Thursday, February 25, 2016

Why I have no political future ...

मी जेएनयूमध्ये शिकले आहे, आणि तिथलं स्वातंत्र्य मनापासून एन्जॉय केलेलं आहे. विशेषतः “खरं सांग, तो तुझा आतेभाऊच होता कशावरून?” अशी उलटतपासणी घेणार्‍या, रात्री आठ वाजता कुलूप लागणार्‍या “भाऊच्या शाळेतल्या” होस्टेलच्या कहाण्या ऐकून तिथे गेल्यावर तर इथे आपल्याला ग्रोन अप म्हणून वागवताहेत आणि वाट्टेल त्या चुका करण्याचं स्वातंत्र्य आहे हा फार सुखद अनुभव होता. रॅगिंग आहे, ड्रग्जचा अड्डा आहे, सेफ नाही असं काहीही मी जेएनयूला जाण्यापूर्वी ऐकून होते. पण दिल्लीसारख्या शहरात एकट्या मुलीने राहण्यासाठी जेएनयू कॅम्पसइतकी सुरक्षित जागा नसेल. And the best part was, you did not have to confirm! तुम्हाला वाटेल ते करा, तुम्हाला रोखणारं कुणीही नाही. The diversity is beautiful. इतकं सुंदर वातावरण मला दुसर्‍या कुठल्याच शैक्षणिक संस्थेत बघायला मिळालं नाही.
तिथे शिकत असताना चुकूनही विद्यार्थी संघटनांच्या वाटेला गेले नव्हते. एक तर राजकारण हे आपलं क्षेत्र नाही असं तेंव्हाही माझं ठाम म्हणणं होतं, आणि दुसरं म्हणजे आजूबाजूला दिसणारी एकही विद्यार्थी संघटना मला जवळची वाटली नव्हती. घोषणाबाजीची ऍलर्जी होतीच. सगळ्या संघटनांची सगळी पत्रकं मात्र आवर्जून वाचायचे, गंगा लॉनवरच्या डिबेट्स बघायचे. आणि हे आपलं क्षेत्र नाही, यातलं कुणीही आपल्या जवळचं नाही हे प्रत्येक वेळी अजून प्रकर्षाने वाटायचं.
आजवर तसे डाव्यांपेक्षा मला उजवेच (त्यातल्यात्यात) जवळचे वाटत आले आहेत. उजव्यांच्या विचारच न करण्याच्या परंपरेपेक्षा डाव्यांच्या ढोंगाचा जास्त तिटकारा वाटत आला आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आले तेंव्हा या सरकारकडून बर्‍याच अपेक्षा होत्या, आणि एका माणसाच्या हातात एवढी सत्ता, त्याला कुणीच शहाणा आणि तुल्यबळ विरोधक नाही हे बघून भीतीही वाटत होती. या सरकारला मला "ढोंगी डाव्यांच्या" बाजूचं करण्यात यश आलंय!
विद्यार्थी नेते फार शहाणे असतात असं मुळीच नाही. त्यांचे बोलविते धनी विद्यापीठाबाहेरच असतात, हे बाकी विद्यार्थ्यांनाही माहित असतं. दहा – बारा विद्यार्थी देशविरोधी घोषणा देत असतील तर त्या ऐकायला जेएनयूतले बाकी विद्यार्थीसुद्धा फिरकले नसते. फार तर कुणीतरी तक्रार केल्यावर विद्यापीठाने या विद्यार्थ्यांवर कारवाई केली असती. मुलांचं हे वागणं समर्थन करण्यासारखं नक्कीच नाही, पण केंद्र सरकारने जातीने लक्ष घालून विद्यार्थी नेत्यांवर कारवाई करावी एवढं मोठं होतं का हे? Sedition म्हणण्याइतकं? काश्मीरमध्ये पीडीपीबरोबर युती चालते आणि इथे एकदम sedition! Don’t we have any real issues to deal with?
त्यानंतर चाललेली समर्थकांची चिखलफेक दोन्ही पक्षांची पातळी दाखवतेय. जेएनयू मध्ये अमूक इतकी कंडोम्स वापरली गेली यावर मोदीसमर्थकांनी टीका करावी? This is about consenting adults. It is none of their business. देशाचे पैसे वापरून (जे एन यूमधलं शिक्षण भरपूर subsidized आहे, म्हणूनच कितीतरी हुशार विद्यार्थी तिथे शिकू शकतात.) इथेले सगळे विद्यार्थी देशद्रोही कारवाया करत आहेत, हे विद्यापीठ बंद करा म्हणायचं? का विरोधकांनी देशात हिटलरशाही आली म्हणायचं? सद्ध्या जे काही चाललंय हे आणिबाणीपेक्षा वाईट आहे? Have we lost all sense of proportion?

