Friday, June 19, 2020

लॉकडाऊनच्या गोष्टी

शंभर शब्दातल्या गोष्टी लिहायचा प्रयत्न 😊

लॉकडाऊन झाला. नवर्‍याचं हॉटेल बंद झालं. मालक चांगला आहे, पुढच्या महिनाभराचा पगार दिला त्यानं. आपण तर कामाला जाऊ शकत नाही. बाई पैसे देतीलही, पण फुकटचे कसे घ्यायचे? आधी उसने घेतलेले फेडले नाहीत अजून. आहे त्यात भागवलेलं बरं.

पहिल्या लॉकडाऊन पाठोपाठ दुसरा, तिसरा, चौथा संपला. अजून कामं सुरू नाही झाली. धान्य रेशनवर मिळालं, थोडंफार वाटप पण झालं वस्तीत. मोठा आधार मिळाला त्याचा. पोटापाण्याची सोय झाली. रोज डेअरीवाला विचारतो दूध नेतेस का म्हणून. इतक्या वर्षांचं गिर्‍हाईक आहे. कधी उधारी थकवली नाही आपण. आज तो द्यायला तयार आहे. पण आपली ऐपत नसताना कशाला! नकोच ते. त्यापेक्षा बिनादुधाचा चहा बरा. 
  
***

लॉकडाऊन झालाय. गेल्या महिन्यापर्यंत पैसे गावी पाठवत होतो... बिवीबच्चे तो उधर है, घर उधर है. इथे रहायचं ते पोटासाठी. काम बंद झालंय सगळ्यांचंच. शंकर पण म्हणाला. त्याचे तर मागच्या कामाचे पैसे पण थकलेत. मुकादम फोन उचलत नाही. इथे प्रत्येक गोष्टीलाच पैसे मोजावे लागतात. खोलीचं भाडं भरलं नाही तर बाहेर काढीन म्हणतोय मालक. किती दिवस रांगेत उभं राहून पोळीभाजी घ्यायची? शंकरची स्कूटर पडलेली आहे. सुतारकामाची अवजारं विकली तर पेट्रोलचे पैसे तर सुटतील. तीन दिवस गाडी चालवली तर पोहोचू घरी. एकाला दोघं आहोत, गाडी बंद पडली तर चालू. पण आता आपल्या माणासात जायचंय.

*** 

माझी इंग्लीशची ओरल झाली, चिऊची बाकी आहे अजून. काऊची पण. आणि गाण्याची परीक्षा तर सगळ्यांचीच. ओरल्स झाल्या की मग लेखी परीक्षा, आईस्क्रीम पार्टी, आणि मग सुट्टी! सुट्टीमध्ये कॅम्पला जायचंय. अक्काकडे जायचंय. स्लीपओव्हरला पण पाठवेल का आई? मोठ्या झालोय आता आम्ही. इतकं काय काय करायचं ठरलंय सुट्टीमध्ये ... पण शाळा काही सुरू होत नाही, परीक्षा काही संपत नाही. नुसतं घरात बसून राहतं का कोणी असं? वर्षा टीचरना मिठी कधी मारायची आता? आणि बाबूचे सारखे कॉल असतात, जर्रा आवाज केला की ओरडतो तो. हा करोना भेटूच दे, त्याला मी काठीने मारणार आहे. आणि मोदी आजोबाना पण. नीट सांगत पण नाहीत लॉकडाऊन कधी संपणार ते.

***

Sunday, March 1, 2020

माझी शाळा, माझा वर्ग


आपल्याला अजिबात शिकवायला येत नाही आणि शिकवायला आवडत तर त्याहून नाही याविषयी माझी फार पूर्वीपासून खात्री होती. म्हणजे इतकं बोलणं, समजावून सांगणं, परत परत सांगणं यासाठी लागणारा पेशन्स आपल्याकडे अजिबात नाही हे मी ओळखून होते. त्यामुळे पोटापाण्यासाठी उद्योग शोधतांना शिकवणे या पर्यायाचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मागच्या जन्मी मी काहीतरी फार मोठं पाप केलेलं असणार त्यामुळे माऊकडून अभ्यास करून घेणे हे संकट आपल्या वाट्याला आलंय याची तर माझी खात्रीच आहे. तिनेही असाच काहतरी सॉल्लीड गफला करून ठेवला असणार मागच्या जन्मी, त्यामुळे माझ्यासोबत अभ्यास करायची वेळ तिच्यावर वारंवार येते. असतात एकेकाचे भोग.

