Tuesday, February 2, 2010

हरवलेला

घराच्या वस्तूशांतीच्या वेळची गोष्ट. भरपूर नातेवाईक मंडळी जमली होती. तीन चार दिवस घर एकदम गजबजलेलं होतं. वास्तूशांत झाली, घर शांत व्हायला सुरुवात झाली. एक एक पाहुणे मंडळी जायला लागली आणि घरातली एक एक वस्तू जागेवर यायला लागली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत घर मोकळं झालं, हळुहळू नॉर्मलवर येऊन पोहोचलं ... आणि तिला शोध लागला, एक चमचा गायब आहे! पाहुणे मंडळींपैकी कुणीतरी आपला चमचा ठेवून तिच्या चमच्यातला एक घेऊन गेलेत. लग्नाच्या आधी दोघांनी मिळून संसाराला लागणाऱ्या गोष्टींची यादी बनवून हौसेने केलेल्या खरेदीतला एक. दर बदलून आलेला चमचा वापरताना तिला हटकून त्याची आठवण येते. कुठे असेल बिचारा? आपला चमचा कसा ओळखू येत नाही या लोकांना? तेंव्हा स्वतःचा विसरले तसा हा सुद्धा कुठेतरी गळपटणार ... महिनेच्या महिने कुठल्यातरी डब्यात पडून राहणार, किंवा अजून कुठेतरी विसरलेला असणार ... धुवून आल्यावर पुसताना कुणी त्याच्याकडे बघून ओळखीचं हसणार नाही. त्याच्या बरोबरचे बाकीचे काय करताहेत या क्षणी याचा हळूच मनाशी हिशोब लावणार नाही. काय काय लिहून ठेवलंय बिचाऱ्याच्या नशिबात कोण जाणे. उरलेल्या पाचांशी त्याची आता जन्मात भेट नाही!

20 comments:

Pankaj - भटकंती Unlimited said...

बिच्चारा...

आनंद पत्रे said...

लोकांना चमचा ओळखु आला नाही कारण त्यांचं त्याच्यावर प्रेम नव्हतं केवळ एक उपभोग्य वस्तु म्हणुन ते त्याच्याकडे पाहतात...कदाचित..

भानस said...

आता ’नेल्या’ घरी घेत असेल ग जमवून....पाचांची आठवण काढत.

रोहन... said...

चमचा... माझी जुनी आठवण जागी केलीस तू. का.. का.. केलेस असे?? माझा प्रिय चमचा सुद्धा असाच कुठेतरी ट्रेकला हरवला. २००७ मध्ये.

२००० ते २००७ जितके ट्रेक्स मी केले तितके ट्रेक्स तो माझ्याबरोबर होता माझा खादाडी पार्टनर बनून. कुठे असेल तो आता... त्याला माझी आठवण येत असेल का...!!!

Gouri said...

@ पंकज, बघ ना ... एकटाच असेल तो कुठेतरी!

Gouri said...

@ भानस, हो ग, ‘नेल्या’ घरी नांदत असेल तो आता :)

@ रोहन, दर वेळी बदललेला चमचा बघून मला हरवलेल्याची आठवण येते ... मग तू विसरून कसं बरं चालेल तुझ्या लाडक्याला ? ;) इतके ट्रेक तुझ्याबरोबर केल्यावर तो घासाघासागणीक तुझी आठवण काढत असेल बघ!

Gouri said...

@ आनंद, माणूस असो का प्राणी, किंवा निर्जीव वस्तू ... आपल्या रोजच्या सहवासातून त्याच्याशी नातं तयार होतंच ना - आपल्या सोसायटीमध्ये एवढे फ्लॅट असले, तरी एकच विशिष्ट फ्लॅट ‘आपलं घर’ असतो. अगदी रोजचा येण्याजाण्याचा रस्ता सुद्धा ‘आपला रस्ता’ असतो - त्या वस्तूलासुद्धा समजत असेल का तुमची आत्मीयता?

Unknown said...

आई गं....माझ्यासारखेच वेडे अनेक आहेत तर.....अग मला तर आपण टाकलेल्या कचऱ्याचीही पुढे कशी विल्हेवाट लागत असेल असा विचार मनात आला होता.....कचरा टाकून आल्यावर पुन्हा त्याच रस्त्याने जाताना उगाच आपली पिशवी दिसतेय का असे मी पाहिल्यावर (अर्थात दुरून)नवरा ्हसू का रडू असा पहात होता ग<!!!
घरातल्या वस्तूंवर तर अतोनात प्रेम....तुझं पोस्ट अक्षरश: पटल बघ.....

Anonymous said...

khup chaan aani wegal post!

Gouri said...

@ तन्वी, ‘आपली कचऱ्याची पिशवी’ ... हे हे तू तर माझ्याही पुढे गेलीस!
माझ्या नवऱ्याला पण समजत नाही मी अशी वस्तूंशी काय बोलत असते ते :)

Gouri said...

सोनल, एवढ्या ‘क्षुल्लक’ विषयावर लिहिलेलं प्रसिद्ध करावं का नाही विचार करत होते ... मग कुसुमाग्रजांची ‘हरवलेल्या’विषयीची कविता आठवली. मग म्हटलं, कुसुमाग्रज लिहितात या विषयावर, मग आपण का नाही ? हे हे

सिद्धार्थ said...

फोटो द्या की त्याचा. आपण ह्यांना पाहिलंत का? मध्ये देऊ की.

Anonymous said...

चमचा लिंबू खेळताना चमचा कसा जीवाभावाचा वाटायचा त्याचीच आठवण आली. लिंबू मात्र नेहमी चुकार वाटायचे. मस्तच जमलीय हरवलेल्या चमच्याची गोष्ट!!

Gouri said...

@ सिद्धार्थ, फोटो नाही ना त्याचा ... नाही तर देता आला असता :)

@ अनुजा, चमचा-लिंबू मधल्या गंमती आठवल्या :)

Vijay said...

kharyakhurya gruhinichi post.

Gouri said...

विजया, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेबद्दल आभार!

Nikhil Purwant said...

कुठे असेल बिचारा? आपला चमचा कसा ओळखू येत नाही या लोकांना?

अक्षरश: .. जिंकलयस ..

Gouri said...

निखिल, :)

Anonymous said...

अशी एक कविता पण आहे. कुसुमाग्रज किंवा गुलजार नीट आठवत नाही... तिची आठवण झाली. आता शोधाशोधी केल्याशिवाय चैन नाही.

Gouri said...

आल्हाद, गुलजारची माहित नाही, पण कुसुमाग्रजांची आहे. आणि अर्थातच याहून ग्रेट आहे. ती असती, तर तो असा हरवला नसता, आणि ती असती, तर मीही असा हरवलो नसतो अशी काहीशी आहे. मला कुठे वाचली तो संदर्भ आठवत नाहीये, सापडली तर शेअर करा ना प्लीज!