Wednesday, February 17, 2016

गोगलगाय आणि पोटात पाय!

    मागे अलिबागच्या पोस्टमध्ये मी म्हटलं होतं की शंख समजून चुकून दोन जिवंत गोगलगायी उचलून घरी आणल्यात. तसे ते शंख फार सुंदर दिसणारे वगैरे नव्हते, पण समुद्रावर जाऊन एकही शंख / शिंपला सापडला नाही यावर माझाच विश्वास बसत नव्हता म्हणून हे शंख उचलले. साडेतीन – चार इंच आकाराचे हे दोन शंख दोन दिवसांनी स्वच्छ करायला पाण्यात टाकले आणि आतल्या काळपट तपकिरी गोगलगायी बाहेर आल्या.

Giant African Land Snail


    आता यांचं काय बरं करायचं? बागेतल्या गोगलगायी झाडांचे कोवळे कोंब खातात, म्हणून त्यांना कटाक्षाने झाडांपासून लांब ठेवावं एवढं ठरवलं. पण कुठे सोडायच्या त्या हे बघावं म्हणून नेटवर जरा शोधाशोध केली. पहिल्यांदाच गोगलगायींविषयी माहिती शोधत होते. तेंव्हा समजलं, की या बहुतेक Giant African Land Snail  प्रकारच्या गोगलगायी आहेत, मूळच्या पूर्व अफ्रिकेतल्या या गोगलगायी आज जगात अनेक ठिकाणी (आपल्या कोकणासकट) आढळतात.

    या जातीच्या गोगलगायी पाच सात वर्षे आरामात जगू शकतात. हवा अती थंड असेल तर hibernate करतात, फार उन्हाळा / पाण्याची कमतरता असेल तर aestivate करतात (हायबरनेशन थंडीमध्ये करतात, तसंच उन्हाळ्याला / पाण्याच्या कमतरतेला तोंड देण्यासाठी inactivity आणि metabolic rate कमी करणे म्हणजे aestivation.) हा aestivation चा कालावधी तीन वर्षांपर्यंत असू शकतो!!! यांचं अन्न म्हणजे सुमारे ५०० प्रकारच्या वनस्पती. जगातल्या सर्वाधिक invasive समजल्या जाणार्या  १०० प्रजांतींमध्ये यांचा समावेश होतो. शेती / बागांचं प्रचंड नुकसान त्या करू शकतात. ऑस्ट्रेलियामध्ये, अमेरिकेच्या काही भागात यांच्या बंदोबस्तासाठी बरेच प्रयत्न केले जातात. (आपल्याकडे शेताला गोगलगायींच्या उपद्रवाविषयी मला काहीही माहित नव्हतं!) आफ्रिकेत त्यांचा फार त्रास नाही, कारण तिथे या खाल्ल्या जातात – त्यांचे मांस अतिशय पौष्टिक आणि रुचकर समजतात!

    गोगलगायी hermaphrodites आहेत. म्हणजे प्रत्येक गोगलगायीत स्त्री आणि पुरुष जननेंद्रिये दोन्ही असतात. दोन गोगलगायींचे मिलन होते, त्यानंतर दोघीही अंडी घालू शकतात, आणि त्यांच्या प्रजननाचा वेग प्रचंड असतो.

    गोगलगायींना दिसतं, वास येतो, पण ऐकू येत नाही. त्या निशाचर असतात, सूर्यप्रकाश टाळतात.

    दिसायला नाजूक वाटल्या तरी गोगलगायी त्यांच्या वजनाच्या १० पट वजन उचलू शकतात!

    हे सगळं समजल्यावर कुठून ते शंख उचलायची बुद्धी झाली म्हणून पहिले कपाळाला हात लावला. मग त्यांना टेकडीवरच्या पाण्याच्या टाकीत किंवा अशा कुठेतरी सोडून देण्याची बुद्धी झाली नाही म्हणून सुटकेचा निश्वास टाकला. आता या कुठे ठेवू / कशा नष्ट करू म्हणून सध्या चिंतेत आहे. तुम्हाला कुणाला चविष्ट गोगलगाय खायची असेल तर घेऊन जा, खास आग्रहाचं निमंत्रण!!!

