Saturday, June 7, 2008

भीती

भीती

काही महिन्यांपूर्वी ’अंतर्नाद’ मध्ये हेमंत जोगळेकरांचा भीतीविषयीचा लेख वाचला. त्यातलं काहीच पटलं नाही somehow. खूप उथळ, वरवरचं वाटलं. शाळकरी मुलांनी लिहिलेला निबंध वाचत असल्यासारखं वाटलं - भाषेची पकड यॆण्यासाठीचा सराव. शब्दांचा फुलोरा. त्यातून व्यक्त काय करायचं आहे त्यांना? ’सगळ्या माणसांच्या मनामध्यॆ, कायम भीती ही असतेच.’ बस एवढंच सार संपूर्ण लेखाचं.

जगातल्या प्रत्येक माणसाने आयुष्यात कधीतरी प्रचंड, तळ नसलेली भीती अनुभवली असेल कदाचित. बहुधा मरणाची भीती. पण मग एखाद्या ध्येयाने वेडे होऊन जे या भीतीच्या पलिकडे जाऊ शकले, ते कसे गेले? का ’Courage is fear that has said its prayers' एवढं साधं, सरळ असतं हे सगळं? माधवराव पेशव्यांबरोबर सती गेलेल्या रमाबाईंना क्षणभरही भीती वाटली नसेल? मुरारबाजी, तानाजी, फिरंगोजी यांच्या लहानपणापासून ऐकलेल्या इतिहासातल्या गोष्टींमध्ये नुसतं "ते खूप शूर होते. मरणाला घाबरणारे नव्हते" म्हणून बोळवण करतात. ही सगळी माणसं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कुठल्याच क्षणी न घाबरण्याचा कुठला तरी "mutant gene" घेऊन जन्माला आली असतील असं मला वाटत नाही.

लहानपणी मला कसलीच भीती वाटायची नाही म्हणून आई टरकून होती. पोहोता येत नसतांनासुद्धा मी बिनधास्त माझ्या डोक्याएवढ्या, त्याहूनही खोल पाण्यामध्यॆ धडाधड उड्या मारायचे. Somehow,आपण पाण्यात बुडू, मरून जाऊ असं मला कधी वाटलंच नाही. पाणी आपल्याशी खेळतंय असं वाटायचं. आणि आपल्याला मुद्दामहून कोणी बुडवण्याचा प्रयत्न करणार नाही अशीही पूर्ण श्रद्धा होती. हा attitude आजही विशेष बदललेला नाही. प्रसाद्ला हा निष्काळजीपणा वाटतो. माझा हा स्वभाव आहे, त्याला इलाज नाही. तो बदलण्याची मला इच्छाही नाही. भीती न वाटणं हे अनैसर्गिक आहे का?

भीती वाटते म्हणजे नेमकं काय होतं? सगळे निर्भय म्हणून नावाजलेले लोक काही मुद्दाम, थ्रील म्हणून धोका पत्करणारे नव्हते - म्हणजे थ्रील अनुभवण्यासाठी मुद्दमहून मृत्यूगोलामध्ये उडी घेणारे नव्हते. पण वेळ आली तेंव्हा त्यांनी तेही केलं. कसं? मला असं काही करण्याची वेळ आली तर? मला प्रथम थोडं शांत बसावंसं वाटेल. (fear saying its prayers ;)) नंतर मग फक्त आल्या क्षणाचा विचार करायचा. एका सीमेपर्यंत तुम्हाला भीती वाटेल. त्यानंतर तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन पोहोचता. तेंव्हा फक्त ’इस पल की सच्चाई’ जाणवते असं मला वाटतं.

