Tuesday, December 18, 2012

झिम्मा : विजया मेहता



    नाट्यक्षेत्राशी, अभिनयाशी माझा दूरान्वयेही संबंध नाही. अगदी शाळेतल्या नाटकात भाग घेण्याचा अनुभवसुद्धा गाठीशी नाही ... मुळात आमच्या शाळेत गॅदरिंग आणि नाटक हे प्रकारच नव्हते! पडद्याच्या दुसर्‍या बाजूने नाटकाकडे बघण्याचा अनुभवही जेमतेमच. त्यामुळे या पुस्तकाची बहुधा मी ढ मधली ढ वाचक असेन. तरीही, इतक्या मंद वाचकाला खिळवून ठेवणारं विजयाबाई लिहितात. त्यांची गोष्ट वाचतांना त्यांच्या चष्म्यातून आपल्याला मराठी (आणि काही अंशी भारतीय आणि जागतिक रंगभूमीचीसुद्धा) सहा दशकांची वाटचाल बघायला मिळते.

    बाईंच्या कहाणीतली मला सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे इतकी वर्षं एका क्षेत्रात वावरूनसुद्धा त्यांच्यामध्ये साचलेपणा नाही, बनचुकेपणा नाही. बर्‍याच वेळा असं दिसतं, की तुम्ही एखाद्या क्षेत्रातले तज्ञ म्हणून प्रसिद्ध होता, लोक तुमच्याकडे शिकायला येतात, आणि तुमचं पुढे शिकणं राहूनच जातं. इतक्या कार्यशाळा घेऊन, इतक्या लोकांना तयार करूनही बाईंच्या शिकण्यात खंड पडलेला नाही, नवं शिकण्याची, वेगळं काही करून बघण्याची आच कमी झालेली नाही. कलाकार म्हणून त्या पुस्तकाच्या अखेरपर्यंत तेवढ्याच जिवंत वाटतात.

    या पुस्तकात मला फार जवळचं वाटणारं म्हणजे कार्यक्षेत्रातला बदल. बारा वर्षं जीव ओतून रंगायनची चळवळ उभी केल्यानंतर त्यांना त्यापेक्षा वेगळं काही करावंसं वाटतं, आणि आपल्या ‘प्रायोगिक’ प्रतिमेचं कुठलंही गाठोडं सोबत न घेता त्या लोकमान्य रंगभूमीवर काम करून बघतात. ब्रेश्तचं जर्मन नाटक मराठीमधून लोकनाट्याच्या अंगाने उभं करून त्याचे जर्मनीमध्ये यशस्वी प्रयोग करणं, मुद्राराक्षस, हयवदन, नागमंडल  ही नाटकं जर्मन कलाकारांबरोबर जर्मन भाषेत बसवणं असं सांस्कृतिक देवाणघेवाणीचं अवघड आव्हान स्वीकारतात, टेलिफिल्म, दूरदर्शन मालिका बनवून बघतात आणि एनएसडीची धुरा असेल किंवा एनसीपीएचं संचालकत्व असेल, या भूमिकाही स्वीकारतात. आपल्याला सध्याच्या कामात तोचतोचपणा जाणवतोय, नवं काही करायला हवंय हे समजून, आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून असं नवं नवं करून बघण्याची ‘रिस्क’ आयुष्यभर घेऊ शकणारी माणसं थोडी असतात. ती भूतकाळाचं ओझं बाळगत नाहीत, आणि मनाने कधी म्हातारी होत नाहीत.

    या वृत्तीचाच दुसरा भाग म्हणजे जे करायचं ते मनापासून, जीव ओतून. पाट्या टाकायच्या नाहीत. टाळ्या मिळत असल्या तरीही आपल्याला खोटी वाटणारी भूमिका करायची नाही. असं म्हणणारं कुणी भेटलं म्हणजे मधूनच डळमळीत होणर्‍या आपल्या विचाराला पुन्हा बळ येतं.

