Wednesday, November 11, 2009

सरहस्यानि जृंभकास्त्राणि ...

कॉलेजमध्ये एक उत्तररामचरितातला वेचा (हा खास अर्जुनवाडकर बाईंचा शब्द) अभ्यासाला होता ... त्यात वासंती वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात वाढणाऱ्या लवकुशांचं कौतुक कुणाला तरी सांगत असते - या दोन तेजस्वी कुमारांना इतर अनेक विद्या, कला आणि शस्त्रास्त्रांबरोबरच सरहस्य - म्हणजे मंत्रासहित - जृंभकास्त्रही अवगत आहे. या अस्त्राच्या प्रयोगाने शत्रूला एकापाठोपाठ एक जांभया यायला लागतात, आणि शेवटी शत्रू हतबल होतो. उत्तररामचरितातलं तेंव्हा शिकलेलं बाकी फारसं काही आठवलं नाही तरी हे जृंभकास्त्र मात्र पक्कं डोक्यात बसलं. फार ओळखीचं वाटतंय ना हे अस्त्र? नुकताच अनुभव घेतला मी त्याच्या सामर्थ्याचा.




पंचतारांकित जेवणानंतर, ‘पोस्ट लंच (टॉर्चर) सेशन’मध्ये पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसाठी खोलीमध्ये केलेला वातानुकुलित अंधार. ज्याचा तुमच्या कामाशी काडीचाही संबंध नाही असलं कुठलं तरी ट्रेनिंग. वर्षातले नेमून दिलेले ट्रेनिंगचे किमान तास भरण्यासाठी (‘दुसरं ट्रेनिंग शनिवारी येतंय - शनिवार नको वाया घालवायला’ किंवा ‘हे ट्रेनिंग या हॉटेलमध्ये आहे - जेवण चांगलं मिळेल दुसऱ्या ट्रेनिंगपेक्षा’ एवढ्या महान उद्देशाने) जमलेले सहाध्यायी. ‘मोले घातले बोलाया नाही रस नाही अपेक्षा’ तत्त्वावर बोलणारा वक्ता समोर. (याला बोलण्याचे तासावर पैसे मिळतात.) शेजारचे दोघे भारत ऑस्ट्रेलिया वन डे सिरीज नेटवर बघत असतात. पलिकडे ‘वेक अप सिड’ डाऊनलोड होत असतो. कोपऱ्यातल्या चित्रकाराच्या प्रतिभेला बहर आलेला असतो. एक दोन कामाची माणसं जोरजोरात लॅपटॉप बडवत इन्स्टंट मेसेजरवरून शेळ्या हाकत असतात. ट्रेनिंगला उशिरा आल्यामुळे नेटवर्क केबल, लॅपटॉपसाठी पॉवर पॉईंट अशा जीवनावश्यक गोष्टींना मुकलेल्या तुम्हाला ट्रेनरच्या थेट समोर बसून चुळबुळण्याखेरीज गत्यंतर नसते. पुढच्या रांगेतला एखादा महाभाग ‘पोस्ट लंच’ सुरू झाल्या झाल्या पाच मिनिटातच डुलक्या काढायला लागतो. बाकी लोकांची नेत्रपल्लवी सुरू होते. पुढचा बळी कोण याचा अंदाज आपण घ्यायला लागतो. समोरच्या वक्त्याचा आवाज हळुहळू दूरदूर, खोलातून यायला लागतो. पुढची जांभई दाबून टाकण्याचे तुमचे प्रयत्न फोल ठरतात, आणि हळुहळू वातावरणाचा अंमल तुमच्यावर चढायला सुरुवात होते. तब्येतीत गाणाऱ्या गवयाने विलंबित ख्याल आळवावा आणि नंतर छोटा ख्याल संपवून तराण्यावर पोहोचावं, तशी सुरुवातीला पंधरा मिनिटांनी येणारी जांभई आता दर मिनिटाला येऊ लागते. जांभया देऊन देऊन डोळ्यातून गंगाजमुना वहायला लागतात. डोळ्याच्या कोपऱ्यातून तुमच्या आजुबाजूचे एक एक वीर धारातीर्थी पडतांना दिसत असतात, त्याबरोबरच तुमची जबाबदारी मिनिटामिनिटागणिक वाढत असते. बाकी कुठेच बघणं श्रेयस्कर राहिलं नसल्यामुळे वक्ता तुमच्याकडेच बघून बोलायला लागतो. पुढचे तीन तास आता तुम्ही, तुमची जांभई आणि वक्त्याची अंगाई अशी घनघोर लढाई. ट्रेनिंगला उशिरा पोहोचल्याची एवढी मोठी शिक्षा? बहुत नाइन्साफी है! (एक मौलिक शंका: ट्रेनिंगमध्ये जांभया देऊन देऊन जबडा निखळला तर कंपनी कडून नुकसानभरपाई मिळू शकते का?)