Monday, February 8, 2016

अजून एक फसलेला प्रयत्न

    माऊबरोबर पुस्तकं तशी बरीच वाचली जातात, आणि गाणी पण ती आवडीने बघते. पण बाकी टीव्ही, जाहिराती आणि कार्टून प्रकारापासून तिला तसं लांबच ठेवलंय आतापर्यंत. अधूनमधून एखादा सिनेमा तिच्याबरोबर बघायचा प्रयत्न असतो. काल माऊबरोबर “Finding Nemo” बघू या म्हटलं. जेमतेम १५ मिनिटं बघितला असेल तो आम्ही.

    “आई, त्या पिल्लाची आई कुठंय?”
    “त्याच्या आईला त्या मोठ्या माश्याने खाऊन टाकलं.”
    “का?”
    “त्याचा खाऊ आहे तो बाळा. मोठा मासा छोट्या माश्याला खातो!”
    “आई, त्याची आई कुठेय? आई हवी!”
    “अग, तो बाबाबरोबर किती छान खेळतोय बघ!”
    “नाही, आई पाहिजे!”

    असं म्हणून पहिल्या मिनिटाला जे रडं सुरू झालं, थांबेचना - “मला पुढची गोष्ट नको. त्याची आई हवी!”

    आतापर्यंत तीन – चार सिनेमे माऊला दाखवायचा प्रयत्न करून झालाय. “मादागास्कर” मध्ये सुरुवातीला सगळं काही ठीक चाललं होतं, पण अलेक्स त्याच्या मित्राला मारणार असं वाटल्यावर रडायला सुरुवात. “अप” मध्ये केव्हिनला पकडल्यावर तेच. आणि “मकडी” तर तिने बघितलाच नाही. हे असं रडणं सुरू झालं, की आपण हे दाखवायच्या फंदात का पडलो म्हणून मला पश्चात्ताप होतो. एरव्ही माऊ अंधाराला, अनोळाखी माणसांना, भूभूला कश्शाला घाबरत नाही. गोष्टीतही कुणीतरी दुष्ट मावशी वगैरे भेटतेच. पण सिनेमात कुणी दुष्टपणा केला किंवा मरून बिरून गेलं की संपलंच. आणि सगळं फक्त गोडगोड अशी गोष्ट कशी सापडणार आणि आवडणार? माऊला उगाच रडायला लावायचं नाहीये, आणि जगाची रीत तर तिला हळुहळू कळायला हवीय. कुठला सिनेमा दाखवावा बरं आता माऊला?

Monday, February 1, 2016

पुन्हा एकदा सर्च ...

    सर्च / डॉक्टर अभय आणि राणी बंग यांच्या कामाविषयी एक थोडक्यात आढावा घ्यायची संधी मिळालीय सद्ध्या. त्या निमित्ताने माझीच जुनी ब्लॉगपोस्ट वाचली, आणि जाणवलं, की मी त्या पोस्टमध्ये फार थोडं, वरवरचं मांडलंय.

    पहिली गोष्ट – डॉक्टर अभय बंगांनी तेंव्हाच्या माझ्या शोधाविषयी जे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, ते तेंव्हा अजून पचवणं चाललं होतं. (अजूनही ते पूर्ण झालं म्हणवत नाही.) त्यामुळे त्याविषयी पोस्टमध्ये काहीच उल्लेख नाही. जेंव्हा आपल्याला काय हवंय ते इतकं असतं, शब्दात पकडता येत नसतं, तेंव्हा काय करायचं? कसं शोधायचं? हा माझा प्रश्न होता. डॉक्टर अभय बंग म्हणाले, विनोबांनी मला सांगितलं होतं ... “आपला स्वधर्म आपल्या जागीच सापडतो.” हे ऐकतांना मला पार गीतेतलं, आपण आयुष्यभर आपलं विहित कर्मच करत राहिलं पाहिजे असं deterministic वाटलं होतं. त्यामुळे फारसं पटलंही नव्हतं. पण जितका त्यावर विचार करत गेले तितके याचे अधिकाधिक पदर स्पष्ट होत गेले. आपल्या आजूबाजूला अनेक मोठी माणसं असतात. त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला वाटतं, “ग्रेट! आयुष्यात असंच काहीतरी करायला हवं माणसाने! नाहीतर काय अर्थ आहे या जगण्याला?” वगैरे वगैरे. त्याच वेळी त्यांचं जगणं खूप अवघड पण वाटतं. हे आपल्याच्याने होणार नाही हेही आतून आपल्याला माहित असतं.
   
    मग या “आतून माहित असण्या”वर आपण अजून जरा जास्त का विसंबत नाही? आपल्याला पेलेल, झेपेल, ज्यात आपल्या क्षमता पुरेपूर वापरल्या जातील आणि आपल्याला आनंदही देईल असं काम कुठलं, ते हे “आतून माहित असणं”च सांगणार आहे ना! आपल्या जागी सापडणार्याम स्वधर्माचा अर्थ आता असा समजतोय मला.