     नाटक हे टीमवर्क आहे. सगळ्या टीमच्या तारा जुळल्या तरच सुस्वर ऑर्केस्ट्रा उभा राहील. बाकीच्या नटांना खाऊन टाकणारा ‘सोलो’ अभिनय करायचा नाही. वेळेची शिस्त, तालमींमधली मेहनत यात चालढकल नाही. आपल्या भूमिकेचं बेअरिंग नटाला सापडणं हे सगळ्यात महत्त्वाचं. रंगमंचावरचा अभिनय प्रेक्षकाला बेगडी वाटता कामा नये, सहज वाटला पाहिजे. अर्थात ही ‘सहजता’ येण्यासाठी प्रचंड मेहनत लागते. अभिनयातलं ओ का ठो समजलं नाही, तरी बाईंना काय म्हणायचंय ते अगदी नीट समजतंय असं वाटतं या बाबत. 

    एका मनस्वी बाईची मस्त गोष्ट. अगदी ओघवत्या शब्दात, गप्पा माराव्यात त्या सहजतेने मांडलेली. जरूर, जरूर वाचा.

झिम्मा: आठवणींचा गोफ
विजया मेहता
राजहंस प्रकाशन 
किंमत रु. ३७५

Wednesday, November 7, 2012

वो नीलम परी ...

तिकडे दूर अमेरिकेत वादळ येणार म्हणून आम्ही बाल्कनीची तिकिटं काढून पॉपकॉर्न घेऊन बसलो होतो, तोवर चोरपावलाने या चक्रीवादळाने कधी प्रवेश केला समजलंच नाही.

सुमारे आठ पाऊंड डायनामाईट. त्याने आमच्या शांत आखीवरेखीव दिवसाला सुरुंग लावलाय. सगळ्या सिस्टीम कोलमडून पडल्यात, प्रायॉरिटीजच्या ठिकर्‍या झाल्यात, नियोजनांना केटो मिळालाय. सद्ध्या नुसतंच हातावर हात धरून बघत बसलोय काय गोड वाताहात चाललीय ते. अजून अंदाजही घेतला नाही झालेल्या नुकसानाचा. निवांत आयुष्याचा विमा उतरवून ठेवलेला नव्हता ... आता कुठे भरपाई मागावी बरं?

***

ही आमची सरप्राईज गिफ्ट. याहून सुंदर आणि वाट बघायला लावणारी दिवाळीची भेट मला आजवर मिळाली नव्हती.

दत्तक बाळ मिळण्याला लोक ‘रेडिमेड’ का समजतात कोण जाणे ... हे ‘आयतं’ बाळ मिळण्यासाठी किती खटाटोप करावा लागतो आणि वाट बघावी लागते हे करून बघाल तर समजेल.

***
त.टी. – तुम्हाला केटो माहित नाही? के(राची)टो(पली) हे अस्त्र व्हेटोहूनही शक्तीमान असून कुठल्याही बेतावर हे अस्त्र वापराचे अनिर्बंध अधिकार परीकडे आहेत.

त.टी. २ – यापुढे इथल्या अनियमिततेला सज्जड कारण आहे याची कृपया नोंद घेण्यात यावी! :)

त.टी. ३ - सध्या मला मनीमाऊला निरखण्यातून सवड न मिळाल्यामुळे फोटो काढलेले नाहीत. तेंव्हा पाच आठवड्यांचं बाळ कसं दिसतं ते सध्यातरी गुगलबाबालाच विचारा.

Tuesday, October 9, 2012

मोती!

आज गॅलरीमध्ये पाणी घालतांना हे मोती सापडले!

फिलोडेड्रॉनवरचे मोती :)
प्रत्येक मोत्यामध्ये एक वेगळं स्वप्न!

Monday, October 1, 2012

माझ्या गोव्याच्या भूमीत ...