21 comments:

Anonymous said...

नावावरून दचकले! जांभई पण किती सुरेख पापाण्यातून अनुभवली मी. खरय ग बाई, त्या काही आवरता येत नाहीत, लपवता हि येत नाहीत, व झोपता हि येत नाही.

Gouri said...

कसलं भारदस्त नाव आहे ना ‘जृंभकास्त्र’ :D
जांभया येत असताना एका ठिकाणी शांत बसून जागं राहणं म्हणजे परीक्षा होती अगं.

Anonymous said...

सही आहे ग!!!! ’जृंभकास्त्र’ मला पण येतं ते चालवता....अग आम्ही आठवीत असताना माझ्या मैत्रीणीला म्हणाले होते की वर्गात साधारणपणे सातव्या तासाला माझी झोप जाते कारण आठव्या तासानंतर शाळा सुटते तोवर माझ्यासमोर जांभायायचे नाही नाहितर मी लागोपाठ जांभया देत सुटेन....तिने मुद्दाम खोडी काढली आणि तुला सांगते काही वेळानी तिच्या माझ्यासहित निम्मा वर्ग आणि सरही जांभया देत होते!!!
नवरा तर भयंकर वैतागतो माझ्यावर, मी ना हल्ली मला low B.P. चा त्रास आहे असे ठोकून देते निदान मनसोक्त जबडा ताणता तरी येतो!!!!

बाकी पोस्ट जबरी आहे!!! शेवट सही....कंपनी कडून भरपाई वगैरे सही!!!खरच गं, किती जीव नको होतो ना सेकंड हाफमधे.....

Gouri said...

सहजच, लो बी पी चा त्रास आहे म्हणून सांगायचं ही भारी आयडिया सांगितलीस ... पुढच्या ट्रेनिंगला कामी येईल :D

भानस said...

जांभयांच्या आवर्तनांची एकदा का सुरवात झाली की एकामागोमाग सगळे धारातिर्थी...हेहे. माझा एक मित्र नेहमी असे प्रयोग करायचा...सुरवातीला पाच मिनिटे तो अगदी जबडा ताणून ताणून जांभया द्यायचा. पाणी काय पिऊन पाहील...चाळे..हळूहळू सगळे नादी लागले की हा शांतपणे दोन्ही नाकपुड्या बोटाने दाबून धरायचा....की याच्या जांभया बंद बाकीचे लगे रहोत...:D गंमत म्हणजे इतरांनी ही ट्रिक ट्राय केली पण जांभया थांबायच्या नाहीत...
मस्त झालेय गं जांभई पुराण....:)

Anonymous said...

superb!!!!!!!!!
च्यामरी ह्या ब्लॉग-विश्वा मन्दि लय टॅलेन्टेड लोक हायेत राव...
खरच... फार मस्त...

Gouri said...

@भानस, एकदा यायला लागल्या जांभया, की त्या थांबवणं महा कठीण. तुझ्या मित्राला मानायला पाहिजे एवढा कंट्रोल करता येतो म्हणजे ! :)

@ आशुराज, लई भारी वाटतं बरं कुनी असं लिवलेलं गावलं की. येत ऱ्हावा हिकडं - हिथं ‘स्वागत’का काय म्हनत्यात ते हाये बगा तुमचं.

Raj said...

sahi! :) pudhachya veLesathi sweet dreams :P

sugandha said...

पोस्ट भारीचं आहे. पण नाव मात्र एकदमच झक्कास!

Gouri said...

thanks Raj ;)

सुगंधा, ट्रेनिंगमध्ये मला दर जांभईगणिक ‘जृंभकास्त्र’ चीच आठवण येत होती ग :)

आनंद पत्रे said...

