट केल्यामुळे मातीमधली गांडुळं आणि बाकी जीवजंतू तिथे गोळा होतात, माती “जिवंत” होते.

हे सगळं ऐकून जीव भांड्यात पडला. दिवसाला शंभर किलो ओला खाऊसुद्धा आम्हाला शेतात वापरता यायला लागला. याला कधी जीवामृत, कधी ताजं शेणाचं पाणी असं घालत होतो. मग एकदा शेणात अळ्या दिसल्या आणि घाबरलोच आम्ही. हुमण्या? या अळीच्या इतक्या कहाण्या ऐकल्या होत्या, की ताजं शेण घालणं ताबडतोब बंद केलं, दर आठवड्याला जीवामृत घालायला सुरुवात केली.

रोज टू व्हीलर वरून / गाडीमधून कितीसा ओला खाऊ आणणार? त्यापेक्षा एखादा दिवस टेम्पो बोलावून मंडईमधून कचरा उचलला तर? एका झटक्यात काम होईल की! मग मंडईचा कचरा गोळा करणार्‍यांशी बोला, टेम्पोवाला शोधा असं सुरू झालं. पण मंडईच्या कचरावाल्यांनी काही दाद लागू दिली नाही, आणि टेम्पो आधी ठरवूनही ऐन वेळी नसणे, एक ट्रीप करून बिघडणे असे सगळे प्रकार झाले. तरीही दोन महिन्यात ८०० किलोच्या वर ओला खाऊ आणि २०० पोती पानगळ असं जमलं आम्हाला. यावर दर आठवड्याला जीवामृत होतंच. गेल्या उन्हाळ्यात मस्त उन्हामध्ये पुण्यात उकिरड्यावर पाणी मारत असतांना तुम्ही कुणाला बघितलं असलं, तर आमच्यापैकीच कुणीतरी असणार ती. पावसापूर्वी कम्पोस्टच्या “सॅंडविच”नी संपूर्ण जमीन झाकण्यात यशस्वी झालो आम्ही सगळ्या जणी. आणि लाल भोपळा, कारली, काकडी, कलिंगडं, टरबूज, मका, चिवळी, टोमॅटो, मिरच्या, चवळी, बटाटे अशा इतक्या भाज्या कम्पोस्टमधून उगवून आल्या, की काही न पेरताच शेती सुरू झाली! 



Wednesday, July 18, 2018

शेतीची शाळा १

गेले काही महिने इकडे एकदम शांतता आहे. कारण काहीतरी शिजतंय. एक जुनंच खूळ पुन्हा नव्याने डोक्यात घेतलंय. आपलं एक शेत असावं असं दिवास्वप्न मी कित्येक वेळा पाहिलंय, आणि आपल्या गेल्या काही पिढ्यांचा शेतीशी काहीही संबंध नाही, यातलं आपल्याला ओ की ठो कळत नाही, शेती करणारे परवडत नाही म्हणून सोडताहेत आणि दुसरा पर्याय असताना शेती करणं म्हणजे भिकेचे डोहाळे इ. इ. सगळं ऐकून समजून शेती शक्य नाही म्हणून हा विचार झटकून टाकायचा प्रयत्नही केलाय. पण तीन महिन्यांपूर्वी माझी मैत्रीण, माऊच्या सखीची आई याच खुळाने अशीच झपाटलेली असतांना, एकेकटीने हे शक्य नाही, पण आपण मिळून काही करू शकतो, मज्जा येईल करायला!” असं दोघींच्या लक्षात आलं, आणि आम्ही आपल्याला रोज जाऊन कसता येईल अशी जमीन हवी म्हणून शोधायला लागलो. घरापासून एक – दीड तासाच्या अंतरातली जमीन घ्यायची, आणि आपण स्वतः कसायची अशी साधारण डोक्यात कल्पना घेऊन शेतं बघत हिंडायला सुरुवात झाली. अजून एक मैत्रीण पण आमच्यात सामील झाली.

घरापासून एक – दीड तासात गाडीने पोहोचता यायला हवं, शेतापर्यंत रस्ता हवा – कुणाच्या बांधावरून जाणं आणि त्याचे वाद परवडणारे नाहीत, पाणी आणि वीज ऍक्सेसिबल पाहिजे हे सगळे निकष लावल्यावर मिळणारी जमीन परवडणारी नाही, परवडणारी यात बसणारी नाही असं मग लक्षात आलं. अजून जरा खोलात शिरल्यावर सात बारा – फेरफार उतारा – वहिवाटीचे हक्क या सगळ्या गुंत्यामध्ये पडतांना जसजसे अनुभवी लोकांशी बोलायला लागलो, तसं तसं लक्षात आलं, की जमीन घेणं, त्याची किंमत चुकती करणं आणि उद्यापासून कसायला सुरुवात इतकं सुरळीत प्रकरण हे नाही. यात भरपूर फसवणूक आहे, अडवणूक आहे, सरकार दरबारी करून घेण्याची कामं आहेत. आणि कुठलीही अडवणूक – फसवणूक न होता जमीन मिळाली – ज्याची जाणकार म्हणतात की १% सुद्धा शक्यता नाही – तरी जमिनीत केलेली गुंतवणूक शेतीच्या उत्पन्नातून वसूल होण्याची शक्यता पुढच्या काही पिढ्यांमध्ये तरी नाही.