पावसाळ्यात गोव्याला फक्त येडे लोक जातात असा माझा आजवर समज होता. इतकी वर्षं पुण्यात राहून मी गोव्याला गेले नव्हते, त्यामुळे पावसाळ्यात का होईना, पण गोव्याला जायला मिळतंय म्हटल्यावर मी संधी साधून घेतली. पावसाळ्यात गोवा बघितल्यावर, “पावसाळ्यात गोव्याला जाऊन लोक येडे होतात” अशी सुधारणा जुन्याच समजामध्ये झाली आहे. :)


वनश्रीची कारागिरी ...


सागरात खेळे चांदी ...









से कॅथेड्रल

शांतादुर्गा
 गोव्याचे अजून फोटो इथे आहेत:





 

Tuesday, September 18, 2012

बाप्पा मोरया!




बाप्पा, सगळ्यांना चांगली बुद्धी दे.
आणि आभाळाएवढं मोठ्ठं मन दे.
.
.
.
.
.
.
आणि मला पुढच्या वर्षी वेळेवर मूर्ती बनवायला सुरुवात करायची बुद्धी दे. :)
***************************
हा आमचा मिनिमालिस्ट बाप्पा. यंदा चक्क गणेश चतुर्थीपूर्वी (अर्धा तास आधी) पूर्ण झालाय. त्यामुळॆ पूजा होण्याचं भाग्य लाभणार त्याला.
***************************
बाप्पा बनवतांचे हे अजून काही फोटो:

bappa_2012

Wednesday, September 12, 2012

अण्णा, पुढे काय?


काल एक आय ए सी चं एक ओपिनियन पोल आलंय – टीम अण्णानी निवडणूकांमध्ये उतरावं का नाही यावर मत घेण्यासाठी. त्या होय / नाही वाल्या पोलमध्ये माझं मत मांडणं शक्य नाही, म्हणून ही पोस्ट.

************************

अण्णा, तुमचे पाठिराखे भ्रष्टाचाराच्या विरोधात एकत्र आलेत. कुठल्या एका राजकीय विचारसरणीमुळे नाहीत. त्यात समाजवादी आहेत, हिंदुत्ववादी आहेत, आणि कधीच कुणालाच मत न देणारेही आहेत. भ्रष्टाचाराला विरोध हा कुठल्या एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम होऊ शकत नाही. भ्रष्टाचाराला आळा सगळ्यांनाच घालावा लागेल. हा एक ‘हायजिन फॅक्टर’ आहे, तो असलाच पाहिजे पण तेवढा पुरेसा नाही. निवडून येणार्‍या राजकीय पक्षाला आर्थिक धोरण लागतं, विधायक जाहीरनामा लागतो. निवडणुका राजकीय पक्षांना लढू द्या.

भ्रष्टाचाराविरोधातल्या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा ही प्रतिक्रिया आहे – आजच्या परिस्थितीवरची. पण फक्त मोर्चे आणि उपोषणं पुरेशी होणार नाहीत आंदोलनासाठी. दबावगट बनवावे लागतील गावागावात. त्यांनी गावपातळीवर भ्रष्टाचाराविरुद्ध लढा द्यावा लागेल. जातीचा दाखला, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, मॅरेज सर्टिफिकेट अश्या सामान्य नागरिकांना नडणार्‍या भ्रष्टाचाराविरुद्ध ते आवाज उठवू शकतील? लोकांची ही कामं सोपी व्हावीत म्हणून मार्गदर्शन करू शकतील? एखादा मेणबत्तीवाला मोर्चा काढण्यापेक्षा हे अवघड नक्कीच आहे, पण राजकीय पक्ष म्हणून निवडून येऊन भ्रष्टाचार दूर करण्यापेक्षा सोपंय. आणि होण्यासारखं आहे.