पण ... इविद्यालोका नावाची एक संस्था आहे. असंच काहीतरी शोधतांना मला यांचा शोध लागला. आपल्याकडे दुर्गम भागातल्या शाळांमध्ये शिक्षकांची, शिक्षणसाधनांची बर्‍याचदा कमतरता असते. अश्या कित्येक शाळांमध्ये कुणालाही स्काईप वापरून घरबसल्या आठवड्याला दोन तास शिकवता यावं अशी व्यवस्था यांनी उभी केली आहे. शिकवता येत नसलं, तरी कसं शिकवावं यातलं अपल्याला काहीतरी समजतं असा माझा समज आहे. त्यामुळे टीचर व्हॉलेंटियर म्हणून मी इथे नोंदणी केली. शिकवायचं म्हटाल्यावर हे आपलं काम नाही असं वाटत होतंच, तरीही. 

पहिल्या तासाच्या आधी तर जाम टेन्शन आलं होतं. काय बोलायचं या मुलांशी? काय आवडेल त्यांना? कुठल्या भाषेत संवाद साधायचा? बोलतील आपल्याशी, का बुजतील? मुळात हा अव्यापारेषु व्यापार करायला कोणी सांगितलं होतं मला? पण आता हाती घेतलंय तर ते तडीला नेलं पाहिजे म्हणून हजार वेळा “मला जमणार नाही” म्हणून मेल टाकायचा मोह झाला तरी शेवटी तो तास घेतला. आणि मग दुसरा तास घ्यायची वेळ आली. एकेक तास मुलांशी बोलायला दोन तास मी तयारी करत होते. अजूनही प्रत्येक तास घेतांना नको नको वाटत होतंच. त्यात माऊच्या शाळेत कुठल्या तरी असाईनमेंटमध्ये आई काय करते विचारल्यावर तिने बिनदिक्कत “माझी आई टीचर आहे!” म्हणून जाहीर करून टाकलं. (गेल्या वर्षी तिची आई फार्मर होती. त्याच्या आधीच्या वर्षी रिसर्चर होती. दर वर्षी  तिला टीचर वेगळ्या होत्या म्हणून बरं, नाही तर माऊच्या आईच्या प्रोफेशन्सची लिस्ट बघून त्यांना धाप लागली असती. ;) ) पण तास टाळायचा नाही हा माझा हट्ट कायम होता. या सगळ्या शंका हळुहळू कधी कुठे कश्या विरत गेल्या ते समजलंच नाही. मला कधी वाटलं नव्हतं इतक्या सहजतेने आता आमच्या गप्पा व्हायला लागल्या. मुलांना कोडी घालणं, ओरिगामीमध्ये काहीतरी करणं, चित्रं अशी धमाल सुरू झाली. बहुसंख्य मुलांना समजत सगळं होतं. काही तर एकदम तेज होती. पण लक्षात ठेवणं मात्र जमत नव्हतं. वर्गात एकी अशी, की उत्तर चुकलं, तरी सगळ्या वर्गाचं उत्तर एक असायचं.

या मुलांची ओळख करून घेतांना तुमच्या गावात / गावाजवळ कुठली खास गोष्ट आहे म्हणून विचारल्यावर त्यांनी सांगितलं,
मच्या गावाजवळ शिवाजी महाराजांचा किल्ला आहे!”
“किती जवळ?”
“वर्गाच्या दारातून दिसतो इतक्या जवळ!”

हे ऐकून अर्थातच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. माऊसोबत मी हा किल्ला बघायला येणार, तुम्ही दाखवाल का म्हणून मी विचारलं, आणि सगळी पोरं एका पायावर तयार झाली. आता प्रत्येक तासाला तुम्ही कधी येणार म्हणून त्यांची चौकशी सुरू झाली. पावसाळा संपता संपता जायचा माझा विचार होता. पण या वर्षीचा पावसाळा संपेचना. मग परीक्षा, सुट्टी, माऊची वेळ असं करता करता फेब्रुवारी संपायला आला. काही झालं तरी या महिन्यात जायचंच असा माझा निश्चय होता. एकदा ठरलेलं ऐन वेळी रद्दही करावं लागलं. पण अखेरीस माझा निश्चय पूर्ण व्हावा म्हणून या फेब्रुवारीला एक जादा दिवस मिळाला, आणि गेल्या शनिवारी आमचा जायचा बेत ठरला. माझा प्लॅन साधा होता. माऊला लाल डाब्यातून घेऊन जायचं, पोरांना भेटायचं, त्यांच्यासोबत गडावर जाऊन यायचं, आणि मज्जा करायची. पण शाळेतले सगळे शिक्षक – शिक्षिका, सगळी मुलं, आणि माझी मुलं यांनी तो प्लॅन साधा राहू दिला नाही. सगळ्यांचंच आगत्य, प्रेम यांनी भारावून गेलेय मी. आपण शिकवू शकतो, आपल्याकडून कोणीतरी काही शिकेल, आपण कुणासाठी गुरू वगैरे असू असं मी आजवर कधी स्वप्नही बघितलेलं नाही. शनिवारी या सगळ्याला धक्का बसला जोरदार. मुलांशी संवाद साधायची माझी गरज, शिकवायला शिकणं आणि मज्जा एवढंच माझं या खटाटोपामागचं कारण होतं. ही संधी मला दिल्याबद्दल इविद्यालोकावर मी खूश होते. पण हे दुसर्‍या कुणासाठी एवढं मोलाचं असू शकेल असं वाटलंच नव्हतं. मुलांची पत्रं, त्यांनी स्वतः लिहिलेली कविता वाचल्यावर तर काय बोलावं सुचत नाहीये.  