यातून कसा मार्ग निघणार यावर विचार करत होतो. एव्हाना आम्ही शेती करणार ही बातमी लोकांपर्यंत पोहोचायला लागली, आणि आम्हाला पण शेती करायची आहे म्हणत अजून तीन मैत्रिणी सामील झाल्या. जमिनीचा पत्ता नाही, शेती कसायचा अनुभव नाही, तरीही. झेडबीएनएफचं शिबिर कर, ज्ञानेश्वर बोडकेंचे यूट्यूब व्हिडिओ बघ, प्रिया भिडेंकडे गच्चीतली मातीविरहित सेंद्रीय बाग बघायला जा असं चाचपणी करणं चाललं होतं. मग सगळ्या मिळून ज्ञानेश्वर बोडके सरांच्या एक एकरवरच्या एकात्मिक शेतीच्या कार्यशाळेला जाऊन आलो. पहिल्यांदाच कुणीतरी शेती फायद्यात कशी करायची याविषयी अनुभवातून बोलत होतं, त्यामुळे मला हे आवडलं.

हळुहळू मग लक्षात आलं, शेतजमीन विकत घेणं हा आपला उद्देश नाहीच. आपल्याला शेती करायची आहे. मग जमीन विकत घेण्याच्या मागे कशाला लागायचं? शेती शिकणं त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. आणि जसजसं लोकांशी बोलत गेलो, तसतसं हेही लक्षात आलं, की आपली शेती हवी म्हणून उत्साहाने जमीन घेणारे आणि ती कसायला वेळ न मिळणारे भरपूर लोक आहेत. त्यांनी आपल्यासाठी उदंड जमीन विकत घेऊन ठेवलेली आहे! ;) तर शेती शिकायची, आणि मग मोठ्या मुदतीच्या भाडेकराराने आपल्याला सोयीची जमीन वापरायला घ्यायची.

एक मैत्रिण आमच्या शेती करायच्या इच्छेविषयी विज्ञान आश्रमाच्या योगेश सरांशी बोलली. त्यांनी त्यांच्या Do it yourself Lab मध्ये शेती शिकायला या, इथे जमीन आहे, अवजारं आहेत, मार्गदर्शन मिळेल असं सुचवलं. विज्ञान आश्रमाच्या incubator मध्ये शेती शिकायची म्हणजे सोप्पंच झालं एकदम काम. साधारण वर्षभर इथे शिकू या, तोवर आपण कोणकोण, काय आणि कसं करू शकतो याचा अंदाज येईल आणि मग मोठ्या प्रमाणावर हे सगळं करता येईल अशी आशा आहे. त्यामुळे एप्रिल पासून आमची शेतीची शाळा चालली आहे. त्याच्या गमतीजमती इथे जमेल तश्या(?!) टाकायचा विचार आहे.

Sunday, July 15, 2018

The One Straw Revolution – Masanobu Fukuoka

शेतकरी आणि तत्त्वज्ञ मासानोबू फुकुओका हा सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, ZBNF अशा सगळ्या शेतीपद्धतींच्या मुळाशी असणारा बाप माणूस आहे. जपानी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या फुकुओकांचा सूक्षमजीवशास्त्राचा आणि शेतीशास्त्राचा अभ्यास होता. झाडांवरच्या रोगांचा अभ्यास करणारा संशोधक म्हणून त्यांनी करियरची सुरुवात केली. पण पुढे पाश्चात्य / आधुनिक शेतीशास्त्राचा मार्ग चुकतो आहे याविषयी त्यांची खात्री झाली, आणि संशोधकाच्या नोकरीचा राजिनामा देऊन फुकुओका घरच्या शेतीकडे वळले. १९३८ पासून त्यांनी सेंद्रीय लिंबूवर्गीय फळबागांचे प्रयोग आणि निरीक्षणे करायला सुरुवात केली, आणि यातून हळुहळू त्यांचा नैसर्गिक शेतीचा विचार विकसित झाला. दुसर्‍या महायुद्धानंतर १९४७ पासून त्यांची सेंद्रीय भातशेतीही सुरू झाली. त्यांनी “One Straw Revolution” १९७५ मध्ये लिहिलं. डोळस प्रयोग आणि इतका प्रदीर्घ अनुभव या पुस्तकाच्या मागे आहेत, त्यामुळे त्याचं हे पुस्तक म्हणजे जगभरातल्या नैसर्गिक शेतीवाल्यांचं बायबल समजलं जातं.
खरं म्हणजे हे पुस्तक घेऊन कितीतरी वर्षं झाली. ते वाचायलाही सुरुवात केली, पण काहीतरी बोचत होतं वाचतांना, पुस्तक काही मी पूर्ण करू शकत नव्हते. या वेळी पुन्हा एकदा नव्याने वाचायला घेतलं हे पुस्तक. थोरोच्या फार जवळ जाणारे वाटले त्यांचे विचार.