तुम्ही गांधीजींचा आदर्श ठेवता. त्यांचं सत्याग्रहाचं तंत्र वापरण्याचा आग्रह धरता. गांधीजींनी चळवळीबरोबरच विधायक कार्यक्रम देऊन कार्यकर्त्यांना आंदोलनाबरोबर जोडून ठेवलं. आणि गरीबातल्या गरीब माणसाला माझ्या कृतीतून फायदा झाला पाहिजे असा निकष लावला. आंदोलनकर्त्यांचं चारित्र्य, त्यांची वागणूक आदर्श असलीच पाहिजे म्हणून हट्ट धरला. मोर्चामध्ये सहभागी होणारे कार्यकर्ते एकीकडे “घरभाडं फुल कॅशमध्ये घेतो. पुढेमागे इन्कमटॅक्सवाल्यांचं लफडं नको!” म्हणतांना बघितलं ना, की फार त्रास होतो अण्णा. त्यांच्या पातळीवरचा भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यापासून सुरुवात करावी आंदोलनाने असं वाटतं मला. गांधीजींच्या मार्गाने आंदोलन चालवायचं असेल, तर हाच एक मार्ग दिसतो मला तरी.
*************
 
तुम्हाला काय वाटतं?

Thursday, August 30, 2012

दूधसागर फॉल्सची भटकंती

दूधसागर फॉल्स म्हणजे गोवा - कर्नाटक सीमा. पश्चिम घाटातला सगळ्यात मोठा धबधबा. बारा महिने, खरोखर दुधासारखं पाणी असतं या धबधब्याला. इथे पोहोचण्यासाठी एकच मार्ग - वास्को - लोंढा मार्गावरून येणार्‍या रेल्वेगाड्या. ऑफिशिअल प्रवासी थांबा नसला, तरी प्रत्येक गाडी इथे थांबतेच. गोव्याहून येणारी गाडी घाट चढल्यावर दम खायला दूधसागरला थांबते, आणि लोंढ्याहून जाणारी घाट उतरण्यापूर्वी इथलं सौंदर्य न्याहाळायला. यंदा मला ऐन पावसाळ्यात दूधसागर बघायची संधी मिळाली. त्या भटकंतीचे हे फोटो:


वळणावळणाची वाट


स्कूल चले हम!


शेतकरीदादा नांगरत होते

शेतीच्या कामाची लगबग

भातखाचरात लावणी चालली होती


यांनी स्वागत केलं
गाडी थांबते तिथून साधारण एक – दीड किलोमीटरवर धबधबा आहे.




अंधारातून प्रकाशाकडे !


खालच्या फोटोत दूर डोंगरात आडवी रेघ दिसते ना पांढरी, ती गाडी आहे!



आणि हा धबधबा! रेल्वेच्या पुलावरून फोटो काढलेत. गाडीतून जातांनाही इतक्या जवळून बघता येतो, त्याचे तुषार अंगावर घ्यायला मिळतात.

दूधसागर

दूधसागर

दूधसागर

या पाण्यात खेळायला पुन्हा दिवाळीच्या सुमाराला यायला हवं. पावसाळ्याच्या दिवसात पाण्याला प्रचंड वेग असतो आणि दगड निसरडे होतात, त्यामुळे पाण्यात जाता येत नाही :(


ही दूधसागर स्पेशल ऑर्किड्स - मला पूर्ण प्रवासात ही फक्त इथेच बघायला मिळाली. रेल्वेच्या बोगद्यांच्या जवळच्या उघड्या कातळावर यांचा मस्त गालीचा होता. मातीत कुठेच दिसली नाहीत ही. एक तर चक्क वडाच्या पारंबीवर  आलेलं सापडलं!
दूधसागरचं ऑर्किड

या भटकंतीचे अजून फोटो इथे आणि इथे आहेत:


Wednesday, August 29, 2012

ओरिसाची भटकंती: इकडचं तिकडचं आणि समारोप



ही माझी ओरिसाच्या भटकंतीवरची शेवटची पोस्ट. सगळं लिहून संपवण्याच्या घाईत बर्‍याच इंटरेस्टिंग गोष्टी सुटून गेल्यात. त्या आठवतील तश्या मांडल्यात इथे.

