Thursday, August 13, 2009

तू सब्र तो कर मेरे यार ...

भक्तांच्या आणि बडव्यांच्या गर्दीच्या महापूरातही आषाढी कार्तिकीला त्याच्या मूर्तीच्या पायावर क्षणभर डोकं टेकतानाही तो भेटावा एवढी श्रद्धा माझ्याजवळ नाही. निरव शांतता, समोर प्रसन्न फुलं वाहिलेली शंकराची पिंड, कुणीही लुडबूड करणारा पुजारी जवळपास नाही, डोळे दिपवून टाकेल असं त्याच्या श्रीमंतीचं प्रदर्शन नाही, भोवताली पाणी पसरलेलं - डोळे मिटले, की क्षणात तो समोर दिसावा अशी कुडलसंगमासारखी देवळं फारच क्वचितच सापडतात. नाही तर तो दिसतो एकटीनेच टेकडी चढत असताना, भरभरून बहरलेल्या एखाद्या सुंदर झाडाखाली, एखादी सुंदर कलाकृती अनुभवताना, एखादं आवडीचं काम मन लावून करताना, कुणीही न वाचण्यासाठी काही लिहिताना. तो सहजच भेटतो - अजून वेगळे काहीच उपचार नको असतात त्याला. नेम, नियम, व्रतवैकल्य, नियमित पूजा, ध्यानधारणा असं काहीच मला येत नाही. कधीतरी त्याची आठवण आली म्हणजे मी त्याला बोलवते, आणि तो ही येतो भेटायला. माझ्या बाजूने ही एक केवळ casual relationship आहे - nothing very serious. यापेक्षा मोठी कमिटमेंट देण्याची माझी तयारी नाही, आणि हे समजून घेण्याइतका तो मॅच्युअर आहे. प्रेम ठरवून करता येत नाही, आपोआप व्हावं लागतं. त्याच्याविषयी अजून काही मला वाटावं, त्याच्या नित्य सहवासाची आस लागावी म्हणून मी फक्त वाट बघू शकते. तो तर जगाच्या अंतापर्यंत वाट बघायला तयार आहे.

Sunday, August 9, 2009

मेजवानी



बागेतल्या सोनचाफ्याला मस्त फूल आलं आहे. ते तोडायला गेले.

नेहेमी सोनचाफ्याच्या झाडावर असणारा पांढरा कोळी आणि एक्झोराच्या फुलांवर कायम बसणारी माशी एकत्र काय करताहेत इथे? माशी उडत का नाहीये?


कशी उडणार? तिचं डोकं कोळ्याच्या तोंडात आहे!

महिनाभराची बेगमी...



लहान तोंडी मोठा घास!

Monday, August 3, 2009

का लिहायचं?

एखादा विषय ‘माझ्याविषयी लिहिलं तरी चालेल’ म्हणून उदार मनाने परवानगी देतो. ब्लॉगवरचं नवं पोस्ट आकार घेऊ लागतं. डोक्यात एक डेमन थ्रेड सुरू झालेला असतो. अजून थोssडासा आकार आला, कि लिहिता येईल. बोटं टायपायला उतावीळ असतात. अशा वेळी नेमकं कुठलं तरी नको तेवढं काम येतं. ऑफिसमध्ये, घरी, गाडी चालवताना, जागेपणी, झोपेत ... पूर्ण वेळ त्या कामाचंच प्रोसेसिंग डोक्यात चालू असतं. शेवटी तो ब्लॉगचा दानव दोरा वेळ संपून मरून जातो. नंतर वेळ मिळतो, पण लिहायची इच्छा नसते / काही सुचत नाही / लॅपटॉप बडवण्यापेक्षा कागदावर रेघोट्या ओढण्यात / मातीत खेळण्यात जास्त रस वाटतो ... थोडक्यात म्हणजे चांगले तीन - चार आठवडे आपण ब्लॉगकडे ढुंकूनही बघत नाही. अचानक ब्लॉगवर नवी कॉमेंट येते / मेलीस का म्हणून कुणीतरी प्रेमाने विचारतं. लिंक उघडून आपण आपलाच ब्लॉग तिऱ्हाईतासारखा वाचत असतो...

हे आपण लिहिलंय? कधी? इतकं वाईट लिहितो आपण? लिहिताना शंभर वेळा वाचलं तरी दिसले नसते असे दोष दिसायला लागतात - फारच त्रोटक ... रटाळ ... आशय काहीच नाही ... सुमार दर्जा ... एका एका पोस्टवर शेरे मिळत जातात, आणि ते पोस्ट डिलिट करायला बोटं शिवशिवायला लागतात.

हे आपण लिहिलेलं नाही. आपण असं काही लिहिणं शक्यच नाही. तसंही महिनाभरापूर्वीची मी आणि आजची मी एक कुठे आहे? नदी तीच आहे असं आपण म्हणतो ... प्रत्यक्षात दर वेळी आपण वेगळं पाणी बघत असतो ना? तीच नदी परत बघितल्यासारखं वाटणं हा तर केवळ आभास! जे मी लिहिलेलं नाही, ते मी का डिलिट करावं?

मला माहित आहे, आणखी एका महिन्याने मला हेही लिहिलेलं उडवून टाकायची अनिवार इच्छा होणार आहे. पण आज लिहिणं भाग आहे. नाईलाज आहे. आज जे काही टाईपते आहे, ते सुद्धा खरं तर मी लिहिलेलं नाहीच.

‘आपण लिहिलेलं’ वाचताना, त्यातला ‘आपण’ दूर झाला, तर केवढा फरक पडतो!