निसर्गाशी एकरूप व्हा, निसर्ग तुम्हाला पोटापुरतं निश्चितच देईल. त्यापलिकडे अपेक्षा ठेवणे ही हाव झाली.

तुमच्या भागात जे पिकतं, तेच खा. तेच तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

झाडाला त्याच्या नैसर्गिक जीवनक्रमाप्रमाणे वाढू दे. जंगलात ते कसं वाढलं असतं, तसंच वाढलं तर त्याची निकोप वाढ होईल. अशा जोमदार रोपाला तणनाशक, कीटकनाशक अशा कशाचीच गरज पडणार नाही. तुमची जमीन जंगलातल्या जमिनीसारखी होऊ देत, तुम्हाला नांगरणीची गरजच उरणार नाही. तणाचा नायनाट करायची गरज नाही, आपल्याला हव्या त्या झाडांपेक्षा जास्त जोमाने ती तरारणार नाहीत एवढीच काळजी घ्यायची आहे.

एकेका किडीचा नायनाट करून उपयोग नाही - ही एक पूर्ण इकोसिस्टीम आहे. त्यातल्या सगळ्या दुव्यांचा विचार व्हायला हवा. एका एका रोगावर इलाज कामाचा नाही, सगळ्याचा एकत्रित विचार हवा. आधुनिक विज्ञान असा विचार करत नाही, म्हणून फुकुओकांना ते उपयोगाचे वाटत नाही.

नैसर्गिक शेती ही कमीत कमी कष्टात, कमीत कमी खर्चात होणारी आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीच्या उत्पादनाची किंमतही रासायनिक शेती उत्पादनापेक्षा कमी हवी.

माणशी पाव एकर शेती करून प्रत्येकाने पोटापुरतं पिकवायला हवं.

रासायनिक शेतीमध्ये एका पिढीमध्ये जमिनीचा कस जातो. पारंपारिक शेतीमध्ये शतकानुशतके तो कायम राहतो. पण नैसर्गिक शेतीमध्ये तो कायम वाढतच जातो.

 हे यातले काही महत्त्वाचे विचार. पुस्तक वाचतांना पुन्हा मागच्या वेळेसारखंच झालं ... जसजशी पुढे वाचत गेले, तसतसं काहीतरी कमी आहे, काहीतरी चुकतंय असं आतून परत वाटायला लागलं. डोक्यातला सगळा गोंधळ बाजूला ठेवून फुकुओका काय म्हणताहेत ते वाचता नाही आलं मला. त्यामुळे हे पुस्तक परीक्षण नाही, पुस्तकाचा गोषवाराही नाही. पुस्तक वाचून मला काय वाटलं, तेच यात प्रामुख्याने आहे.

शेती हा धर्म आहे, जगण्याची पद्धत आहे असं फुकुओका म्हणतात. मला यात आपल्याकडच्या आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या कामाचा सल्ला दिसत नाही कुठे. शेतकर्‍याने गरीबच का असलं पाहिजे? त्याने शहरी माणसासारख्या छानछोकीची इच्छा का नाही ठेवायची? गरीबीचं उदात्तीकरण करतोय का आपण इथे? थोरो किंवा फुकुओकांसारखे काही थोडे अनावश्यक पैशांशिवाय आनंदात जगतील. तीच अपेक्षा सगळ्या शेतकर्‍यांकडून का? मला आध्यात्मिक शेतीमध्ये सध्या तरी रस नाही. शेतकर्‍यांनी लोकांना रसायनं खाऊ घालू नयेत, शेती विषमुक्त हवी, पण व्यापारी तत्त्वावर परवडणारी हवी - शेती हा धर्म नको, व्यवसाय हवाय मला. आधुनिक वैद्यकशास्त्र नसतं तर कदाचित हे लिहायला आज मी जिवंत नसते. विज्ञानाला काही समजत नाही म्हणून मी तरी मोडीत काढू नये. सॉरी, फुकुओका सान. नाही पचलं.

Monday, March 5, 2018

आदत से मजबूर ;)

काहीही करायचं नाही, फक्त आराम करायचा दोन दिवस! अगदी निक्षून सांगितलं होतं स्वतःलाच. जेवढ करायला पर्यायच नसेल, तेवढेच हातपाय हलवायचे फक्त. बाकी फक्त आराम. आपण विश्रांती घ्यायला आलोय इथे. घरून निघालो तेंव्हापासून घोकत होते मनामध्ये. महाबळेश्वरला पोहोचल्यावर सुद्धा निश्चय कायम होता. पण संध्याकाळी वेण्णा लेकला निघालो, आणि घात झाला. गर्दीच्या दिवसात हमखास ट्रॅफिक जाम असणार्‍या लेकच्या रस्त्याला चक्क अंजनाची झाडं फुललेली दिसली. किती वर्षांनी भेटला अंजन! यापूर्वी बघितला होता, तेंव्हा नाव-गाव माहित नव्हतं. अचानक समोर फुललेलं झाड दिसलं, आणि इतका सुंदर फुलोरा बघून त्याचा फोटो काढला गेला. आणि नंतर केंव्हा तरी समजलं, की या सुंदर फुलांच्या झाडाचं नाव अंजन आहे. आपल्या अंजन-कांचन-करवंदीच्या काटेरी देशातला अंजन. (पण अंजन – कांचन काटेरी कुठे असतात?)
तर गाडीतून जाताना रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला भरपूर अंजन फुललेला दिसला. गाडीतून उतरल्यावर लक्षात आलं, ही फुलं नाहीत, कळ्या आहेत. गुलाबीसर रंगाच्या.