काल जे बघितलं ते चित्र खूप आश्वासक आहे. माणदेशातल्या हजार एक लोकवस्ती असलेल्या गावातली ही जिल्हा परिषदेची शाळा. पहिली ते सातवी सात वर्ग, सहा शिक्षक. मुलं आनंदाने शिकावीत असं वातावरण. त्यांनी शिकावं म्हणून धडपडणारे शिक्षक. मेहनती, हिकमती, समजूतदार, स्वतंत्र मुलं. पुण्यातल्या सगळं आयतं हातात मिळाणार्‍या, सुरक्षित कोषातच जगणार्‍या मुलांपेक्षा ती खूप हुशार वाटली मला.






त्यांच्या गावातली शाळा सातवीपर्यंत आहे. त्यानंतर दहावीपर्यंत शेजारच्या गावातली शाळा. पुढे काय करू शकतील ही? काही थोड्यांची घरची मोठी शेती, पोल्ट्री, गुरं आहेत. ज्यांच्या आईबापांचं हातावर पोट आहे त्यांचं काय? काय करायला हवं त्यांनी? मुलींनी? “जगायला” पुण्यामुंबईला येण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये म्हणून काय करता येईल? विचार करते आहे. काल पोरांनी जरा जास्तच त्रास दिलाय.

Sunday, February 16, 2020

बाबा

रविवारचा दिवस असावा. शाळा-बिळा कसली घाई असायचे दिवस नव्हतेच ते, तुम्हीही निवांत होतात. सकाळी सकाळीच आपण दोघं फिरायला गेलो होतो. नदीवर. मस्त सोनेरी ऊन पडलेलं होतं. काय गप्पा मारल्या आपण, काय खेळलो ते काही आठवत नाही, पण नदीकडे जाणारा तो रस्ता, सोनेरी ऊन, दोन-तीन वर्षांची मी बाबांचा हात धरून फिरायला चाललेय हा आयुष्य समृद्ध करणार्‍या क्षणांच्या अल्बममधला फोटो पक्का मनात ठसलेला आहे माझ्या.

अजून दोन तीन वर्षांनंतरची गोष्ट. कशावरून तरी मी रुसले होते. आईने नेहेमीप्रमाणे सहज माझी समजूत काढली, आणि मी जेवायला आले. तेवढ्यात तुम्ही मला काहीतरी म्हटलं, आणि मी  पुन्हा फुरंगटून बसले. “आता तुम्हीच काढा तिची समजूत!” आई वैतागून म्हणाली. हे काही तुम्हाला जमण्यातलं काम नाही हे उमजून मी मुकाट्याने तुमच्यासोबत जेवायला आले.

आजूबाजूच्या घरातलं वातावरण आणि आपल्या घरातलं वातावरण यात खूप फरक होता. आपल्या घरात नवरा-बायकोचं भांडण हा प्रकार व्हायला आधी वेगळं मत लागतं, तेच नव्हतं. आणि घरात बाबांना मत नसलं, तरी बाकी सगळ्यांना मतं होती, आणि ती मांडायची मोकळीकही होती. फार वैतागली तर आई कधीतरी आम्हाला एखादा धपाटा घालायची, पण तुम्ही कधीच हात उगारला नाहीत. आणि तुम्ही चिडलात, तरी तुमचा राग एका क्षणात कसा गायब करायचा, ते आम्हाला सगळ्यांनाच माहित होतं.   

एक घर म्हणून एकत्र खूप मज्जा करायचो आपण. भटकंती, खाण्याचे प्रयोग, वैज्ञानिक प्रयोग, गाणं ऐकणं, आवडत्या गाण्यांच्या कॅसेट्स बनवून घेणं, पुस्तकं विकत घेऊन वाचणं – लहान गावात राहिलो तरी खूप समृद्ध होतं आमचं बालपण. आईच्या योजना आणि बाकीच्यांची त्याला मनापासून साथ असं हे सगळं चालायचं. माझ्या जन्माच्याही आधीची, इगतपुरीला असतानाची गोष्ट. कळसूबाईला जाऊन यायचं ठरलं तुमचं सगळ्यांचं. खूप चढायला लागतं अशी ऐकीव माहिती. मग सगळ्यांना जमेल का नाही ते समजावं, म्हणून तुम्ही आधी एकटेच कळसूबाई चढून आलात. आठवडाभरात मग तुम्ही, आई, आंबेकर काका, काकू असे सगळे कळसूबाईला गेलात. ट्रेकिंगचे बूट, सॅक, कपडे असला काहीही जामानिमा नसताना. बिनाकामाचं घराबाहेर कशाला पडायचं असा विचार करण्याच्या काळात तुमची अशी भटकंती चालायची. तुम्ही एकटे गाडी चालवणारे असताना नागपूरहून गोव्याला गाडी चालवत सुद्धा ट्रीप निघायची.    