खूपच सुंदर! शाळेत असताना खेळाचा तास येण्यापर्यंत हेच चालू असायचं!

Gouri said...

आनंद, ब्लॉगवर स्वागत.
शाळेत मला पण एक बाई होत्या. स्वभावाने फार गरीब होत्या त्या बिचाऱ्या. त्या अगदी हळू, संथ आवाजात रसायनशास्त्र शिकवायच्या, आणि त्यांचा तास संपेपर्यंत आम्ही नुसत्या जांभया द्यायचो. :D

dn.usenet said...

गौरीबाई: तुमचा लेख (नेहमीप्रमाणेच) छान ज़मलाय.

ते शीर्षक वाचल्यावर मी दचकलो, कारण त्याचे शेवटचे आठ वर्ण अनुष्टुपातल्या विषम (पहिल्या वा तिसर्‍या) चरणांत बसतात, पण एकूण अक्षरं तर दहा आहेत. त्यातही पहिलं अक्षर 'स' आहे. तेव्हा आधीच्या (विषम) चरणाच्या शेवटचा विसर्ग संधी पावून नंतरच्या (सम-अंकी) चरणाच्या पहिले 'स'-कार बनून येऊ शकतो. पण 'जृंभकास्त्राणि' हा सम-अंकी चरणाचा वर्णक्रम नाही, तर विषम चरणाचा आहे. थोडक्यात मी बादरायण प्रयत्न केला असला तरी इथे अनुष्टुपाचा संबंध नाही. आणि दोन जादा अक्षरं एका चरणात भवभूति कोंबणार नाही. खरं म्हणजे एकही जादा अक्षर भवभूति वापरणार नाही. संस्कृतात अनुष्टुभाची मोडतोड झालेली नाही असं नाही. वेंकटेशस्तोत्रातला आठवा श्लोक ('सर्वदेवैक शरणम्‌ ...') हा दोन चरणांत दोषयुक्त आहे. गीतेतही चौथ्या अध्यायात ('तस्य कर्तारमपि मां', ४:१३) व्यासानी तिसर्‍या चरणात हाच घोळ घातलाय. पण लघु-गुरु-ची ओढाताण असली तरी 'वज्रहनुमान मारुती' मधे रामदासांनी ९ वर्ण वापरले आहेत, तसा प्रकार संस्कृतात चालायचा नाही.

काही दिवस आधी छंदांची मित्रांशी चर्चा करताना दशाक्षरी (किंवा २० अक्षरी) गणवृत्तांचा उल्लेख झाला होता. म्हणून त्या छंदांत हे शब्द (सरहस्याणि जृंभकास्त्राणि) बसताहेत का याचा तपास केला. तर 'त्वरितगति' आणि 'मत्ता' हे दोन्ही दशाक्षरी छंद फार वेगळे आहेत, हे लक्षात आलं.

पण मला संस्कृत तर अज़िबात कळत नाही, आणि विशेष आवडतही नाही. मला ज़ी काही वर दिलेली तुटपुंजी माहिती आहे ती माझ्या छंदांविषयीच्या आवडीमुळे. मला अज्ञात असा एक दशाक्षरी छंद असेल तर तो मला समज़ावा म्हणून मी माझे विद्‌वान मित्र सुशील शर्मा यांना हे शब्द कळवले. तर सुशीलरावांनी तुमच्या पोस्टमधे दोन चुका काढल्या. एक तर जृंभकास्त्राचा उल्लेख उत्तररामचरितात दोनदा येतो, आणि दोनही वेळा गद्य उतार्‍यांत येतो. तेव्हा छंदाबिंदाचा प्रश्नच मिटला. पहिल्या अंकात लक्ष्मण या अस्त्राचा उल्लेख करतो. तुम्ही वर्णिलेल्या दुसर्‍या अंकातल्या प्रसंगात वासंती हे शब्द बोललेली नाही. आत्रेयी या अस्त्राविषयी आणि सीतेच्या मुलांविषयी हे शब्द बोललेली आहे. आणि वासंती हे वर्णन आत्रेयीच्या तोंडून ऐकते आहे. एव्हाना वाचकांना जृम्भकास्त्राचा प्रभाव जाणवू लागला असल्यास पुढला भाग नंतर कळवतो.

dn.usenet said...