 नक्षलवादाविषयीच्या ‘रेड सन’ पुस्तकाविषयी ऐकलं होतं. या पुस्तकाचा अतिशय सुंदर
सविस्तर परिचय श्रावण मोडक यांनी इथे करून दिला आहे. पुस्तकाविषयी अजून काही सांगत नाही – परिचय आणि पुस्तक दोन्ही आवश्य वाचा इतकंच म्हणेन.

 कोरापूट आणि पोचमपल्लीजवळचा आन्ध्र हे दोन्ही भाग नक्षलांच्यारेड कॉरिडॉरमध्ये येतात.

नक्षल स्मृतीस्तंभ

संस्थान नारायणपूर, पुट्टुपक्कम भागातून जातांना पोलीस कारवाईत मारल्या गेलेल्या नक्षलांचे स्मृतीस्तंभ जागोजागी दिसतात.

  आन्ध्र प्रदेशने नक्षलांविरुद्ध ठोस कारवाई केल्यानंतर इथले नक्षल ओरिसा, छत्तिसगड, महाराष्ट्रात अधिक सक्रिय झाले. आता इथे सगळं शांत शांत आहे असं समजलं. पण आजही गावातल्या घराघरावर नक्षल ग्राफिटी दिसते.

घरांवरची ग्राफिटी
सहज पुण्यातून बाहेर पडल्यावर सिंहगडावर किंवा ताम्हिणीला जातांना घराघरावर नक्षल घोषणा  लिहिलेल्या दिसल्या तर कसं वाटेल? हा विचार डोक्यात आल्याखेरीज राह्त नाही.

हे सगळं हैद्राबादपासून केवळ एक दीड तासाच्या रस्त्यावर. हा भाग दुर्गम नाही, कोरापूटशी तुलना करता मागास तर नाहीच नाही. ताडाची आणि कपाशीची शेती आहे. पारंपारिक विणकामाचा व्यवसाय आहे. शाळा, कॉलेजं आहेत, दवाखाने आहेत. कित्येक जण कामाला हैद्राबादला जातात. दोन्ही भागातल्या प्रश्नांचं स्वरूप नक्कीच वेगवेगळं असणार. पण तिथेही नक्षल आहेत, इथेही आहेत. नेपाळपासून तामिळानाडूपर्यंत सगळीकडेच हे कसे पसरले? तेंव्हा आम्ही काय करत होतो? मानेसरच्या कामगारांच्या हिंसाचारामागेही त्यांचा हात असतो, आणि दांतेवाडामधल्या पोलिसांच्या हत्यांमध्येही. मोठया शहरांमध्ये त्यांचे स्लीपर सेल आहेतकाय हवंय नेमकं या नक्षलांना? त्यांच्या मते आदिवासींवर अन्याय होतोय. ते फसवले जाताहेत. अगदी खरं आहे हे. इतकी वर्षं त्यांची वंचना झाली आहेच. काय उपाय आहे यावर? नक्षलांच्या आजवरच्या कारवाया बघितल्या, तर हे लोक कुठल्या विचारसरणीसाठी किंवा विकासासाठी लढताहेत असं म्हणवत नाही. मग उरतो फक्त एकच उद्देश – तुम्ही आज जी सत्ता भोगता आहात, ती आम्हाला द्या. त्यासाठी अराजक माजवण्याचीही आमची तयारी आहे. जिथे जिथे सरकारविरोधी असंतोष आहे, तिथे नक्षल आहेत. आणि दुर्दैवाने आपल्याला अतिरेकी कारवायांचा धोका जितका जाणवतो, तितका नक्षलांचा जाणवत नाही. कारण मुंबईच्या ताजवर अतिरेकी हल्याचं लाईव्ह चित्रीकरण आपण बघू शकतो. छत्तीसगढच्या जंगलात नक्षलांच्या कारवाया आपल्या डोळ्यासमोर घडत नाहीत. ते ‘दूर कुठल्यातरी जंगलात’ घडत असतं. पुण्यामुंबईतही त्यांचे स्लीपर सेल आहेत याचा आपल्याला पत्ता नसतो.

    सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे आपल्याकडच्या विचारवंतांच्या वर्तुळांमध्ये अजूनही नक्षलांविषयी रोमॅंटिक कल्पना आहेत. दिल्लीला जेएनयूमध्ये असतांना आयसा (AISA) सारख्या विद्यार्थी संघटनेच्या पत्रकांमध्ये यांचं कौतुक मी स्वतः वाचलंय. ती पत्रकं वाचून तर कधी जाऊन या क्रांतीकारकांना आपण सामील होतो असं वाटेल.

    पोचमपल्ली नावाची दोन गावं आहेत. एक आन्ध्रातलं साड्यांचं पोचमपल्ली, दुसरं तमिळनाडूमधलं. आन्ध्र पोचमपल्लीलाभूदान पोचमपल्लीम्हणतात. विनोबांची भूदान चळवळ इथून सुरू झाली होती म्हणून. भूदान यशस्वी झालं असतं, तर इथे नक्षल इतके प्रभावी होऊ शकले असते का?

*************************************
    ओरिसाच्या भटकंतीच्या कहाणीचा समारोप करायचं मी इतके दिवस पुढे ढकलते आहे. कारण लिहितांना खूप गोष्टी सुटून गेल्यात, बर्‍याच गोष्टी अजून डोक्यात अर्ध्या कच्च्या आहेत, आणि आपल्याला जे वाटतंय, ते लिहिता येणार नाही अशी जवळपास खात्री आहे.

केचला मधली शाळा बघणं हे निमित्त होतं. मला कोरापूटला जायचं होतं, ते सरकारचं काम नेमकं कसं चालतं ते बघायला. यूपीएससीचं स्वप्न मीही कधीतरी बघितलं होतं. त्यामागे अशी समजूत होती, की प्रशासनात जाऊन तुम्ही खरंच देश समजून घेऊ शकता, काही बदल घडवून आणू शकता. काठावर बसून टीका करणं सोपं असतं. त्यात तुम्हाला करावं काहीच लागत नाही. प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे खरे. ते स्वप्न मागे राहिलं, आणि त्याबरोबरच तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात काही बदल घडवण्याची मोठी संधीही. आता त्याविषयी हळहळ करण्यात अर्थ नाही. पण ही भेट या हुकलेल्या संधीच्या शक्यता बघण्यासाठी होती.

कोरापूटच्या जगन्नाथाचा रथ

महाराष्ट्राच्या, पुण्याच्या जनजीवनातलं प्रशासनाचं स्थान आणि कोरापूटमधलं कलेक्टरांचं स्थान यांची तुलनाही करणं अवघड आहे. तिथली जनता अजूनही मायबाप सरकारवर पूर्ण अवलंबून आहे. अजूनही तिथला कलेक्टर जिल्ह्याचा राजा आहे. सगळे अधिकारही त्याचेच, आणि जबाबदारीही. अश्या पदावर जेंव्हा शिवाजी महाराजांच्या मुलकी प्रशासनाचा आदर्श ठेवणारा अधिकारी असतो, तेंव्हा त्याला काम करतांना बघणं हे फार मोठं सुख असतं. माझ्या जिल्ह्यातल्या आदिवासी शेतकर्‍याचं अर्थशास्त्र मला समजून घ्यायचंय म्हणून तो रस्त्यात भेटलेल्या शेतकर्‍याशी गप्पा मारतो. कुठल्या गॅझेटमध्ये न लिहिलेल्या गोष्टी या गप्पांमधून उलगडतात. प्रत्येक फील्ड व्हिजिटमध्ये तो किमान एका शाळेला भेट देतो, तिथल्या मुलांशी गप्पा मारतो. यंदा तुमच्या शाळेचा निकाल १००% लागलाच पाहिजे हे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या पुढे ठेवतो. कलेक्टर सर आपल्याशी वेळ काढून बोलले, याचा केवढा आनंद आणि अभिमान वाटत असेल त्या शाळेच्या मुलांना!