तुम्ही, भाऊ, मी आपली तिघांची एक सांकेतिक भाषा होती. अगदी घरातल्या बाकीच्यांनासुद्धा समजायची नाही ती. पण बाकी ट च्या, रच्या वगैरे भाषांपेक्षा युनिक ... म्हणजे बोलायला सोपी पण समजायला अवघड अशी. एरवी फारसे गप्पा न मारणारे तुम्ही या भाषेत मात्र भरपूर बोलायचात. अगदी शेवटी पार्किनसनिझमने तुम्हाला तुमच्या शरीरात कोंडून ठेवलं होतं, तेंव्हाही ही भाषा ऐकून मात्र तुमचे कान टवकारायचे. या भाषेसारखेच आपले काही विनोद पण खास होते ... बाकी कुणाला न समजणारे.

आम्ही मराठी शाळेत शिकलो. पुढे कॉलेजमध्ये इंग्रजीशी जुळवून घ्यायला फारसं जड गेलं नाही, कारण घरात मराठी इतकीच इंग्रजी पुस्तकंही होती. आणि कुठला शब्द आडलाच, तर डिक्शनरीमध्ये शोधायची वेळ कधी यायची नाही – तुम्हाला विचारणं पुरेसं होतं.


अतिशय बुद्धीमान आणी कर्तबगार बाप, सुगरण आई. पण दोघांचे सूर कधी जुळलेच नाहीत. आयुष्यातल्या सगळ्या वैफल्याचा राग त्यांनी आपल्या मुलांवर काढला. प्रेम कसं असतं हे लहानपणी अनुभवायलाच मिळालं नाही तुम्हाला. त्यामुळे आई तुमच्या आयुष्यात आल्यावर सगळं विश्वच बदलून गेलं तुमचं. तिच्यावर मनापासून प्रेम केलंत तुम्ही. पण आयुष्यातले सगळे निर्णयही तिच्यावरच सोडून निवांत झालात.

आईच्या कर्तृत्वापुढे तुम्ही कुठेच नव्हता. पण तुमची काही हरकत नव्हती त्याला. पुरुषी अहंकार, हेवा, मत्सर अशा कशाचा तुम्हाला गंधही नव्हता. लहान मुलाची निरागसता, सरलता होती तुमच्याजवळ. आई सांगते, की दवाखान्यामध्ये कुणीतरी तुमच्यावर अफरातफरीचा आळ घेतला कधीतरी. पण “इतका चालूपणा या माणसाला करताच येणार नाही!” म्हणून तुम्हाला निर्दोष ठरवलं त्यांनी.  

आईचं आणि तुमचं आयुष्य फार सुंदर बनवलंत तुम्ही दोघांनी. उत्तम पुस्तकं, उत्तम संगीत, उत्तम माणसं असं सगळं जोडलंत, भरपूर फिरलात, मोकळ्या मनाने अनुभव घेतलेत. बदलायची, शिकायची तयारी ठेवलीत. शक्य तिथे तिथे लोकांना मदत केलीत. लोकांच्या नजरेतून मुलं यशस्वी नव्हती तेंव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. जे योग्य वाटलं, ते सोयीचं नसलं तरी केलंत.

मला आठवतंय, एक दिवशी झोपतांना तुमच्या हातावर काहीतरी लागलेलं दिसलं. काय लागलंय म्हणून मी विचारलं. “काही नाही. रक्त दिलं म्हणून असं दिसतंय” तुम्ही सहज म्हणालात.

कुठल्याही गोष्टीला शेवट असतोच. तो होणारच होता. पण त्याने असं पाकळी पाकळीने तुम्हाला मिटवत, अनोळखी करत जायला नको होतं असं वाटतं. चित्र काढण्यासाठी तुमचा फोटो शोधत होते. गेल्या पाच सहा वर्षातल्या एकाही फोटोत मला तुम्ही ओळखीचे वाटला नाहीत. पायाचं एवढं मोठं ऑपरेशन झालेलं असताना एका आठवड्यात दोन वेळा कळसुबाई चढणार्‍या माणसाला वॉकर घेऊनही चालता न येणं बघणं फार दुःखाचं असतं बाबा.