माऊबरोबर तिथल्या चक्रात बसले, आणि वरून चक्क अंजनाची फुलं फुललेली दिसली! आता अंधार झाला होता, त्यामुळे उद्या परत फुलं शोधणं आलं. आपण आराम करायला आलोय, सकाळी उठून फिरायला गेलंच पाहिजे महाबळेश्वर मध्ये असा काही नियम नाहीये. शिवाय थंडी आहे, आपण गरम कपडे काहीच आणलेले नाहीत. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यापासून मनाशी उजळणी चालली होती. बराच वेळ चुळबूल करत खोलीतच बसले. मग म्हटलं, मस्त ऊन आहे ... जरा अंजनाची फुलं दिसताहेत का कुठे तेवढं तरी बघून येऊ, विल्सन पॉईंटपर्यंत काही नको जायला. हॉटेलच्या आवारात एवढी जुनी झाडं आहेत, एखादा तरी अंजन असेलच की! मग हॉटेलच्या आवारात एक आतून चक्कर मारली, बाहेरूनही एक फेरी मारून झाली. अंजन काही सापडला नाही. विल्सन पॉईंटच्या रस्त्याला नक्की असणार. (या पॉईंटला जायला – यायला एक गोलाकार रस्ता आहे. तर माझ्या नेहेमीच्या वाटेने गेलं तर  पॉईंटच्या बर्‍याच अलिकडे अंजन भेटायला हवेत.) तिथेवर जाऊन यावं फक्त, म्हणून बाहेर पडले. तसंही मी रोजचे ओळखीचे रस्ते सुद्धा सहज चुकू शकते. आज तर रस्त्याकडे लक्ष नव्हतंच – झाडांकडे बघतच निघाले होते. जरा वेळ चालल्यावर चक्क रस्त्याकडे लक्ष गेलं. लक्षात आलं, आपला विल्सन पॉईंटचा फाटा केंव्हाच गेलाय. आपण सातार्‍याच्या रस्त्याला आहोत, असेच चालत राहिलो तर बहुतेक सातार्‍याला जाऊन पोहोचणार आपण. विल्सन पॉईंटवरून परत येण्याचा रस्ता आलाय आता. मग त्या रस्त्याला वळले. पॉईंटला पोहोचेपर्यंत एकही अंजन नाही! आता मागे वळून किंवा पुढे जाऊन वेळ तितकाच लागणार होता. मग सरळ माझ्या नेहेमी वर येण्याच्या रस्त्यानेच यावं. त्या रस्त्याला अर्थातच पोटभर अंजन भेटले – भरपूर फुलं बघितली, आणि मन तृप्त झालं एकदम.


आता मी खरंच फिरायला बाहेर पडले नव्हते आज. अंजन बघायला जरा चालावं लागलं तरी चालायचंच, नाही का? ;) (येतांना बघितलं, हॉटेलच्या आवारात अगदी कोपर्‍यामध्ये एक फुललेला अंजन मला चिडवत उभा होता!)

दुसर्‍या दिवशी सकाळी बाहेर पडायचं आता काहीच कारण नव्हतं. अंजन पण बघून झाले, फिरायला जायचंच नाहीये, मग बाहेर कशाला पडायचं? अगदी ठरवून खोलीतच बसून होते सकाळी. बर्‍याच वेळाने माऊचा बाबा उठला.
“हे काय, तू फिरायला नाही गेलीस अजून?”
“नाही!”
“अग, अजून काही फार उशीर नाही झाला, जाऊन ये!”
आता एवढा आग्रह झाल्यावर बाहेर पडायलाच लागलं नाईलाजाने. आज नीट सरळ नेहेमीच्या रस्त्याने निघाले विल्सन पॉईंटला. कालचे सगळे अंजन परत भेटले. आणि पॉईंटवर इतका सुंदर फुललेला अंजन भेटला!!! आज बाहेर पडल्याचं सार्थक झालं म्हणायचं! ;)





