Friday, May 13, 2011

वळीव

    धड दुपार नाही, धड संध्याकाळ नाही अशी वेळ असते. कुंद वातावरण. सगळा आसमंत चिडिचुप्प. झाडाचं पानही हलत नाही. मुलंमाणसं कावलेली. सगळे त्याच्या कोसळण्याची आतुरतेने वाट बघत असतात. आभाळ भरून आलेलं ... ओथंबणार्‍या ढगांना अगदी बोट लागलं तर सरी कोसळायला लागतील असं वाटावं अशी हवा. अश्या जीवघेण्या वातावरणातच कुठेतरी दिलासा - आता थोड्याच वेळात तो येईल, पिसाटासारखा बरसेल, मातीचा वेड लावणारा गंध उधळेल, धुळीची पुटं चाढलेल्या म्हातार्‍या झाडांनाही लहान पोरांसारखा पिंगा घालायला लावेल, लहानमोठी पोरंटोरं मोका साधून भिजून घेतील, आणि तासा - दोन तासात तो आला तसा निघूनही जाईल . कधी कुणाच्या घरात शिरेल, कुठे छप्परच उडवून नेईल - पण त्याच्या येण्याचं एवढं अप्रूप असतं, की त्याला धसमुसळेपणाही माफ असतो. कारण तो संध्याकाळच्या उन्हात चमकणार्‍या सगाळ्या दिशा,अवखळ वारा यांना मागे सोडून जाणार असतो. कोरडं कुणालाच राहू देणार नसतो. तो येऊन गेल्यावरच्या मोकळ्या आकाशाची तुलना तर कशाशीच नाही.


    असाच वळीव कधी मनातही बरसतो. त्यानंतर आतलं आकाश जे मोकळं होतं, ते टिपण्यासाठी हा ब्लॉग. (‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’ नाही, तर ‘गेला वळीव बरसून, झाले मोकळे आकाश’.) त्याचा आज तिसरा वाढदिवस आहे. तीन वर्षाचा झाला तरी तो अजून रांगताच आहे. त्याने पोस्टांची शंभरीही गाठली नाहीये. हिट काऊंटर तर मागेच हटवलाय, त्यामुळे किती हजार,किती लाख अश्या हिशोबाचा प्रश्नच नाही. तीन वर्षात ब्लॉग टेम्प्लेटमध्ये फक्त वरवरचे बदल झालेत. कधी तर महिनेच्या महिने कोरडे ठणठणीत, रखरखीत गेलेत, एवढं असूनही इथे टिकून राहिलेल्या बिचार्‍या तुमच्या सगळ्यांच्या सहनशक्तीची कमाल आहे. तुमच्यासाठी हा खास केक:


(त्याचं काय आहे, मस्त ब्लॅक फॉरेस्ट बनवायचा विचार होता ... पण मेणबत्त्या पेटवायची एवढी घाई झाली, की आयसिंग राहूनच गेलं बघा :)

G, खास तुझ्या मागच्या वेळेच्या सूचनेप्रमाणे तीन मेणबत्त्या लावल्यात बघ :D


आपला एक ब्लॉग आहे हे विसरण्याची वेळ आलीय असं वाटत असतानाच पुन्हा कधीतरी वळीव बरसतो, काहीतरी लिहावंसं वाटतं. आता ब्लॉगचं नाव बदलून ‘वळीव’ करावं असं म्हणतेय. :)



26 comments:

Anagha said...

शुभेच्छा गं ! Quality महत्त्वाची...Quantity नाही...हो ना ? :)

Gouri said...

अनघा, कासवाने कासवाच्या गतीने चालावं, कावळ्याने कावळ्याच्या डौलाने (?) चालावं. ;)

Anagha said...

मला पोस्ट खूप आवडली.....तिची सुरुवात....तिचं नाव.....सगळंच.... :)

~G said...

ZMA la vadhdivsachya shubhechha :)

Gouri said...

अनघा, तुझी दिलखुलास दाद मला एकदम आवडली बघ! ‘झाले मोकळे आकाश’ म्हणतांना मला पावसानंतरचं आभाळंच डोळ्यांपुढे येतं ... सकाळच्या आभाळापेक्षा. त्यामुळे या वाढदिवसाला ब्लॉगच्या नावाची गोष्ट सांगावी असा विचार केला :)

Gouri said...

thanks G!

Suhas Diwakar Zele said...

सुंदर पोस्ट...खुप खुप अभिनंदन !!

पुलेशु... :)

Gouri said...

आभार्स, सुहास!

हेरंब said...

गौरी,

तिसर्‍या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा आणि अभिनंदन !!

Deepak Parulekar said...

मस्तच पोस्ट ! खूप छान!! जाम आवडली ! :)

रोहन... said...

शुभेच्छा.. पण हे असे चालणार नाही बर का... :) किमान दंडक घालून घे स्वतःला... महिन्याला २-३ पोस्ट तरी टाक की... :)

Gouri said...

हाभार्स हेरंब!

Gouri said...

दीपक, वळीव आवडला ना :)

Gouri said...

रोहन, महिन्यातून साधारण दोन वेळा तरी लिहावं असा वाढदिवसाचा संकल्प करायचा का? ;)

अपर्णा said...

गौरी ही पोस्ट इतकी छान आहे की त्यापुढे तू इतक्या कमी वेळा का लिहितेस म्हणून दटावायच होत ते राहील...

वळीव नको ग...इथे ओरेगावत पडत असतो तसा सारखा बरसणारा पाउस तसं आभाळ असुदे या ब्लॉगवर....खूप खूप शुभेच्छा...

Gouri said...

अपर्णा ... हे म्हणजे दुष्काळी भागात बागायती व्हावी म्हणण्यासारखं झालं ग!

tanvi said...

गौरीबाई तुम्हाला शोधावे असे मनात येत असतानाच तुमची पोस्ट दिसली बघा :) ... होत जा गं प्रकट अधून मधून ...

तूला आणि ब्लॉगला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा :) .... पोस्ट सुंदर झालीये अगदी...

Raj said...

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. वळीव असाच बरसत राहो. :)

Gouri said...

तन्वी, या वेळी अगदी मलाही जाणवण्याइतकी मोठ्ठी गॅप पडलीय बघ ... आणि नुसती लिहिण्यात नाही, तर बाकीचे ब्लॉग वाचण्यातही. आता सगळं वाचायचंय.

Gouri said...

राज, आभार्स :)

BinaryBandya™ said...

असाच वळीव कधी मनातही बरसतो. त्यानंतर आतलं आकाश जे मोकळं होतं, ते टिपण्यासाठी हा ब्लॉग.
मस्तच :)

शुभेच्छा

Gouri said...

Binarybandya, आभार!

आनंद पत्रे said...

शुभेच्छा!!! केक आवडला.. आणि पोस्ट अप्रतिम

Gouri said...

आनंद, केक आवडला ना? आता वाढदिवसाचं गिफ्ट? ;)

aativas said...

लिहाव अस आतून वाटत तेव्हा लिहीण सगळ्यात उत्तम .. नाहीतर रतीब घातल्यासारख होत लेखन .. त्यामुळे 'किती' ची काळजी न करण्याची तुमची चांगली पद्धत चालू ठेवा ...

Gouri said...

सविता, तुम्हालाही पटलं ना? आभार :)