    अजून एक फार मोठी गोष्ट लिहितांना चक्क सुटून गेली होती. डॉक्टर अभय बंग एका आदिवासी बालमृत्यूचा किस्सा सांगतात. न्युमोनिया झालेल्या एका कुपोषित नवजात बाळाने तपासणी करत असतांनाच त्यांच्यापुढ्यात शेवटचा श्वास घेतला. हा बालमृत्यू का झाला याचा विचार करतांना त्यांना तब्बल १८ कारणं सापडली:

    बाळाचं कुपोषण गर्भातच सुरू झालं. त्याची आई स्वतःच कुपोषित होती. तिला पोटभर खायला नव्हतंच, खेरीज गरोदरपणी आई पोटभर जेवली तर बाळ जास्त लठ्ठ होतं आणि बाळंतपण अवघड होतं असा समज. जन्मानंतर बाळाला लगेच दूध मिळालं नाही कारण पहिले तीन दिवस बाळाला पाजायचं नाही ही तिथली समजूत. त्यानंतर आईला दूधच आलं नाही. मग गाईचं दूध खूप पातळ करून अस्वच्छ बाटलीतून पाजलं गेलं. पोट भरायचं नाही म्हणून बाळ सतत रडायचं, रडून रडून त्याचा घसा बसला. त्यात हगवण सुरू झाली. त्यानंतर आरोग्यसेवेऐवजी जादूटोण्याचे उपाय झाले. हे दूधही बंद करून साबुदाण्याचं वरचं पाणी पाजायचा सल्ला मिळाला, तो अंमलातही आणला. बाळाचा बाप सतत दारू पिऊन पडलेला, आईला मलेरिया. तशात बाळाला न्युमोनिया झाला, परत मांत्रिकाकडे नेलं. अखेर एके दिवशी सकाळी बाळ खूपच सिरियस झाल्यावर बाळाला घेऊन आई आणि आजी दवाखान्यात यायला निघाल्या. दवाखाना केवळ चार किमी अंतरावर, पण वाटेत नदी, तिला पूर आलेला. नदीवरचा पूल निकृष्ट बांधकामामुळे खचलेला, त्याचं बांधकाम पूर्णही केलेलं नाही. त्यामुळे पूर ओसरेपर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नाही. संध्याकाळी पूर ओसरल्यावर त्या दवाखान्यात पोहोचल्या तोवर खूप उशीर होऊन गेला होता.

    अशा घटना, ही कारणं आपणही कधीतरी ऐकलेली असतात. हे बदलायचा प्रयत्न करणं म्हणजे आभाळाला ठिगळ लावण्यासारखं वाटायला लागतं मग.  डॉक्टर बंग याविषयी काय म्हणतात हे महत्वाचं. ही सगळी कारणं सुटणं महत्वाचं आहेच. पण आपलं पहिलं उद्दिष्ट बालमृत्यू थांबवणं हे आहे. त्यासाठी ही सगळी कारणं सुटायची गरज नाही. यातलं एक कारण जरी कमी झालं तरी हा बालमृत्यू टळू शकतो! त्यांचं सगळं संशोधन आणि काम हे या दृष्टीकोनातून आहे. काय केल्याने लवकरात लवकर, कमीत कमी खर्चात आपण बालमृत्यू टाळू शकू?

    यासाठी संशोधन करायला हवं. हे संशोधन सुसज्ज प्रयोगशाळांमध्ये व्हावं म्हणून बालमृत्यूपासून पार दूर कुठेतरी व्हायची गरज नाही. जिथल्या लोकांना याची गरज आहे तिथे संशोधन झालं तरच आपल्याला मृत्यूची नेमकी कारणं समजणार आहेत, आणि कमीत कमी खर्चात, लवकरात लवकर बालमृत्यू थांबवता येणार आहेत. आणि हे संशोधन शास्त्रीय कसोट्यांवर स्वीकारलं गेलं तर यातूनच राज्याच्या, देशाच्या आणि जागतिक स्तरावरही धोरणनिश्चितीवर प्रभाव टाकता येणार आहे. हा विचार घेऊन डॉक्टरांनी सर्चचं काम उभं केलेलं आहे. त्यामुळे त्याचं काम एकाच वेळी गडचिरोलीसारख्या महाराष्ट्रातल्या दुर्लक्षित जिल्ह्यासाठीही महत्वाचं आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेसाठीही.

    पुढच्या वेळी सर्चचा शोध घेताना निसटून गेलेलं अजून काय काय सापडेल काय माहित! :)