Sunday, January 28, 2018

टिल्लू ट्रेक – केंजळगड

परवा माऊ आणि मी त्यांच्या “वायामाच्या” ग्रूपसोबत केंजळगडला जाऊन आलो. केंजळगड नेहेमी वाई फाट्यावरून महाबळेश्वरकडे जाताना बघितला होता, पण आम्ही गेलो ते भोरवरून. डोंगराच्या मध्याच्या जवळपास एक वस्ती आणि देऊळ आहे, तिथपर्यंत आता गाडी जाते. वस्तीतल्या शाळेच्या ओट्यावर नाश्ता केला. दहा – वीस घरं असतील इथे जेमतेम. त्यांच्यासाठी जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची शाळा. पण ती एवढीशी शाळा बाहेरून बघून एकदम आवडलीच. ज्यांनी कुणी बांधली आहे, त्यांनी मुलं खरंच शिकावीत म्हणून बांधलीय असं वाटलं. बाहेर मुलं डबा / मध्यान्ह भोजनासाठी बसणार तिथे प्रत्येक ताटासाठी वर्तुळ रंगवलेलं. पायर्‍यांवर चढता क्रम, उतरता क्रम असं लिहिलेलं. दारांवर स्वागताला बाल हनुमान आणि श्रीकृष्ण.आणि पायर्‍या चढू न शकणारे कुणी असतील तर त्यांच्यासाठी रॅम्पसुद्धा आहे या छोटुश्या शाळेला! (माऊच्या पुण्यातल्या शाळेला तरी आहे का रॅम्प? बघायला हवं!) शाळा भरलेली असतांना बघायला खूप आवडलं असतं.





निम्मा डोंगर बसने गेल्यामुळे चढायला थोडंसंच होतं. पण वाट एकदम मस्त रानातनं जाणारी, सगळ्या बाजूंना बघायला एकदम सुंदर, आणि ताजी ताजी सकाळची हवा त्यामुळे मज्जा आली. गड तसा छोटासा आहे. दोन चुन्याच्या घाण्या, एक पाण्याचं टाकं, बिना छपरा- खांबांचं देऊळ, एक गुहा. दहा पंधरा मिनिटात गडाला चक्कर मारून झाली सुद्धा.


खालची पाकेरेवस्ती, मागे रायरेश्वर
वरून रायरेश्वर, रोहिडेश्वर, कमळगड दिसतात, पाचगणीचं पठार थोडंफार दिसतं, धोमचं पाणी दिसतं. 

केंजळगड

धोमचं पाणी, मागे कमळगड. अगदी मागे पाचगणीचं पठार

क्षितिजावर अगदी धूसर रोहिडेश्वर

घाणा फिरवायचा प्रयत्न चाललाय :)

गडावरचं देऊळ?!

वाटेत काही पळस पूर्ण फुललेले, काही अजून झोपलेलेच दिसले. ही तीन अनोळखी फुलं भेटली:




खाली वस्तीमध्ये एका मोकळ्या जागेत खूप छोटी वासरं चरत होती. माऊ अर्थातच वासरांना भेटायला गेली, आणि वासरं पांगली. एकाही वासराला हात लावायला मिळाला नाही. पण (त्यांची आठवण म्हणून? ;) ) वासराचं शेण मात्र मिळालं. (तसं वाटेत आम्हाला पोपटाची पिसं सुद्धा मिळाली होती. ती बघितली, सगळ्यांना दाखवली, आणि कुणाला हवी त्यांना घरी न्यायला देऊन पण टाकली. पण वासराचं शेण मात्र सॅकमध्ये घालून थेट पुण्याला!!! :D)

येतांना वाटेत आंबवडे गावातला झुलता पूल, नागेश्वर मंदिर आणि कान्होजी जेधे, जिवा महाले यांच्या समाधी जमलं तर बघायच्या होत्या. नागेश्वर मंदिर सुंदर आहे. मस्त हेमाडपंती बांधकाम आहे. वाटेमध्ये गर्द झाडी, शेजारी पाणी. भर दुपारी सुद्धा आत एकदम थंडगार, शांत. पण इतक्या सुंदर मंदिराला भडक ऑईलपेंट फासलाय. :( वेळ कमी होता म्हणून दोन्ही समाध्या बघता आल्या नाहीत.

नागेश्वर मंदिर

मंदिराजवळ मिळालेलं मधाचं पोळं
थोडंसं चालून डोळ्यांना भरपूर मेजवानी असा हा मस्त टिल्लू ट्रेक झाला एकूणात.

Thursday, January 11, 2018

काळं पाणी, निळं पाणी...३

“आशियातल्या सगळ्यात सुंदर समुद्रकिनार्‍यांपैकी पहिल्या दहात” असणारा राधानगरचा समुद्रकिनारा बघायचा होता. त्यासाठी हॅवलॉक बेटावर जायचं होतं. इथलं जंगल रिझॉर्ट, रिझॉर्टच्या परिसरातली झाडं, तिथून चालत दोन मिनिटांवर असणारा समुद्र हे सगळंच अप्रतिम.





झाडांच्या उंचीचा अंदाज यायला खाली ताईला उभं केलंय :)

  


वरून दुसरं झाडच वाटतंय ना? म्हणून झाडांचे फोटो बंद. :)

  






तिथून वॉटर स्पोर्ट्ससाठी एलिफंट बीचला गेलो होतो. इथे स्नॉर्केलिंग, स्कूबा डायव्हिंग इ. ची सोय आहे. स्नॉर्केलिंगमध्ये अप्रतिम प्रवाळ आणि मासे बघायला मिळाले. पण बोटीवाल्यांची दादागिरी, तुम्ही आवाज चढवल्याशिवाय तुमचा स्नॉर्केलिंगसाठी नंबर न लागणं हे प्रकार होतेच. तरीही, सगळ्यांनी एकत्र स्नॉर्केलिंग केल्यावर जे अनुभवायला मिळालं त्यामुळे असं वाटलं, की आलो हे बरं झालं. हॅवलॉकला असेपर्यंत माऊने दिवसभर पाण्यात डुंबून घेतलं.  :)