आता जास्त महत्त्वाचा भाग दोन. भवभूतिचे शब्द तुमच्या अनेक वर्षं लक्षात राहिले आहेत, तर ते बिनचूक स्वरुपात असावे, हे बरे.

एक तर गद्य उतार्‍यालाही 'वेचा' म्हणतात का? मला हा लीलाबाई अर्जुनवाडकरांचा शब्द (उगीचच) पद्य उतार्‍याचीच प्रतिमा सुचवतो. पण ते एक असो.

सुशील शर्माची माहिती अशी:

'सरहस्याणि' हा शब्द चूक आहे. तो 'सरहस्यानि' (syaa) असा हवा. (सुशील शर्मानी तो 'सरहस्यनि' (sya) लिहिला आहे; पण अनवधानानी ही चूक झाली असावी.) मूळ शब्दात र, ऋ, किंवा ष यांतला एखादा वर्ण आल्यास प्रत्ययातला 'न' बदलून 'ण' मधे रुपांतरित होतो (देवेन - रामेण) हे तर बहुतेकांना माहित आहेच. पण तसा बदल होण्यासाठी एक अट पाळल्या ज़ावी लागते. या नियमाला 'नुत्व विधन' हे नाव आहे. एखाद्या शब्दात ऋ-र-ष पैकी अक्षर आल्यास आणि १) त्या अक्षरापुढे तो शब्द संपेपर्यंत च-वर्ग, ट-वर्ग, त-वर्ग, आणि 'ल'-'श'-'स' यांपैकी कुठलाही उच्चार न आल्यास आणि २) 'न' नंतर लगेच स्वर किंवा व-न-म-य यातला ध्वनी आल्यास नियमातल्या 'न' चा 'ण' होतो. एरवी होत नाही. (आता 'रामकृष्णन्‌' चा 'रामकृष्णण्‌' होत नाही तो 'ष' नंतर आलेल्या 'ट' वर्गातल्या 'ण' मुळे की अज़ून इतर कारणामुळे याची मला कल्पना नाही. पण 'अहं वैश्वानरो भूत्वा - प्राणीनां देहमाश्रिता' मध्ये तो शब्द 'प्राणीणाम्‌' होत नाही, ते 'र' नंतर आलेल्या 'ण' मुळे.) 'सरहस्य' शब्दात 'र' नंतर 'स' येत असल्यामुळे तिथे 'सरहस्यानि' असा शब्द हवा.

Gouri said...

dn.usenet, ब्लॉगवर स्वागत, आणि चुकीची माहिती सुधारणारी सविस्तर प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद.

Anonymous said...

गौरी,
सविस्तर डुलक्या किती दिवस घेणार आहेस. इथे ही काही नाही, आमच्या इथे ही दिसत नाहीस. जास्त सविस्तर अभिप्रायाचे ज्ञान मजकडे नाही. लवकर कुठे तरी दीस वाट पाहत आहे. सरळ, सोप्प्या हृदयाच्या बोलीत सांगते.
जागी हो..........

sharayu said...

आमच्या मांजराला एकदा म्यॉव करताना जाभई आली आणि त्याचा आवाज इतका विचित्र निघाला की बाजूच्या खोलीत असलेली मझी बायको काय झाले हे विचारण्यासाठी पळत आली!

Gouri said...

सत्यवती, ब्लॉगवर स्वागत!
म्यॉव करताना जाभई आली तर कसा आवाज येईल हे डोळ्यापुढे आलं माझ्या :D

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

aaahhh, kasal mast relate kelay mi ya post la! Mi jhopewar atishay prem karnaari prani aahe. aane hya post madhe tu itaki chaan watawarn nirmiti keliyes ki mala training attend karawas watu laagalay...niwwal jhopanyasathi!
hahahaha. aajach ha blog pahila. chaan.

Gouri said...

sonal, blog var svaagat. pudhacyaa training la aapan jodine jhopu ;)

Gouri said...

dn.usenet, आज उत्तररामचरित बघायला मिळालं. दुसऱ्या अंकात ’तयोः किल सरहस्यानि जृंभकास्त्राणि जन्मसिद्धानि इति’ असा उल्लेख आहे आत्रेयीच्या तोंडी.