आणि दर्शनासाठी जमलेले भाविक

कोरापूट हा नक्षलग्रस्त जिल्हा. जिल्ह्याचे कित्येक ब्लॉक नक्षलांच्याच प्रभावाखाली आहेत. चार वर्षांपूर्वी थेट जिल्हा पोलीस मुख्यालयावर हल्ला झाला, इतके इथे नक्षल प्रबळ आहेत. आधीच दुर्गम आणि मागास भाग, त्यात नक्षलांचा उपद्रव. त्यामुळे इथे काम करायला सरकारी कर्मचारी तयार नसतात. कित्येक जण इथली बदली संपेपर्यंत कार्यभार स्वीकारतच नाहीत. आज जिल्ह्यातल्या तहसीलदार, बीडीओच्या(कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्षात फील्डवर) एकूण पदांपैकी जवळापास निम्मी पदं रीक्त आहेत. काही महिन्यांपूर्वी इथल्या आमदारांचं नक्षलांनी अपहरण केलं होतं. त्यावरची कलेक्टरांची प्रतिक्रिया म्हणजे “या भागाच्या विकासाच्या मागणीसाठी अपहरण केलं असा नक्षलांचा दावा आहे. माझीसुद्धा तीच मागणी आहे. आता इथल्या तहसीलदार आणि बीडीओच्या पोस्ट भराव्यात म्हणून मी सुद्धा आमदारांचं अपहरण करावं म्हणतो!”

आदिवासी संग्रहालयाचं प्रवेशद्वार
ओरिसाच्या एका कोपर्‍यात इतकं मनापासून काम करत असतांना एकीकडे देशात लाखो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या येत असतात. मानवी अधिकारांच्या नावाखाली नक्षलांची पाठराखण करत सरकारी कर्मचार्‍यांना धारेवर धरणारी एक मोठी लॉबी तुमच्या विरोधात असते. कुणाच्यातरी भ्रष्टाचाराच्या आड आल्यामुळे कोर्टाचे खेटे घालायची वेळ येते. तुमच्या कामाची विशेष दखलही घ्यायला कुणाला वेळ नसतो. कोरापूटच्या पोस्टिंगमध्ये कलेक्टरांबरोबरच घरातल्या सगळ्यांनाही सक्तीची सुरक्षा व्यवस्था असते. अंधार पडल्यावर बाहेर फिरायचं नाही, गाडीशिवाय घराबाहेर पडायचं नाही. एकट्याने फिरायचं नाही. कारण अजून एक नक्षल अपहरण परवडणार नाही. पण जिल्ह्याच्या ठिकाणी नक्षलांचा सामना करणार्‍या या अधिकार्‍याला या प्रश्नाची जी समज आलेली आहे, ती वरून येणार्‍या सरकारी धोरणांमध्ये प्रतिबिंबित होत नाही. या सगळ्या परिस्थेतीत तुला फ्रस्टेशन नाही येत का? गळकी बादली भरण्यासाठी आपण थेंबथेंब टाकतोय याचं वैफल्य नाही वाटत? पुण्याहून निघायच्या वेळेपासून मनात असलेले प्रश्न. “परिस्थिती खरंच भयंकर आहे. आणि आपण प्रश्न जास्त अवघड करून ठेवतोय. हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. पण आश्चर्य म्हणजे माझा कामाचा उत्साह कायम आहे.” हे त्यावर कलेक्टरांकडून मिळालेलं उत्तर.

जर मी झालेच असते आयएएस, तर याहून वेगळं काय करणार होते? आपलं धूसर स्वप्न कुणीतरी जगतंय याचा आभाळाएवढा मोठा आनंद परत येतांना मनात असतो आणि या होपलेसली ऑप्टिमिस्टिक माणसाला असंच काम करत रहायला बळ मिळू दे अशी प्रार्थना.