इथून पोर्ट ब्लेअरसाठी परत निघालो तेंव्हा आमचा ड्रायव्हर खूप अस्वस्थ होता – आज सकाळी त्याचा एक गाववाला  फेरीच्या धक्क्यावर पाण्यात बुडून मेला होता! कार्गो बोटीवर काम करणारा हा गाववाला आज खूप पिऊन कामावर आला. बोट धक्क्यात लागलेली. त्याने नांगर उचलून घेतला, आणि कसा कोण जाणे तोल जाऊन तो पाण्यात पडला. इथल्या उकाड्यापासून आराम म्हणून कित्येक बोटवाले पाण्यात डुबकी मारतात. त्यामुळे धक्क्यावर भरपूर गर्दी असून सुद्धा कुणी फारसं लक्ष दिलं नाही. लोकांच्या लक्षात येईपर्यंत नाकातोंडात पाणी जाऊन याचा जीव गेला! आमचा ड्रायव्हर रोज गाडी घेऊन बोटीतून पोर्ट ब्लेअरहून हॅवलॉकला येणारा. त्याने हे पाण्याशी संबंधित काम सोडून द्यावं म्हणून त्याची आई आज मागे लागली होती. पण मग खायचं काय?

***

अंदमान – निकोबार द्वीपसमुहात ६०० ते ७०० बेटं आहेत, त्यातली ६०- ७० माणसांची वस्ती असणारी. त्यातली जेमतेम ८ – १० पर्यटकांसाठी खुली आहेत. बाकी बेटांपैकी काही आदिवासीसाठी राखीव, काही संरक्षणदलाच्या ताब्यात. (इथून हाकेच्या अंतरावर असणारं कोको आयलंड काही वर्षांपूर्वी ब्रह्मदेशाने चीनला “भेट” दिलंय. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने या बेटांचं महत्त्व अजूनच वाढलंय.) आदिवासींच्या ६ जमाती इथे सापडतात. आम्हाला दिसले ते जरावा, अजूनही बाहेरच्यांबाबत अतिशय आक्रमक असणारे सेंटिनेलीज, शिक्षण घेऊन सरकारी नोकर्‍यांपर्यंत पोहोचलेले निकोबारीज, ग्रेट अंदमानीज आणि ओंगे. (“जन्मठेप” मध्ये निकोबारमधल्या एका विशिष्ट जमातीविषयी वाचलं होतं – या जमातीच्या लोकांचं शेपटीचं हाड मोठं असल्यामुळे त्यांना खुर्चीवर बसता येत नाही, चेहेरा बराचसा माकडासारखा दिसतो, माकड आनि प्रगत मानव यांच्या मधल्या टप्प्यावरचे ते वाटतात असं काहीसं. यांचा कुठे उल्लेख सापडला नाही.) निकोबारी सोडता बाकी सगळ्या जमातींच्या लोकसंख्या शेकड्यामध्ये. इथे ट्रायबल टुरिझमवर सक्त बंदी आहे. देशावरून काही पिढ्यांपूर्वी इथे येऊन वसलेले बंगाली (दोन तृतियांश) आणि तमीळ (एक तृतियांश), बदली होईपर्यंत येणारे सरकारी अधिकारी आणि लष्कराचे लोक, पर्यटक आणि या सगळ्यांच्या कक्षेबाहेर जगणारे आदिवासी अशी इथली सगळी लोकसंख्या. ही सगळी वेगवेगळी, एकमेकांना क्वचितच छेदणारी विश्वं वाटली मला. आदिवासींसाठी हे विश्व प्रलयकाळाच्या जवळ पोहोचलेलं असावं – पन्नास-शंभर लोकसंख्येचे हे समुह कुठल्याही साथीमध्ये सुद्धा होत्याचे नव्हते होऊन जातील. अजून किती वर्षं टिकाव धरणार ते? पर्यटकांना फिरायला आलेल्या जागेविषयी सेल्फी पॉईंटपलिकडे देणंघेणं नसावं. सरकारी अधिकारी आणि लष्कराच्या लोकांसाठी हे बर्‍यापैकी पनिशमेंट पोस्टिंग असणार, कारण कित्येक भागांमध्ये कुटुंब घेऊन जाता येत नाही. मत्स्यव्यवसाय वगळता बाकी म्हणण्यासारखे उद्योगधंदे नाहीत. स्थानिकांचा उदरनिर्वाह बराचसा पर्यटकांवर अवलंबून. पर्यटन व्यवसाय अजून फारसा विकसित नाही. मुख्य भूमीपासून हजार किमी अंतरावरचा हा एक ठिपका. इथल्या तरूणांची स्वप्नं काय असतील? ती चेन्नई किंवा कलकत्ता न गाठता पूर्ण होत असतील का? रस्त्यात जागोजागी "आपलं गाव अंमली पदार्थमुक्त करू या" अशा पाट्या दिसतात, ज्या बघून इथे अंमली पदार्थांचा मोठा विळखा आहे का अशी शंका येते. पण आमच्या गप्पिष्ट ड्रायव्हरकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे गुन्हेगारी मात्र फरशी नाही. सगळी अर्थव्यवस्था देशातून येणार्‍या  मालावर अवलंबून – पेट्रोल -डिझेल, गाड्या, कापडचोपड, अन्नधान्य, फळं - म्हणजे आठवडाभर बाजारात बटाटे मिळालेले नाहीत, आज कार्गो आला तर पराठ्यात बटाटे असतील, नाहीतर प्लेन पराठा असं हॉटेलमध्ये सहज ऐकायला मिळतं.