‍ऑपरेशन हा एक मला न पचणारा प्रकार आहे. एकूणातच वैद्यकसाम्राज्य आणि त्यांचा तुमच्याकडे ’स्त्री, वय ३१, यापूर्वीचे मोठॆ आजार, आजोबा काय रोगाने गेले...’ केस नंबर १६ म्हणून बघण्याचा दृष्टीकोन पचनी पडणं जडच जातं. एक तर हे लोक तुमच्याकडे फक्त शरीर म्हणून बघत असतात. त्याच्या भविष्याविषयी छातीठोक विधानं करत असतात. पुन्हा treatment विषयी तुम्हाला विश्वासात घेऊन सांगणारे डॉक्टर मोजकेच. त्यमुळे शक्यतो आपलं आरोग्य आपण सांभाळावं, डॉक्टरच्या वाटेला जाऊ नयॆ असं माझं मत. पण ऑपरेशन करायचं ठरल्यावर माझा नाईलाज झाला. (आता कुठे पळून जाणर? ;) ) शेवटी म्हटलं, let me face it. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांवर माझा १००% विश्वास होता. मग आपल्या शरीराला दोन चार तास पूर्णपणे त्यांच्या हवाली करायला काय हरकत आहे? मस्त निर्धास्त, शांत झोप लागली या विचाराने. एवढी निवांत मी कित्येक वर्षात नव्हते. हा विचार मनात येण्यापूर्वी जी अस्वस्थता होती, ती भीती होती का? आणि मग मझ्या विचारांनी भीतीवर मात केली?

बाबा आमटे जिला ’निर्भयतेची साधना’ म्हणतात ती नेमकी कशी असते? जन्मतः भिरू असणारी व्यक्ती ठरवून निर्भय होऊ शकते? कसं बनायचं निर्भय? कशाची भीती, कशामुळे भीती वाटते याचा वस्तुनिष्ठ विचार करून, या विचारांमुळे भावनेच्या पलीकडे जाता येतं? का एखाद्या लहान बाळासारखं निर्धास्त कुणाच्यातरी मांडीवर ’घालू तयावरी भार’ म्हणून झोपणं त्यापेक्षा सोपं आहे? रमाबाई किंवा तानाजीराव वर भेटलॆ म्हणजे त्यांना विचारायला पाहिजे.

6 comments:

मकरंद said...

हल्ली काम करता करता तुमचे ब्लॉग वाचण्याचा नवा छन्द लागला आहे. छानच लिहिता की हो तुम्ही. ह्या फियर फॅक्टर वर एक छान विधान माझ्या वाचनात आले होते. डेविड श्वार्टज़ नावाच्या लेखकाचे. त्याचे म्हणणे होते की,"To beat the fear, do the things you fear most."

Gouri said...

मकरंद,तुमची कॉमेंट वाचून छान वाटलं. डेव्हीड श्वार्ट्झचं म्हणणं एकदम पटलं ... भीतीवर मात करायची हा आपला निर्णय असतो ... आणि भीतीवर मात करण्यासाठी या भावनेला सामोरं जायला हवं ... ज्या गोष्टीची भीती वाटते ती करून!

रोहन... said...

आयुष्यात कमी-अधिक भीती कधी ना कधी प्रत्येकाला वाटतेच... त्यातून कोणीच सुटलेले नाही. हा आता त्यावर मात करता येते ही नक्की.. असे अनेक अनुभव येतात डोंगरात भटकताना.

Gouri said...

@ रोहन, ट्रेकिंग किंवा कुठल्याही ऍडव्हेंचर स्पोर्ट्सचं थ्रिल भीती वाटणं आणि तिच्यावर मात करणं यातच असतं, नाही का? शारीरिक क्षमतेइतकीच तिथे मनाची ताकद कसाला लागते.

vaishali said...

Gouri, khupach ushira comment takat ahe tujhya post var, pan itakyat tujha blog milala net var surf karatana ani desc order ne tujhya post vachat ale, ya post madhe tu mhanate ki tula bhiti vatat nahi mhanun ani tujya dusarya eka post madhe as janaval ki vatate tula bhiti (jya thikani office la jatana ushir jhalela asato ani road var accident houn traffic jam jhalel ani ratri tu vichar karate ki tya thikani lagech mage majhi gadi asati tar etc etc)

Gouri said...

वैशाली, ब्लॉगवर स्वागत.
भीती वाटतच नाही असं मला म्हणायचं नाही इथे. पाण्याची, उंचीची भीती अश्या प्रकारची भीती मला फारशी वाटत नाही, किंवा लहानपणी अंधाराची, बुवाची असली कुठली भीती वाटायची नाही.
त्या अपघाताविषयीच्या पोस्टमध्ये भीतीपेक्षाही, आपण जगणं किती गृहित धरून चालतो यावर भर आहे.