काय भवितव्य असायला हवं या जागेचं, इथल्या लोकांचं? दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी इथे भारतातले बंदी पाठवले, म्हणून ही बेटं आज भारताचा भाग आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने त्यांचं महत्त्व मोठं आहे. भारतीय वंशाच्या लोकांची आज तिथे वस्ती आहे, पण मुख्य भूमीपासून तुटलेपण अर्थातच आहे. आपल्या देशाच्या राजकारणात / समाजकारणात/अर्थकारणात काही स्थान मिळवण्यासाठी ही फारच छोटी लोकसंख्या आहे. इथले आदिवासी तर त्याहूनही कमी, कुणाच्या खिजगणतीत नसल्यातच जमा.  स्थानिक संस्कृती / अस्मिता / वैशिष्ट्यं असलं काही कुठे दिसलं नाही इथे. इथल्या दुकानात मिळणारी सुवनीअर्स सुद्धा मुख्य भूमीवरूनच आयात केलेली! Overall, they seem to be too small to matter. 

Wednesday, January 10, 2018

काळं पाणी, निळं पाणी...२

पोर्ट ब्लेअरहून रॉस आणि व्हायपर बेटांची एका दिवसाची फेरी आम्ही घेतली. रॉस हे चिमुकलं बेट. इंग्रजांच्या काळात पोर्ट ब्लेअरमधले सगळे इंग्रज अधिकारी इथे राहत. काळ्यापाण्याच्या त्या वसाहतीमधला हा स्वर्ग होता – स्वतःला “अंदमानचा परमेश्वर” समजणारा जेलर बारीबाबा सुद्धा इथेच रहायचा. सुंदर बंगले, टेनिस कोर्ट, चर्चेस, क्लब हाऊस, पोहण्याचा तलाव असं हे चिमुकलं पण टुमदार “पूर्वेकडचं पॅरीस” होतं. दुसर्‍या महायुद्धाच्या सुमाराला रॉस बेटावरची वस्ती उठवण्यात आली. त्यानंतर भूकंपाने या बेटाची मध्यातून दोन शकलं केली. आज या बेटावर फक्त भग्न अवशेष बघायला मिळतात. सेल्युलर जेलचे सातापैकी तीन पाख तरी अजून शाबूत आहेत, साहेबांच्या बंगल्यांचे अवशेषही मातीला मिळालेत. इथल्या भिंतीभिंतीतून उगवलेले वड-पिंपळ बघतांना परत परत “विश्वात आजवरी शाश्वत काय झाले!” या सावरकरांच्या ओळी आठवल्यावाचून राहिल्या नाहीत.






व्हायपर बेटावर कुप्रसिद्ध “चेन गॅंग जेल” आणि अंदमानातला पहिला तुरुंग होता. इथे महिलांचाही तुरुंग होता असा उल्लेख सापडला, पण जास्त माहिती मिळाली नाही. कुठल्या स्त्रियांना इथे काळ्यापाण्यावर पाठवलं गेलं? काय झालं असेल त्यांचं पुढे? तसंही स्त्रियांना एकदा तुरुंगात गेल्यावर घर संपतंच. मग काळं पाणी काय आणि देशातले तुरुंग काय – काही फरक होता का त्यांच्यासाठी?



दुसर्‍या दिवशी पोर्ट ब्लेअरहून एक दिवसाच्या सहलीसाठी बाराटांगच्या चुनखडीच्या गुहा बघायला गेलो होतो. हा एक अगदी वेगळा अनुभव होता. सकाळी(?) तीन वाजता पोर्ट ब्लेअरहून निघालो. सव्वातीनच्या सुमाराला गावातून बाहेर पडता पडता रस्त्यात एक पळणारा दिसला, आणि एकदम मस्तच वाटलं! वाटेत “कॅटलगंज” च्या आसपास अंदमानात पोहोचल्यापासून पहिल्यांदाच शेणाचा वास आला, भरपूर गाईगुरं दिसली. इथे एकूणातच दुधाचा तुटवडा दिसला. सगळीकडे पावडरचं दूध. इथेली गुरं सुद्धा मांसासाठी पाळलेली, दुधासाठी नाही. या बेटांवर आता थोडीफार भातशेती  होते, नारळाच्या, सुपारीच्या, केळीच्या बागा आहेत, ऊस आहे. बेटाबाहेर गेलं नाही, तरी इथल्या स्थानिक लोकांची गरज भागण्याइतपत उत्पन्न निघतं. कोंबड्या – बकर्‍या पण थोड्या दिसतात. मग दूध दुभतं का बरं नसावं?

साडे पाचच्या सुमाराला जिरकाटांगला पोहोचलो. पोर्ट ब्लेअर सोडल्यापासूनच सुंदर जंगल सुरू झालं होतं – जिरकाटांगपासून पुढे जरावा आदिवासींचा भाग आहे, इथे पोलीस बंदोबस्तातच गाड्या जायला परवानगी असते. गाड्यांचा पहिला ताफा सकाळी सहा वाजता निघतो. तो गाठण्यासाठी म्हणून पोर्ट ब्लेअरहून इतक्या पहाटे निघायचं. आदिवासी भागातून जातांना कुणीही गाडीतून उतरायचं नाही, आदिवासी दिसले तर फोटो काढायचे नाहीत, त्यांच्याशी बोलायचा / काही देण्या-घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. “माझी जन्मठेप”मध्ये हे आदिवासी त्या काळात नग्नावस्थेत रहायचे, बाहेरच्या माणसांना पाहिल्याबरोबर त्यांच्यावर हल्ला करायचे आणि मारून टाकलेल्या बाहेरच्या माणसाला खाऊनही टाकत असे उल्लेख सापडतात. आम्हाला या भागातून जातांना कॅमेरा बाहेर काढूच नका अशा सक्त सूचना होत्या. योगायोगाने परतीच्या वाटेवर काही जरावा दिसलेही. मूळ आफ्रिकन वंशाच्या या जमातीचे जेमतेम पाचशेएक लोक अजून शिल्लक आहेत. आता ते थोडेफार कपडे वापरतात. हातात तिरकमठा आणि अंगात जीन्सची पॅंट अशी काही १५ – १६ वर्षाची वाटाणारी मुलं दिसली, मग लहान मुलांना कडेवर घेऊन जाणार्‍या काही जरावा बायकाही दिसल्या.

पोलीस पहार्‍यात जिरकाटांगहून मिडल डिस्ट्रिक्टला पोहोचल्यावर तिथून पुढचा प्रवास बोटीने. बाराटांगमधल्या शेवटच्या टप्प्याला परत दुसरी लहान बोट आपल्याला खारफुटी जंगलातून घेऊन जाते, आणि मग शेवटचा साधारण दीड – दोन किमी अंतराचा चुनखडी गुहेपर्यंतचा प्रवास चालत. या गुहेमध्ये स्टॅलक्टाईट आणि स्टॅलग्माईट दोन्ही प्रकारच्या रचना तयार झालेल्या आहेत.  ते बघून मग “मड व्होल्कॅनो” बघायला गेलो. दिवसभरात एवढं वेगवेगळं काही पाहिल्यानंतर हा मड व्हॉल्कॅनो म्हणजे एकदम फुसका बार निघाला. तिथे कुंपण करून पाटी लिहिलेली नसती तर पाईपमधून गळालेल्या पाण्याने जरा चिखल झालाय असं वाटून तिकडे बघितलंही नसतं कुणी!  मड व्होल्कॅनोला नेणारी गाडी एकदम अठराशेसत्तावनच्या बंदींबरोबरच अंदमानात पोहोचलेली असावी इतकी जीर्ण वाटत होती. इतक्या ठिकाणून वाजणार्‍या आणि हलणार्‍या गाडीत बसायचा माऊचा हा पहिलाच अनुभव, तिने तो मनापासून एन्जॉय केला! :)
नजर जाईल तिथवर निळं पाणी, हिरवी जंगलं!

खारफुटीमधून जाताना



stalectites


चुनखडी गुहेकडे जाण्याचा रस्ता

खारफुटीमधून जाण्याचा रस्ता


मड व्होल्कॅनो! :)

***
दिवसभर प्रवास करूनही फक्त बोटीतून जातांना आम्हाला ऊन लागलं. संपूर्ण प्रवासात आजुबाजूला इतकी सुंदर झाडं होती, आणि बर्‍याच बुंध्यांवर झाडाची नावंही लिहिलेली. पण मी झाडांचे फोटो काढायचा प्रयत्न सोडून दिला, कारण अंदमानातली झाडं म्हणजे एल ग्रेकोच्या चित्रातल्या माणसांसारखी प्रमाणाबाहेर उंच आहेत.  त्यामुळे एक तर आपल्या ओळखीची झाडं पण अनोळखी वाटायला लागतात (वाटेत दोन – तीन मजले उंच केवड्याचं बन दिसलं!), आणि त्याहून मोठी अडचण म्हणजे बुंध्यावर झाडाचं नाव असलं, तरी त्याची पानं-फुलं-फळं पार वर उंचावर, आजूबाजूच्या गर्दीत मिसळून गेलेली असतात. म्हणजे कुणाचं नाव काय, कुठली पान कशाची काहीच समजत नाही. इथल्या जंगलांमध्ये अंडरग्रोथ म्हणून पसरलेली अजस्र फोलिडेड्रॉन्स आणि पामच्या वेगवेगळ्या जाती बघितल्यावर शहरी बागांमध्ये सावलीतली झाडं म्हणून लावलेली ही झाडं म्हणजे दहा-वीस फुटी पिंजर्‍यातले दात- नखं गळालेले बिचारे वाघ वाटायला लागले.